चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१५


    INS Tarangini
  • भारतीय नौदलाची प्रशिक्षणार्थी शिडाची नौका ‘आयएनएस तरंगिनी’ आठ महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर जात आहे. ही नौका युरोपमध्ये आयोजित उंच नौकांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल. 
  • ‘सेल ट्रेनिंग इंटरनॅशनल’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ब्रिटन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलॅंडच्या किनाऱ्यांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आकाराच्या तीनशे शिडाच्या नौका या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
  • आठ महिन्यांच्या अवधीमध्ये ही नौका तब्बल सतरा हजार मैलांचा प्रवास करेल, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही नौका ओमान नौदलाच्या शिडाच्या नौकेसोबतही स्पर्धा करणार आहे. 
  • भारताची तरंगिनी ही शिडाची नौका ‘अ’ श्रेणीतील नौका आहे. ही नौका गोवा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली असून, ११ नोव्हेंबर १९९७ मध्ये ती भारतीय नौदलामध्ये सहभागी झाली होती. 
  • परकीय राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांची निर्मिती करणे आणि तसेच सागरी प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्मितीचा पुरस्कार करत ही नौका शांततेचा संदेशही देईल. 

  • जगभरातल्या प्रगत कृषी क्षेत्राचे लक्ष लागलेल्या ‘ऍग्रिटेक २०१५’ या जागतिक कृषी प्रदर्शनास तेल अवीव, (इस्राईल) येथे प्रारंभ झाला. 
  • जगभरातून आलेले शेतकरी, कृषी व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या सहभागामुळे सकाळी १० पासूनच प्रदर्शनस्थळ फुलले. विशेष म्हणजे यामध्ये भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री व अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही येथे दाखल झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्साहात भर पडली.

  • सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुला अझीझ यांनी आपला वारसदार बदलत गृहमंत्री मोहंमद बिन नायफ यांना नवा वारसदार म्हणून घोषित केले. 
  • जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाचे राजे किंग अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अझीझ यांनी जानेवारी महिन्यामध्ये राजसत्तेची सूत्रे स्वीकारली होती. 
  • वारसदाराच्या शर्यतीत राजे अझीझ यांचा मुलगा मोहंमद बिन सलमान हा होता. पण, त्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. 
  • राजे अझीझ यांनी ५५ वर्षीय मोहंमद बिन नायफ यांना वारसदार म्हणून घोषित करत त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी ठेवली आहे. तसेच ते राजकीय आणि सुरक्षा समितीचे प्रमुख असणार आहेत.

  • पनामा कालव्यातील जलप्रवाह नियंत्रित करण्यासाठी शेकडो कोटी डॉलर्स खर्च करून उभारण्यात येणाऱ्या १६ महादरवाजांपैकी शेवटचा दरवाजा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
  • प्रशांत महासागराच्या बाजूच्या प्रवेशावर हा ४ हजार २३२ टन एवढ्या वजनाचा हा महादरवाजा बसविण्यास सुरवात करण्यात आली. या दरवाजामुळे पनामा कालव्याच्या विस्ताराला आगामी काही दिवसांमध्ये सुरवात होणार आहे.
  • पनामा कालव्यातून वाहतूक करणाऱ्या जहाजांची सध्याची क्षमता अडीच पटींनी वाढविण्यासाठी या कालव्याच्या मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय २००६ मध्ये घेतला होता. 

  • बिहारच्या अनेक जिल्ह्यांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर, शेकडो जण जखमी झाले आहेत. 
  • दरभंगा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या भूकंप पीडितांच्या कपाळावर भूकंप असे स्टिकर्स लावून त्यांना स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले आहे. 
  • भूकंप पीडितांची अशी छायाचित्रे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख शंकर झा यांनी माफी मागितली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी पीडीतांना अशी वागणूक देणे, निषेधार्थ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • नेपाळमध्ये हाहाकार माजविणाऱ्या भूकंपामुळे भारतीय उपखंडाच्या भौगोलिक स्थानामध्येही मोठा बदल झाला असून भारताचा बराच भाग उत्तरेकडे दहा फुटांनी सरकला असल्याचे अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे. 
  • तसेच नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू शहराच्या भौगोलिक स्थानामध्येही बदल झाला असून हे शहर तीन मीटरने दक्षिणेकडे सरकले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूस्तरामध्ये बदल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
  • या भौगोलिक बदलांमुळे माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर मात्र कसलाही परिणाम झालेला दिसून येत नाही. काही संशोधकांनी एव्हरेस्टच्या उंचीमध्ये बदल झाल्याचे म्हटले आहे. पण तो बदल नेमका किती आहे, हे मात्र सांगणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. 

    MPSC
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मध्येच प्रशिक्षण कालावधी किंवा नोकरीवर रुजू झाल्यानंतर सेवा सोडणाऱ्या वर्ग एक आणि दोन संवर्गातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • अशा अधिकाऱ्यांनी किमान पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र द्यावे लागणार आहे. त्यासाठी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांकडून पाच; तर वर्ग दोन संवर्गातील अधिकाऱ्यांकडून तीन लाखांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.

  • परकी चलन विनिमय कायदा (एफसीआरए)चे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील सुमारे नऊ हजार स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) नोंदणी रद्द केल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. 
  • परदेशातून ८,९७५ स्वयंसेवी संस्थांना निधी मिळाला होता; परंतु त्यांनी यासंदर्भातील विवरणपत्र तेही २००९ पासून सादर केले नव्हते. विलंबाचे कारणही दिले नव्हते. परिणामी त्यांची नोंदणी तत्काळ रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

  • रवींद्रनाथ टागोर यांच्या लघुकथेमधील ‘काबुलीवाला’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानचे ब्रॅंडिंग केले. अब्जावधी डॉलर खर्च करूनदेखील जे शक्य झाले नसते ते या कथेने केले, असे गौरवोद्गार भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष महंमद अश्रफ घानी यांनी काढले. 
  • त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. 
  • या वेळी घानी यांनी जगासमोरील दहशतवादाचा धोका ठळकपणे अधोरेखित करत दहशतवादाचा कायम बीमोड करण्यासाठी आमचा देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. घानी यांनी भारतामधील लोकशाहीचे आणि टागोरांच्या कवितेचेही मनापासून कौतुक केले.

चालू घडामोडी - २७ व २८ एप्रिल २०१५


  • देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परकी गंगाजळी सुदृढ असणे आवश्यक असते. १७ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात परकी चलनसाठा २.८ अब्ज डॉलरने वाढून ३४३.२० अब्ज डॉलर या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोचला आहे.
  • २७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ३४१.३७८ अब्ज डॉलर इतका परकी चलनसाठा झाला होता. परकी चलन मालमत्तेत वाढ झाल्याने हा परकी चलनसाठा वाढला आहे.
  • परकी चलनाचा साठा हा परकीय भांडवलातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. देशातील सोन्याचा साठा १९.३८ अब्ज डॉलर इतका कायम आहे.

  • मागील वर्षी झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशात आणि परदेशात मिळून ७ हजार ८०० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या ताज्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या (एफआययू) चौकशीत उघडकीस आले आहे.
  • या संदर्भातील अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील वर्षी ‘एफआययू’ने केलेल्या कारवाईद्वारे प्राप्तिकर विभागाने एकूण ७,०७८ कोटी रुपयांच्या, तर सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाने ७५० कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत विक्रमी संख्येने संशयास्पद आर्थिक व्यवहार मागील वर्षभरात झाल्याचे ‘एफआययू’च्या चौकशीत समोर आले आहे.

    Ajoy Mehta
  • मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार अजोय मेहता यांनी मुख्यालयात स्वीकारला आहे. मावळते आयुक्त सीताराम कुंटे यांना विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून टीकेमुळे आयुक्तपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिवपदी कुंटे यांची बदली झाली आहे.
  • मेहता हे पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

  • इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ‘रेडिओ इराण’ने दिले आहे. हे वृत्त खरे असल्यास हा ‘इसिस’ला मोठा झटका आहे.
  • बगदादीचा मृत्यू झाल्याचा रेडिओ इराणचा दावा आहे. मागील आठवड्यात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये बगदादी गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त ‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

  • गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी करणारा भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्माची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

  • नेपाळमधील भूकंपात तेलगू चित्रपटातील अभिनेते के. विजय (वय २५) यांचा मृत्यू झाला आहे. एतकरम.कॉम या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते नेपाळला गेले होते.
  • चित्रीकरणानंतर के. विजय यांची मोटार भूकंपामध्ये उलटली होती. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

  • भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी इंग्लंडने ५० लाख पौंडची मदत केली जाहीर आहे.
  • तातडीच्या मदतीसाठी तीस लाख पौंड आणि रेड क्रॉसला वीस लाख पौंड देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले.
  • यूके शोध आणि मदतकार्य पथक नेपाळला पाठविण्यात आले असून, आरएएफ विमानेही पाठविण्यात येत असल्याचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी ट्विटरवरून जाहीर केले.

  • नेपाळला बसलेल्या शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्यातून बाचवलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील ५०० अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे.
  • पतंजलीतर्फे भूकंपग्रस्त नेपाळमधील ५०० अनाथ मुलांची सोय करण्यात येणार आहे. या अनाथ मुलांना काठमांडूतील पतंजली योगपीठात ठेवण्यात येणार आहे.
  • या मुलांची खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था आणि पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदेवबाबा करणार आहेत.

  • चेन्नई येथे जन्म झालेल्या राजा राजेश्वरी यांनी न्यूयॉर्क शहराच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजेश्वरी या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश आहेत.

  • राजधानीतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमधील एक भाग म्हणून दिल्लीमध्ये मोकळ्या जागी कचरा, झाडांची पाने, रबर, प्लॅस्टिक जाळणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड केला जाईल, असे राष्ट्रीय हरित लवादाने घोषित केले.
  • हरित लवादाने यापूर्वी दिल्लीमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घातली होती; मात्र या बंदीला केंद्र सरकारने तूर्त स्थगिती दिली आहे.

  • सुदानचे अध्यक्ष ओमार अल बशीर यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ९४ टक्के मते मिळवून विजय मिळवला आहे. 
  • ओमार अल बशीर १९८९ पासून सुदानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या विजयानंतर आणखी ५ वर्षासाठी त्यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे. या निवडणुकीमध्ये ओमार यांच्या नॅशनल कॉंग्रेस पक्षाने ४२६ पैकी ३२३ जागा जिंकल्या आहेत.

  • भारताने इंडोनेशियातील पालेमबंग येथे झालेल्या प्रेसिडेंट चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. राकेशकुमार (६९ किलो) व हरपालसिंग (७५ किलो) यांनी सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली.
  • भारताने या स्पर्धेत चार सुवर्ण व एक कांस्य अशी पाच पदके मिळवीत ३३ गुणांची कमाई केली. त्यापैकी दोन सुवर्ण एस. सरजुबाला (४८ किलो) व पिंकी जांगरा (५१ किलो) यांनी महिला गटात मिळविली.

    Anil kapoor and Dilip prabhawalkar at Dinanath mangeshkar award
  • विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा १५ एप्रिल २०१५ रोजी झाली असून २४ एप्रिल २०१५ रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या ७३ व्या स्मृतिदिनी मुंबईमध्ये हे पुरस्कार लता मंगेशकर यांच्या हस्ते वितरीत केले गेले
  • हे पुरस्कार १९८९ पासून प्रतीष्ठानतर्फे देण्यात येतात.
  • पुरस्काराचे स्वरूप – प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, पं.सुरेश तळवलकर, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर या पाच दिग्गजांना यंदाचा दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

भूकंप - नैसर्गिक आपत्ती

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
         नेपाळमध्ये केंद्र असलेल्या या भूकंपाचा हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्राशी थेट संबंध आहे. इंडियन आणि युरेशिअन या दोन प्लेट एकमेकांना दाबतात व त्या दरवर्षी सुमारे ३५ ते ३७ मिलिमीटर पुढे सरकतात. या हालचालींमध्ये वाढ झाल्यास दबाव दूर करण्यासाठी भूकंपाचा धक्का बसतो व नुकताच भूकंप त्याचाच भाग आहे. तर जाणून घेऊया भूकंपाबद्दल महत्वाची माहिती ..................

भूकंप का होतात?
  • भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्‌सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्‌स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय. 
  • हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.

भूकंपाचे मोजमाप :
  • भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. 
  • भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
  • ३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. 
  • भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.
  • समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.
भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी
भूकंपाची नाभी आणि अपिकेंद्र :
  • पृथ्वीच्या कवचात ज्या ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यास कारणीभूत होणारा विभंग घडून येतो, ज्या ठिकाणी खडक किंवा प्लेट्‌स दुभंगतात त्या उगमकेंद्राच्या जागेला भूकंपाची नाभी म्हणतात. 
  • त्या स्थानाच्या सरळ वर भूपृष्ठावर असणाऱ्या स्थानाला अपिकेंद्र म्हणतात. भूगर्भात केंद्रबिंदूवरील भूभागाला भूकंपाचे केंद्र म्हणतात. 

भूकंपतरंग :
  • पृथ्वीच्या कवचातील विक्षोभामुळे भूकंपाचा धक्का बसल्यावर धक्क्यामुळे उत्पन्न होणारे भूकंपतरंग नाभीपासून पृथ्वीच्या सर्व भागांत पसरतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जागोजागी असणाऱ्या भूकंपमापक उपकरणांत आलेखाच्या (भूकंपलेखाच्या) स्वरूपात त्या त्या जागी हे तरंग येऊन पोहोचल्याची नोंद होते. 
  • कोणत्याही ठिकाणच्या भूकंपमापकात एखाद्या विशिष्ट भूकंप स्थानापासून निघालेले जे तरंग सर्वांत आधी येऊन पोहोचतात, त्यांना प्राथमिक तरंग म्हणतात. हे तरंग ध्वनितरंगासारखे अनुतरंग (ज्यांमध्ये माध्यमातील कण तरंग प्रसारणाच्या दिशेत पुढेमागे याप्रमाणे कंप पावतात असे तरंग) असतात. 
  • प्राथमिक तरंगाच्या पाठोपाठ भूकंपलेखकात येऊन पोहोचणाऱ्या तरंगाना द्वितीयक तरंग म्हणतात. हे तरंग दोरीवरील तरंगाप्रमाणे अवतरंग (म्हणजे ज्यांत माध्यमातील कण तरंगाच्या प्रसारणाच्या दिशेशी लंब दिशेत कंप पावतात असे तरंग) असतात. 
  • प्राथमिक व द्वितीयक या दोन्ही तरंगांचा वेग ते ज्या खडकांतून प्रवास करतात त्यांच्या घनतेवर व दृढतेवर अवलंबून असतो; पण कोणत्याही घनतेच्या व दृढतेच्या खडकात प्राथमिक तरंगांचा वेग द्वितीयक तरंगापेक्षा जास्त असतो. 
  • प्राथमिक व द्वितीयक तरंगांखेरीज आणखी एका वेगळ्याच प्रकारच्या तरंगाची नोंद भूकंपलेखात केली जाते. हे तरंग भूपृष्ठाखाली फार खोलवर न घुसता पृष्ठालगतच्या थरांतूनच प्रवास करतात त्यामुळे त्यांना पृष्ठतरंग असे म्हणतात. यांचा आवर्तकाल (एका पूर्ण आवर्तनास लागणारा काल) दीर्घ असल्याने त्यांना दीर्घ तरंग असे नाव आहे.

भूकंपाचा अंदाज :
  • भूकंपाचा अंदाज वर्तविणे आजही शक्य झालेले नाही. 
  • परिसरातील भूकंपाचा इतिहास, भौगोलिक रचना ध्यानात घेऊन अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न. 
  • मोठ्या भूकंपापूर्वी प्राणी व पक्ष्यांच्या वर्तनात बदल होत असल्याची निरीक्षणे.

जगातील सर्वांत मोठा भूकंप :
    भारतातील मोठे भूकंप
  • चिलीमध्ये २२ मे १९६० मध्ये झालेला भूकंप सर्वांत मोठा समजला जातो.
  • रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता ९.५ रिश्‍टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.
  • देशातील कॅनिटजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 
  • यातून सुमारे एक हजार अणुबॉम्बएवढ्या ऊर्जेची निर्मिती

हिमालय आणि भूकंप :
  • हिमालय पर्वतरांगांच्या ठिकाणी पृथ्वीचे दोन विभिन्न भूस्तर एकत्र येतात. 
  • अंदाजे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी भारत- ऑस्ट्रेलिया खंड विलग झाले. 
  • ‘इंडियन प्लेट’च्या थोड्या हालचालीनेही भूपृष्ठावर मोठा भूकंप होत असतो. जाड दगडी कवचाच्या या प्लेट ‘टेक्‍टॉनिक प्लेट्‌स’ म्हणून ओळखल्या जातात. 
  • ‘इंडियन प्लेट’ दर वर्षी पाच सेंटिमीटर या वेगाने उत्तर दिशेला, तिबेटकडे सरकत आहे. तिची ‘युरेशियन प्लेट’सोबत धडक होत असते. त्यातून तयार होणारा दबाव दूर होण्याचा मार्ग म्हणून भूकंप होतात. 
  • भूपृष्ठाखाली दहा किलोमीटरवर टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली झाल्याची नोंद.

जगातील प्रलयंकारी भूकंप :
  • चीन (१५५६) - शांक्झी प्रांताला भूकंपाचा तीव्र धक्का. त्यात सुमारे ८ लाख ३० हजार मृत्युमुखी.
  • चीन (१९७६) - तांगशान प्रांताला ७.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, अडीच लाख जणांचा मृत्यू.
  • इंडोनेशिया (२६ डिसेंबर २००४) - ९.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी. दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू.

चालू घडामोडी - २६ एप्रिल २०१५


    Nepal EarthQuake१
  • नेपाळमध्ये काठमांडू येथून जवळच असलेल्या लामजुंगमध्ये आज अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या ७.९ आणि ६.६ रिश्टर स्केल क्षमतेच्या दोन तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला. 
  • या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले असून, सुमारे २००० जणांचा मृत्यू झाल्याचे व ४७१८ जण जखमी असल्याचे नेपाळच्या गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. 
  • त्याशिवाय हजारो जण जखमी झाले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
  • नेपाळमध्ये गेल्या ८० वर्षांमध्ये झालेला हा सर्वांत मोठा भूकंप आहे. भारताने नेपाळच्या मदतीसाठी तातडीने मदतपथके रवाना केली आहेत. 
  • भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील २२ राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तानात लाहोर, तसेच तिबेटपर्यंत धक्के जाणवले. तिबेटमध्ये भूकंपामुळे १२ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. बांगलादेशातही भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला असून शंभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 
  • भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्यानंतरही सुमारे तासभर त्याचे हादरे जाणवत होते. भारतातही विविध राज्यांमध्ये मिळून ४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
  • धरहरा टॉवर कोसळला
    • नेपाळमध्ये १९ व्या शतकात बांधलेला आणि जागतिक वारसा यादीत असलेला नऊ मजली धरहरा टॉवरही भूकंपाच्या धक्क्याने कोसळला. 
    • हा ५०.५ मीटर उंचीचे टॉवर नेपाळचा कुतुबमिनार म्हणून ओळखला जातो. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांनी १८३२ मध्ये हा टॉवर बांधला. त्याला दोनशे पायऱ्या होत्या. 
    • मुघल आणि युरोपीय शैलीत बांधलेल्या या टॉवरच्या माथ्यावर शंकराची मूर्ती होती. सुटीचा दिवस असल्याने काठमांडूच्या मध्यभागात असलेले अनेक पर्यटक येथे आले होते. त्यामुळे टॉवरच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेल्याची शक्यता वर्तविली आहे. हे ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.
  • नेपाळमध्ये.....
    • भूकंपाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळमध्ये आणीबाणी जाहीर
    • जनकपुरा येथील प्रसिद्ध जानकी मंदिराची पडझड; अनेक पर्यटन स्थळांचीही वाताहत
    • मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प. अनेक रस्ते खचले असल्याने अनेक भागांचा संपर्कही तुटला
    • एव्हरेस्ट पर्वतावर गेलेल्या आठ गिर्यारोहकांचा मृत्यू
    • काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले; सर्व विमाने भारताकडे वळविण्यात आली.
  • भारतामध्ये.....
    • औषधे, खाद्यपदार्थ व ‘एनडीआरएफ’च्या १० पथकांसह चार विमाने नेपाळला रवाना
    • भूकंपातील मृतांच्या नातेवाइकांना उत्तर प्रदेश सरकारची प्रत्येकी पाच लाख, तर बिहार सरकारची प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर
    • नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना
    • भूकंपाचे झटके बसलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा
    • नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी बीएसएनएल स्थानिक दरानुसार आकारणी करणार.
    • एअरटेलने भूकंपानंतर पुढील ४८ तासांसाठी नेपाळमधील आपल्या नेटवर्कवरील सर्व कॉल्स मोफत करण्याचे जाहीर केले.
    • भारताने नेपाळमध्ये मदतकार्य सुरू केले असून, भारताने याला ‘ऑपरेशन मैत्री’ असे नाव दिले आहे. काठमांडूमधून आतापर्यंत ५४० भारतीयांना सुखरूप भारतात आणले आहे.
  • भूकंपातील शोधासाठी ‘गुगल पर्सन फाइंडर’
    • Google Person Finder
    • लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ने नेपाळमधील भूकंपातील पीडितांचा शोध घेण्यासाठी ‘पर्सन फाइंडर’ या नावाची सेवा सुरू केली आहे. 
    • या सेवेद्वारे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या त्यांच्या मित्रांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी या संकेतस्थळावर हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेता येणार आहे. तसेच सापडलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहितीही देता येणार आहे. 
    • ‘गुगल’ची ही सेवा २०१० पासून कार्यरत आहे. विविध आपत्तींच्या कालावधीत आपल्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी या सेवेचा उपयोग होत आहे. ही सेवा http://google.org/personfinder/2015-nepal-earthquake/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • पाकिस्तानी समाजसेविका आणि मानव अधिकार कार्यकर्त्या सबीन महमूद (वय ४०) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 
  • बलुचिस्तानमधील अस्थिरतेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. सबीन यांना पाच गोळ्या लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवासाचा अनुभव घेतला. धौला कुआँ ते द्वारका या स्थानकांदरम्यान मोदी यांनी मेट्रोने प्रवास केला. 
  • पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही ‘मेट्रो राइड’ अनुभवली.

चालू घडामोडी - २५ एप्रिल २०१५


  • २५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिन.

    Nepal EarthQuake
  • नेपाळला शक्तीशाली भूकंपाचा तीव्र धक्का बसल्याने, राजधानी काठमांडूतील ९ मजली ऐतिहासिक धरहारा टॉवर कोसळला आहे. या टॉवरजवळ ४०० हून अधिक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर इतकी भीषण होती. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, अनेक इमारतींना तडे गेले आहेत. रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दोन मिनिटे भूकंपाचा धक्का जाणवत असल्याने नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
  • भूकंपामुळे काठमांडू शहरातील ऐतिहासिक धरहारा (भीमसेन) टॉवर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हा टॉवर ९ मजली असून, १९ व्या शतकात तो बांधण्यात आला होता. नेपाळमधील कुतुबमिनार अशी याची ओळख होती. पर्यटकांची येथे खूप गर्दी असते.
  • या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातदेखील जाणवले असून यामुळे बिहारमध्ये ६ जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एका महिलेसह दोन जणांचा मृत्यु झाला असून ५० जण जखमी झाले आहेत.

  • फुटीरतावादी नेता मसरत आलम भट्ट याचा जामीन अर्ज बडगाम स्थानिक न्यायालयाने फेटाळला.
  • देशविरोधी कृत्यांमुळे पोलिसांनी आलमसह हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी व अन्य काही फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
  • गिलानी यांनी आयोजित केलेल्या सभेत त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावीत देशविरोधी घोषणा दिल्याने मससरतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • यानंतर अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्याविरुद्ध सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • तृतीयपंथीयांनाही देशाच्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कायदेशीर अधिकार मिळावेत, यासाठीचे ‘तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क – २०१४’ हे खासगी विधेयक (प्रायव्हेट मेंबर्स बिल) राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले.
  • ही घटना ऐतिहासिक ठरली, कारण वरिष्ठ सभागृहाने खासगी विधेयकांना मंजुरी न देण्याच्या तब्बल साडेचार दशकांच्या परंपरेला मोडीत काढले आहे.
  • तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबत संसदेत म्हणजे लोकसभेत यापूर्वी ४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९७० मध्ये एक खासगी विधेयक आले होते. मात्र, ते मंजूर झाले नाही.
  • द्रमुकचे नेते तिरूची सिवा यांनी २७ फेब्रुवारी २०१५ला हे विधेयक सादर केले होते.
  • संसदीय प्रथेनुसार खासगी विधेयके ही केवळ प्रस्ताव असतात, ती सरकारी धोरण किंवा कामकाजाचा भाग असत नाहीत. यामुळे संसद सदस्यांचे खासगी विधेयक मंजूरही होत नाही. अशी बहुतांश म्हणजे ९९ टक्के विधेयके चर्चेअंती मागे घेतली जातात. यातील एखादे विधेयक सरकारला अत्यावश्यक वाटले तर नंतर सरकार स्वतः त्यात सुधारणा वा बदल करून ते सादर करते. अर्थात, हे विधेयक अधिकृतरीत्या मान्य करणे सरकारवर बंधनकारक नाही.
  • विधेयकातील ठळक मुद्दे :
    • सिवा यांनी सादर केलेल्या तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबतच्या या विधेयकात १० प्रकरणे व ५८ कलमे आहेत.
    • यात तृतीयपंथीयांना मुळात जगण्याचा अधिकार मान्य करणे, त्यांच्यासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करणे, त्यांना त्रास देणाऱ्यांना कायदेशीररीत्या शिक्षा करणे, तृतीयपंथीयांच्या मुलांच्या शिक्षण व नोकऱ्यांसाठी देशपातळीवर धोरण आखून तरतूद करणे, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षणाचा हक्क देणे, त्यांना स्वयंरोजगाराची साधने व शिक्षण देणे, सामाजिक सुरक्षा, वेगळे रोजगार केंद्र विनिमय स्थापणे आदी महत्त्वाच्या तरतुदी आहेत.

  • पाली भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश करावा, यासाठी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी एक खासगी विधेयक मांडण्याचा प्रस्ताव केला आहे.
  • बहुतेक बौद्ध तत्त्वज्ञान हे पाली भाषेत आहे. पाली ही तत्कालीन सर्वसामान्य माणसांची भाषा होती आणि आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी गौतम बुद्धांनी पाली भाषेत आपले तत्त्वज्ञान सांगितले.
  • तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी किंवा अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही ग्रामीण भागातील किंवा गरीब विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय म्हणून पाली भाषा घेता येत नसल्याचे मुणगेकर यांनी नमूद केले आहे.
  • या बाबी लक्षात घेऊनच आता खासगी विधेयकाद्वारे या भाषेला अधिकृत दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्याचे या निवेदनात म्हटले आहे. सध्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांचा समावेश आहे.

  • तेलंगणामध्ये सध्या सत्तेवर असलेल्या तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) अध्यक्षपदी के. चंद्रशेखर राव यांची पुन्हा निवड करण्यात आली.
  • तेलंगणचे गृहमंत्री नैनी नरसिम्हा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. टीआरएसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राव यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अध्यक्षपदी राव यांची निवड झाल्याची घोषणा नरसिम्हा यांनी केली.

    Chilli Volcano
  • चिलीमधील कालबुको ज्वालामुखीचा बुधवारी २ वेळा उदेक झाला. हा देशातील ९० सक्रीय ज्वालामुखींपैकी तिसरा सर्वाधिक घातक ज्वालामुखी आहे.
  • गेल्या ४३ वर्षांपासून हा ज्वालामुखी निद्रिस्त अवस्थेत होता. याची उंची ६५६२ फुट आहे.
  • चिलीच्या आसपास ५०० सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यांना पॅसिफिक रिम ऑफ फायर म्हणून ओळखले जाते.

चालू घडामोडी : २४ एप्रिल २०१५


  • २४ एप्रिल : राष्ट्रीय पंचायत राज दिन
  • २४ एप्रिल १९७३ : सचिन तेंडुलकर जन्मदिन

  • भारत आणि फ्रांस दरम्यान १० दिवसाचा संयुक्त नाविक सराव २३ एप्रिल रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर सुरु झाला.
  • या सरावाला ‘वरूण’ असे नाव देण्यात आले.

  • नेट न्यूट्रॅलिटीच्या समर्थनार्थ ‘सेव्ह द इंटरनेट’ नावाने राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, भारतीय दूरसंचार नियामक मंडळाकडे (ट्राय) दर मिनिटाला सरासरी ५० ई-मेल प्राप्त होत आहे. 
  • देशभरातील ४० पेक्षा अधिक व्यावसायिक ‘सेव्ह द इंटरनेट’ नावाची मोहीम राबवीत आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम केवळ इंटरनेटच्या साहाय्याने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोशल नेटवर्किंग साइट्‌सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. 
  • दूरसंचार मंत्रालयाने नेट न्यूट्रॅलिटीबाबत स्वतंत्र समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल ९ मे रोजी अपेक्षित आहे.

  • भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती (वय ३७) हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले असून, उपाध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात विवेक मूर्ती यांचा शपथविधी झाला. अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे इन्चार्ज असणारे विवेक मूर्ती या पदावर असणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत.
  • फोर्ट मायर येथील लष्करी तळावर झालेल्या या समारंभात मूर्ती यांनी पदाची शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली. ओबामा प्रशासनातील ते सर्वात उच्च पदावरील भारतीय अधिकारी ठरले आहेत.

    Tipu sultan sword
  • ‘बोनहॅम्स इस्लामिक अँड इंडियन आर्ट सेल’ या संस्थेने २१ एप्रिल रोजी टिपू सूलतानशी संबंधित ३० गोष्टींचा लिलाव केला होता.  त्यातून साठ लाख पौंडांची विक्रमी किंमत मिळाली.
  • टिपूच्या रत्नजडित व्याघ्रमूठ असलेल्या शाही तलवारीस तब्बल सहापटीने अधिक म्हणजे २१ लाख ५४ हजार ५०० पौंड एवढी किंमत मिळाली या तलवारीस ६० हजार ते ८० हजार पौंड एवढी किंमत मिळणे अपेक्षित होते. 
  • याशिवाय टिपूच्या आवडत्या तोफगाड्याचाही या वेळी लिलाव करण्यात आला. यासाठी ‘बोनहॅम्स’ने ४० ते ६० हजार पौंडांची मर्यादा ठेवण्यात आली होती, त्यालाही अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे १४ लाख २६ हजार ५०० पौंड एवढी किंमत मिळाली. 
  • तसेच, टिपू वापरत त्या लघू पल्ल्याच्या बंदुकीचाही या वेळी लिलाव करण्यात आला, तिला ७ लाख पौंडांची किंमत मिळाली.

  • पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदूंना भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाइन व्हिसा सुविधा सुरू केली आहे. 
  • पाकिस्तानमधील हिंदूंना यापूर्वी भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. व्हिसा मिळण्यासाठी यामुळे वेळ लागत होता. अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व्हिसा मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
  • १ ऑगस्ट २०१५ नंतर कागदपत्रे जमा करून व्हिसा मिळविण्याची सुविधा बंद होणार आहे. त्यानंतर केवळ ऑनलाइन सुविधेचा वापर करता येणार आहे.

  • बिहारमधील डुमराव राजघराण्याची बदनामी करण्यात आल्याचा आरोपामुळे चेतन भगत यांचे ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे पुस्तक सध्या चर्चेत आले आहे.
  • या कादंबरीत डुमरावच्या राजघराण्याविषयी वादग्रस्त लिखाण असून, बिहारमधील जनतेला इंग्रजी येत नसल्याचे म्हटले आहे. तसेच घराण्यातील पुरुषांना नकारात्मक पद्धतीने चित्रित करण्यात आले असून वास्तव मांडण्याचे सोडून चुकीचे आणि बदनामी करणारे लिखाण केल्याचा आरोपही या राजघराण्याचे युवराज चंद्रविजयसिंह यांनी केला आहे. 
  • याविरुद्ध चेतन भगतविरुद्ध एक कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करण्यात आला आहे.
  • चेतन भगत यांनी सारे आरोप फेटाळून लावत या कादंबरीत उल्लेख करण्यात आलेल्या कुटुंबाचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.
  • डुमराव घराण्याचा इतिहास 
    • डुमराव घराण्याचा पहिला राजा नारायणमल होता. ते १६०४ ते १६२२ दरम्यान शासक होते. त्यानंतर त्यांचे वंशज होऊन गेले. या घराण्याचे वंशज म्हणून आजही कमलसिंह हयात आहेत. त्यांचा १३ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्याभिषेक झाला होता. ते या घराण्याचे पंधरावे वंशज आहेत.

  • न्यूझीलंड देशास शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का बसला. अमेरिकेच्या भूकंपमापन संस्थेनुसार, ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्रस्थान दक्षिण न्यूझीलंडमधील कैकौरा शहरापासून ६६ किमी अंतरावर, सुमारे ५५ किमी खोलीवर होते. या भूकंपाची खोली जास्त असल्याने न्यूझीलंडमध्ये मोठी जीवितहानी वा वित्तहानी टळली. 
  • न्यूझीलंड हा देश ‘रिंग ऑफ फायर’ या नावाने जगामध्ये ओळखल्या जात असलेल्या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतो. या देशास वर्षामधून सुमारे १५ हजार भूकंपाचे धक्के जाणवतात.

  • दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्‌स याची पत्नी मिलानी जेने हिने येथील सांताक्रूझ येथील एका हॉस्पिटलमध्ये कन्येला जन्म दिला. भारतात जन्म झाल्यामुळे व आयपीएल क्रिकेटचा हंगाम सुरू असल्याने दांपत्याने कन्येचे नाव ‘इंडिया‘ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • सौदी अरेबिया सरकारने एका भारतीय नागरिकास शिरच्छेदाची शिक्षा केली आहे. सजदा अन्सारी या भारतीय नागरिकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्‍यात हातोडा घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी त्याला दोषी ठरवत ही शिक्षा देण्यात आली आहे. 
  • सौदी अरेबिया सरकारने या वर्षी आतापर्यंत ६५ जणांना शिरच्छेदाची शिक्षा केलेली आहे. गेल्यावर्षी हीच संख्या ८७ इतकी होती. 
  • सौदीतील इस्लामिक शरियत कायद्यानुसार खून, बलात्कार, अमली पदार्थांची देवाणघेवाण, शस्त्रास्त्रांची चोरी व धर्मांतर या गुन्ह्यांमध्ये शिरच्छेदाची शिक्षा करण्यात येते.

    Viber
  • ‘व्हायबर’ या इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉईस कॉलिंगची सेवा देणाऱ्या कंपनीने भारतामध्ये ४ कोटी युजर्सचा आकडा गाठला आहे. 
  • व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) अर्थात व्हॉईस कॉलिंगच्या सेवेसाठी भारतामध्ये ‘स्काईप’ लोकप्रिय आहे. परंतु स्काईपला आपली प्रमुख स्पर्धक मानणाऱ्या व्हायबरनेही भारतामध्येही आपले जाळे वाढविण्यास भर दिला आहे.

चालू घडामोडी - २३ एप्रिल २०१५


  • २३ एप्रिल : जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन  (World Book & Copyright Day)

  • व्यावसायिक वाद-विवाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या न्यायालयाअंतर्गत ९० दिवसांच्या आत व्यावसायिक वाद-विवादांबाबत निर्णय देण्यात येणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यावसायिक न्यायालय (कमर्शियल कोर्ट) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. व्यावसायिक न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत जलद होईल असा विश्वास व्यक्त जात आहे.
  • तपास आणि चौकशीस सहकार्य न करण्याऱ्या पक्षावर दंड आणि कारवाई करण्यात येणार आहे. व्यावसायिक न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि कार्यकाळ २ वर्षांचा असेल.
  • देशभरात सध्या १६ हजार ८८४ व्यावसायिक खटले प्रलंबित पडले आहेत.

  • दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदी सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर आयोजित शेतकऱ्यांच्या सभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच हजारोंच्या जमावादेखत राजस्थानातील गजेंद्रसिंह (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • या प्रकाराचा सखोल तपास करण्याचे निर्देश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना दिले.
  • मृत गजेंद्रसिंह राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत तो याच सभेत आत्महत्या करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याने या चिठ्ठीत अखेरीस ‘जय जवान, जय किसान’ असे म्हटले आहे. आपली शेती उद्‌ध्वस्त झाल्याने वडिलांनी आपल्याला घरातून बाहेर काढले. आपल्याला ३ मुले आहेत. आपण बर्बाद झालो आहोत व आपल्याला घरी जाण्याचा उपाय सांगा, असे त्याने त्यात म्हटले आहे.
  • केजरीवाल यांनी गजेंद्रसिंह याच्या कुटुंबीयांना १ कोटीची मदत तेथेच जाहीर केली.

    Juveniles Justice
  • बलात्कार व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील संशयितांचे वय १६ ते १८ वर्षांच्या दरम्यान असले तरी त्यांच्यावर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणेच खटला भरण्याची व कठोर शिक्षेचीही तरतूद असलेल्या कायदा दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
  • त्याचप्रमाणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस्‌ कायदा दुरूस्तीलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे कायद्याला मंजुरी मिळाल्यावर गंभीर गुन्हे करणाऱ्या बालगुन्हेगारांवरही भारतीय दंडविधानानुसार खटला चालवता येईल.
  • दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर बालगुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर आणण्याची मागणी पुढे आली होती. महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी या विधेयकातील दुरुस्तीबाबत विशेष आग्रही होत्या. मात्र त्यासाठी सध्याच्या ज्युवेनाईल जस्टीस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन-२०१४) कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक आणावे लागणार होते.
  • मोदी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असला तरी यापूर्वी दोनदा हे दुरुस्ती विधेयक मंत्रिमंडळासमोर येऊन माघारी गेले होते. बालहक्कांसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था याच्या विरोधात होत्या. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांनीही बालगुन्हेगार कायद्यातील प्रस्तावित वय बदलाबाबत प्रतिकूल मतप्रदर्शन केले होते.

  • देशात २०१५ या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला. यंदा सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
  • नैर्ऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस ९६ टक्क्यांचीही सरासरी गाठू शकणार नाही.
  • विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री : डॉ. हर्षवर्धन

  • फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे युरोपीय देशांनी आंबा व भाजीपाला आयातीवर गतवर्षी बंदी घातली होती; परंतु यावर्षी अशाप्रकारे परदेशी आंबा निर्यातीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाने कोकणातील पाच जिल्ह्यांसह तेरा जिल्ह्यात ‘मॅंगोनेट’ची अंमलबजावणी केली.
    • निर्यादाराला थेट आंबा बागायतदारांशी ऑनलाइन जोडून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
    • मध्यस्थांना बाजूला काढून रास्त दरात निर्यातदारांना आंबा मिळेल आणि त्याचा थेट फायदा बागायतदारांना होईल, अशी व्यवस्था यातून केली गेली.
    • तसेच परदेशात आंबा निर्यातीसाठी नियम पाळावे लागतात. त्याची अंमलबजावणी कशी केली जाते. याची माहिती मॅंगोनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली गेली. त्यासाठी बागायतदारांचे प्रशिक्षणही घेतले होते. त्याचा फायदा या मोसमात दिसून येत आहे.
    • आतापर्यंत सुमारे ५५ ते ६० टन आंबा युरोपला निर्यात गेला आहे.

  • प्रख्यात गीर अभयारण्यातील सिंहांची गणना दोन ते पाच मेदरम्यान केली जाणार आहे. भारतात दर पाच वर्षांनी सिंहगणना करण्यात येते. 
    Gir Wildlife sanctuary
  • २२ हजार चौरस किलोमीटर परिसरात ही गणना होईल. २०१० मध्ये झालेल्या गणनेत दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्र होते. तेव्हा तीन जिल्ह्यांत गणना झाली होती; यंदा आठ जिल्ह्यांत होईल.
  • आशियाई सिंहांचे देशातील हे एकमेव आश्रयस्थान आहे. अन्नाच्या, म्हणजे भक्ष्याच्या शोधात गीरमधील सिंह किनारपट्टी तसेच सौराष्ट्रातील राखीव जंगलप्रदेशात जात असल्यामुळे गणनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
  • २०१०च्या गणनेत माद्या व छाव्यांसह ४११ सिंहांची नोंद झाली होती.
  • वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा अशी मागणी गुजरातमधील राज्यसभा खासदार परिमल नटवानी यांनी नुकतीच केली आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. १९५२-१९७२ या काळात सिंहच भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. मात्र, वाघांची संख्या वेगाने घटल्यामुळे नंतर केंद्र सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केले.

  • रेल्वे मंत्रालयाकडून युटीएस मोबाइल (utsonmobile) तिकिट अॅप अपडेट करण्यात आले आहे. या अॅपद्वारे रेल्वेचे अनारक्षित तिकीट काढणे अगदी सोपे होणार असून रांगांमध्ये उभे राहाण्याच्या त्रास वाचणार आहे.
  • ज्यामुळे आता अॅपवर तिकीट बूक करून टिसींना केवळ मोबाइलवरील तिकीट दाखवावे लागेल. यामुळे प्रवाशांना पेपरलेस तिकीट सुविधा मिळणार आहे.
  • तसेच या अॅपचे वैशिष्ट म्हणजे या अॅपसाठी जीपीएस सिस्टिमचा आधार घेण्यात आला आहे. जेणे करून तिकीट कोणत्या ठिकाणापासून काढले हे आहे हे ट्रॅक करता येईल.

  • नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसला बहुमत मिळाले असून १९ पैकी १२ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
  • तीन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर दोन ठिकाणी भाजप आणि दोन जागा अपक्षांनी पटकावल्या आहेत.

    3 Gorkha Rifles
  • युद्धभूमीमध्ये शत्रुराष्ट्राच्या सैनिकांना चारीमुंड्या चित करणाऱ्या तिसऱ्या गोरखा रेजिमेंटमधील पहिली तुकडी दोनशेव्या वर्षात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या तुकडीमध्ये कुमाऊँ आणि गढवाल भागातील सैनिकांचाही मोठ्या प्रमाणावर भरणा आहे.
  • सर रॉबर्ट कलकोहान यांनी उत्तरांचलच्या अल्मोडा भागामध्ये २४ एप्रिल १८१५ रोजी स्वतंत्र गोरखा रेजिमेंटची स्थापना केली होती.
  • सध्या गोरखा रेजिमेंटकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील आघाडीची धुरा सोपविण्यात आली आहे. याच रेजिमेंटला ‘१/३ गोरखा रायफल्स’ या नावाने ओळखले जाते.
  • या रेजिमेंटने आतापर्यंत दोनशेपेक्षाही अधिक पदके आणि पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये अशोक, कीर्ती आणि शौर्यचक्राचा समावेश असून पद्मभूषण हा प्रतिष्ठित नागरी सन्मान देखील या रेजिमेंटच्या वाट्याला आला आहे.
  • गोरखा रेजिमेंटप्रमाणेच मद्रास आणि ग्रेनेडियर्स रेजिमेंट (१७५८), पंजाब रेजिमेंट (१७६१), राजपुताना रेजिमेंट (१७७५), राजपूत रेजिमेंट (१७७८), जाट रेजिमेंट (१७९५) आणि कुमाऊँ रेजिमेंट (१८१३) यांनाही प्राचीन, गौरवशाली इतिहास लाभला आहे.

  • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला ब्रिटीश मानक संस्थेकडून (British Standard Institutes)   ISO ९००१:२००८ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

चालू घडामोडी - २२ एप्रिल २०१५


    Google Doodle World Earth Day
  • २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन (पृथ्वी दिन)
  • लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने आपले वैशिष्ट्य कायम ठेवत जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण डुडल सादर केले आहे. 
  • तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून जागतिक वसुंधरा दिनाचे स्मरण घडविण्याचे हेतूने ‘तुम्ही कोणत्या प्रकारचे प्राणी आहात?’ असे म्हणत एक छोटीशी प्रश्नावलीही सादर केली आहे.
  • १९७० पासून सुरु झालेल्या या ४५व्या वसुंधरा दिनाची थीम ‘इट्स अवर टर्न टू लीड’ अशी होती.

    Mohammad Morsi
  • इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष महंमद मोर्सी यांना कैरो येथील न्यायालयाने वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सत्तेवर असताना निदर्शकांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इजिप्तच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या अध्यक्षांविरुद्ध गेलेला हा पहिलाच निकाल आहे. 
  • मोर्सी यांच्याबरोबरच मुस्लिम ब्रदरहूड या कट्टर इस्लामवादी संघटनेच्या बारा मोठ्या नेत्यांनाही या वेळी वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, काल झालेल्या एका सुनावणीदरम्यान मुस्लिम ब्रदरहूडच्या २२ समर्थकांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • इजिप्तचे अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळलेल्या होस्नी मुबारक यांची सत्ता गेल्यानंतर मोर्सी हे अध्यक्ष झाले होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध जनतेत प्रचंड नाराजी असल्याने २०१२ मध्ये त्यांच्या अध्यक्षीय प्रासादाबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. या वेळी त्यांनी दिलेल्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत १० जणांचा मृत्यू झाला होता.
  • त्यांच्याविरुद्ध हेरगिरी, २००१ मध्ये झालेल्या क्रांतीच्या वेळी तुरुंग फोडून पळणे, न्यायालयाचा अवमान करणे आणि गोपनीय कागदपत्रे कतार या देशाला देणे, असे गुन्हे दाखल आहेत. 

    Xi jinping conferred Nishan-e-pakistan-award
  • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानच्या पहिल्या भेटीत सार्वकालिक मित्र असणाऱ्या पाकिस्तानशी ५१ करार केले असून त्यात महत्त्वाचा असा अब्जावधी डॉलरचा आर्थिक कॉरिडॉरचा करारही आहे. या कराराचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्याने या भागात भारताच्या शेजारी चीनचा प्रभाव वाढणार आहे.
  • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३ हजार कि.मी. लांबीच्या पाक - चीन आर्थिक कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. हा महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणजे पाक व चीन या दोन देशातील जवळीक वाढविणारा करार आहे. 
  • १९७९ साली चीनने पाकला जोडणारा काराकोरम हायवे बांधला. त्यानंतरचा हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यामुळे चीन व पाकिस्तान यांच्यातील अंतर कमी होणार आहे. चीनकडून ऊर्जा उत्पादनासाठी साहित्य आयात करणे पाकला यामुळे सोपे जाणार आहे.
  • अध्यक्ष क्षी जिनपिंग व त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांचे रावळिपडी येथे नूरखान विमानतळावर उतरल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाझ शरीफ, लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ व मंत्रिमंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. विमानतळावर जिनपिंग यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
  • जीनपिंग यांच्या विमानाला जेएफ १७ थंडर जेट्सचे संरक्षण देण्यात आले होते. ही जेटविमाने पाकिस्तानने चीनच्या मदतीनेच तयार केलेली आहेत. 
  • पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जिनपिंग यांना पाकिस्तानचा ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

  • पुलित्झर पुरस्कार २०१५
  • पत्रकारिता क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली असून न्यूयॉर्क टाइम्सने तीन पुरस्कार पटकावले आहेत. तर अमेरिकेतील फर्ग्युसनने मिसुरीतील वांशिक दंगलींच्या वृत्तांकनासाठी ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी अवॉर्डवर मोहोर उमटवली आहे.
  • पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीबद्दलच्या वृत्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला. लॉबींच्या दबावाचा आढावा घेणाऱ्या वार्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सच्याच एरिक लिप्टन या पत्रकाराने पटकावला, तर याच वृत्तपत्रासाठी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या डॅनियल बेरेहुलक याने इबोलासंदर्भातील फ्युचर फोटोग्राफीबद्दल या पुरस्कारावर मोहोर उमटवली. 
  • लॉस एन्जल्स टाइम्सने लेख तसेच टीकात्मक लेखाबद्दल दोन पारितोषिके पटकावली, याशिवाय अमेरिकेतील दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन पोस्टलाही प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
  • कादंबरीसाठीच्या पुलित्झर पुरस्कार अँटोनी डोएर यांना (‘ऑल दि लाइट वुई कॅननॉट सी’ या कादंबरीसाठी) तर, चरित्रासाठीचा पुलित्झर पुरस्कार डेव्हिड कर्टझर यांना त्यांच्या ‘द पोप अँड मुसोलिनी: दि सिक्रेट ऑफ पायस इलेवन्थ अँड दि राइज ऑफ फॅसिझम इन युरोप’या पुस्तकासाठी जाहीर झाला.

  • रेल्वे बजेट तसेच भारतीय रेल्वेच्या प्रकल्पांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन निरीक्षण प्रणाली ‘ई-समीक्षा’चे २१ एप्रिल रोजी उद्घाटन केले.
  • ‘ई-समीक्षा’ सॉफ्टवेयरची निर्मिती एनआयसी (National Informatics Centre)ने केली आहे.
  • सध्या या प्रणालीचा उपयोग मंत्रिमंडळ सचिवालय, प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर मंत्रालयांद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांवर लक्ष्य ठेवण्य्साठी केला जात आहे.

  • जपानच्या ‘मॅग्लेव्ह’ रेल्वे गाडीने आज ताशी तब्बल ६०० किलोमीटरने (ताशी ३७३ मैल) धाव घेत वेगाचा विक्रम मोडला. माउंट फुजीच्या परिसरात ही चाचणी करण्यात आली.
  • ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञानावर धावणाऱ्या सात डब्यांच्या या गाडीने चाचणीदरम्यान ताशी ६०३ किलोमीटरचा सर्वोच्च वेग गाठला. सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने ही गाडी ११ सेकंद धावली. 
  • गेल्या आठवड्यात या कंपनीच्या गाडीने ताशी ५९९ किलोमीटर वेगाने धाव घेत २००३ मधील ताशी ५८१ किलोमीटर वेगाचा स्वतःचा विक्रम मोडला होता.
  • टोकियो आणि मध्य जपानमधील नागोया शहरांदरम्यान २०२७ पर्यंत या गाडीची नियमित सेवा सुरू होण्याची अपेक्षा असून, या दोन शहरांतील २८६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत कापले जाईल.
  • सध्या धावणाऱ्या ‘शिंकानसेन’ (बुलेट ट्रेन) गाड्यांपेक्षा हा वेळ निम्म्याने कमी असेल. टोकियो-ओसाकदरम्यान २०४५ पर्यंत या गाड्यांची सेवा सुरू होण्याचा अंदाज असून, प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल.
  • ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञान : ‘मॅग्लेव्ह’ प्रणालीत चुंबकीय शक्तीचा वापर केला जातो. ‘मॅग्लेव्ह’ तंत्रज्ञानावर धावणाऱ्या गाड्या लोहमार्गाच्या दहा सेंटिमीटर (चार इंच) वरून चालतात आणि विजेवर चालणाऱ्या लोहचुंबकांतून त्यांना ऊर्जा दिली जाते. उच्च वेगातही शांतपणाने पुढे जाण्याची क्षमता या प्रणालीत आहे.
  • सध्याच्या वेगवान गाड्या 
    1. सीआरएच ३८० ए (चीन) - चाचणीच्या वेळचा वेग ४८० किलोमीटर. सध्याचा वेग ताशी ३८० किलोमीटर. शांघाय-नानजिंग आणि शांघाय-होंगझोऊ या मार्गांवर ही गाडी धावते. 
    2. टीआर-०९ (ट्रान्सरॅपिड) (जर्मनी) - ताशी पाचशे किलोमीटर वेगाने ही मोनोरेल धावू शकते, पण तिचा वेग सध्या ताशी ४५० किलोमीटर ठेवण्याचा विचार सुरू आहे. 
    3. शिंकानसेन किंवा बुलेट ट्रेन (जपान) - या रेल्वेगाड्या ताशी ४४३ किलोमीटरच्या वेगाने धावू शकतात. ‘ई-५’ मालिकेतील या गाड्या सध्या ताशी ३२० किलोमीटरच्या वेगाने धावतात.

  • सौदी अरेबिया आणि मित्र फौजांकडून येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरुद्ध गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले हवाई हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • आता येथे शांतता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी राजकीय मार्ग अवलंबिण्यात येणार आहे. 
  • अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या येमेनी अध्यक्षांना हौती बंडखोरांनी पद सोडून जाण्यास भाग पाडले होते. त्यामुळे येमेनमध्ये युद्धजर्जर परिस्थिती निर्माण झाली होती. 
  • सौदीसह गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या दहा देशांच्या आघाडीने येथे हवाई हल्ले सुरू केले होते. आता हे हल्ले थांबविण्यात आले असून, हौती बंडखोरांना पाठिंबा असलेल्या इराणनेही याची स्वागत केले आहे.

  • तेहरिके तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने ‘उमर १’ या स्वनिर्मित क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी दहशतवादाशी सामना करण्यासंदर्भात पाकिस्तानची आजच पाठ थोपटली असताना ही चाचणी झाली आहे. 
  • तेहरिके पाकिस्तान तालिबानने (टीटीपी) क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे निवेदन प्रसिद्ध केले असून, अधिक पुरावा म्हणून चाचणी घेतानाचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. 
  • ‘टीटीपी’चे पाकिस्तानात सर्वत्र अस्तित्व आहे. मात्र अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या वाजिरिस्तान भागात सैन्याकडून दहशतवाद्यांवर वारंवार कारवाई होत असते. त्यामुळेच त्यांनी केलेली ही चाचणी पाकिस्तानला मोठा धक्का देणारी आहे.
  • ‘उमर १’ची रचना हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे ‘टीटीपी’ने सांगितले. ‘परिस्थितीनुसार हे क्षेपणास्त्र तत्काळ जुळविताही येते आणि त्याचे भागही वेगळे करता येतात. याची परिणामकारकता पाहून शत्रूला आश्चर्य वाटेल. देवाच्या कृपेने आमचे शत्रू लवकरच पळ काढताना दिसतील,’ अशी दर्पोक्ती ‘टीटीपी’चा प्रवक्ता महंमद खुरासनी याने केली आहे. 
  • ‘टीटीपी’कडे याहून संहारक क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता असल्याचेही त्याने सांगितले. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आम्ही आत्मघाती पथकांना प्रशिक्षण देत आहोत, असेही तो म्हणाला.

  • इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.
  • मार्चमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता; मात्र त्याची प्रकृती आता सुधारत आहे. यामुळे मागील महिनाभर ‘इसिस’च्या दैनंदिन कामकाजापासून बगदादी दूर असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

चालू घडामोडी - २१ एप्रिल २०१५


  • येमेनची राजधानी सानामधील परिस्थिती सातत्याने बिघडत असल्याने भारताने आपला साना येथील दूतावास येमेनजवळील जिबुती येथे हलविला आहे. 
  • येमेनमधील भारतीयांची सुटका करताना जिबुती देशाची मोठी मदत झाली असल्याने भारताने दूतावासासाठीही पुन्हा हाच देश निवडला आहे. 
  • भारताच्या ‘राहत’ मोहिमेअंतर्गत ४,७४१ भारतीय आणि १,९४७ विदेशी नागरिकांना हवाई आणि जलमार्गाने सोडविण्यात आले आहे. अत्यंत अवघड परिस्थितीत पार पाडलेल्या या मोहिमेचे आंतरराष्ट्रीय समुदायानेही कौतुक केले आहे.

    Former Odisha CM Janaki Ballabh Patnaik passes away
  • ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व आसामचे माजी राज्यपाल जानकी वल्लभ पटनाईक (वय ८९) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • पटनायक हे तीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. ओडिशा सरकारने  त्यांच्या निधनामुळे एक आठवडय़ाचा दुखवटा जाहीर केला. 
  • जानकी वल्लभ पटनाईक हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते व त्यांनी साहित्य व संस्कृतीत योगदान दिले होते. 
  • त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२७ रोजी झाला. १९८० ते १९८९ दरम्यान ते ओडिशाचे मुख्यमंत्री होते. १९९५ मध्ये ते पुन्हा सत्तेवर आले व नंतर १९९९ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. 
  • ते केंद्रात कॅबिनेट मंत्रीही होते व नंतर २००९ मध्ये आसामचे राज्यपाल झाले. 
  • त्यांचे शिक्षण खुर्दा हायस्कूल येथे झाले. १९४७ मध्ये त्यांनी उत्कल विद्यापीठातून संस्कृतमध्ये बीए केले व नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून १९४९ मध्ये राज्यशास्त्रात एमए केले.

  • पाकिस्तान व चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ (रंडी) असे नाव दिले आहे. 
  • हिंदी भाषेत वेश्या व्यवसाय करत असलेल्या स्त्रीला रंडी असे म्हणत असल्याने ट्विटरवरून या नावाची खिल्ली उडविण्यात आली.
  • ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’चे दोन अध्यक्ष असणार आहेत. माजी मंत्री मादमी झाओ बैग व सिनेटर मुशाहिद हुसेन हे अध्यक्ष असतील.

  • गुगलने आपल्या सर्च इंजिनवर घेतलेला शोध डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
  • या सुविधेमुळे गुगलवर गेल्या तीन वर्षांपासून दररोज घेण्यात आलेला शोध पाहणे आणि डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. 
  • यापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर यापूर्वीच अपलोड केलेली विविध प्रकारची माहिती डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जुन्या वाहनांना बंदी घालण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 
  • उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशांचीच पुनरावृत्ती हरित लवादाने केली असल्याने त्यात चूक नाही, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. 
  • पेट्रोल अथवा डिझेलवर चालणाऱ्या १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांना दिल्लीतील रस्त्यांवर परवानगी नाही आणि अशा गाड्या आढळल्यास प्रशासनाने कायद्याचा आधार घेत या वाहनांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने निकाल देताना सांगितले. 
  • वाहनांना बंदी घालणे हरित लवादाच्या अखत्यारित येत नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता. तसेच, वाहनाच्या वयापेक्षा त्याची स्थिती पाहून त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांचे म्हणणे होते.

  • ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने लीबियाच्या किनाऱ्यावर ३० ख्रिश्चनांची हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. 
  • हत्या करण्यात आलेले हे युरोपमध्ये जाण्यासाठी निघालेले स्थलांतरित असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

  • आफ्रिकेमधील कॉंगो देशामधून लाओस या दक्षिण पूर्व आशियामधील देशामध्ये पाठविण्यात येणारा चार टन हस्तिदंताचा साठा थायलंडमध्ये पकडण्यात आला. 
  • हस्तिदंताचा साठा अवैधरित्या कॉंगोमधून पाठविण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या साठ्याची किंमत किमान ६० लाख डॉलर्स इतकी आहे. 
  • हस्तिदंतांचा हा साठा लाओसमध्ये पोहोचल्यानंतर चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमधील व्यापाऱ्यांना वाटण्यात येणार होता. हा साठा आता नष्ट केला जाणार आहे.
  • थायलंडवर हस्तिदंतांची तस्करी रोखण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय दबाव आहे. यामध्ये अपयशी ठरल्यास थायलंडवर निर्बंध लादले जाण्याचीही शक्यता आहे. 
  • या पार्श्वभूमीवर थायलंडने राष्ट्रीय हस्तिदंत योजना कार्यक्रम सुरु केला असून; आत्तापर्यंत या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमधून १५० टन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहे.

चालू घडामोडी - १९ व २० एप्रिल २०१५


  • ‘जातीवाचक शिवीगाळ’ (ऍट्रॉसिटी) केल्याची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, असे खटले जलदगतीने चालविले जावेत तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर पायबंद बसण्यासाठी राज्यात आठ ठिकाणी विशेष न्यायालये सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती सी. एम. थूल यांनी दिली. 
  • राज्यातील आठ महसुली शहरांपैकी नागपूर व मुंबई येथे अशी विशेष न्यायालये सुरू झाली आहेत. भविष्यात अन्य सहा ठिकाणीही न्यायालये सुरू होतील.

    sitaram yechuri
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, सोळा जणांची पॉलिट ब्युरो म्हणून, तर ९१ जणांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे (सेन्ट्रल कमिटी) सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. 
  • विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पक्षाच्या २१ व्या कॉंग्रेस बैठकीत येच्युरी यांची सरचिटणीसपदाचे उमेदवार म्हणून मावळते सरचिटणीस प्रकाश कारत यांनी घोषणा केली.

  • बॉलिवूडमधील एव्हरग्रीन चित्रपटांमध्ये समावेश असलेला ‘शोले’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे ४० वर्षांनी शुक्रवारी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला. 
  • पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट हे पूर्वी व्हीसीआरवर दाखविण्यात येत होते. त्या वेळी भारतीय चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये स्थान नव्हते. 
  • पण, आता सुमारे ४० वर्षांनी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट कराचीतील न्यूप्लेक्स या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 
  • जिओ फिल्म्स आणि मंडीवाला एंटरटेन्मेंट यांनी हा चित्रपट पाकिस्तानमध्ये आता प्रदर्शित केला असून, याच्या ग्रॅंड प्रीमियरला पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

  • ‘आधार कार्ड’ किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सादर करूनही ‘पॅन’ काढण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने उपलब्ध करून दिली आहे. 
  • ‘पॅन’ काढण्यासाठीची काहीशी किचकट प्रक्रिया सोपी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

  • संयुक्त राष्ट्रसंघाची ‘थिंक टॅंक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ने ‘ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर- २०१४’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या निर्मितीमध्ये भारत पाचव्या स्थानावर जाऊन पोचला आहे.  
  • मागील वर्षभराच्या अवधीमध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये ३२ टक्के एवढा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार झाला असून अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारताचा क्रमांक लागतो.
  • मागील वर्षभरात देशभर १.७ दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची निर्मिती झाली असून पुढील तीन वर्षांमध्ये देशातील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढणार असल्याचे हा अहवाल सांगतो.
  • आर्थिकदृष्ट्या मागासलेला खंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकेमध्ये मात्र ई-कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे फक्त १.९ दशलक्ष टन एवढे नगण्य असल्याचे दिसून आले.
  • इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संपर्कात आल्याने कर्करोग, यकृताचे आजार, मूत्राशयाचे रोग होण्याचे प्रमाण बळावते, असे हा अहवाल सांगतो.

  • जगभरातील अनेक देशांमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणांच्या आधारे ब्रॉडबँड विस्ताराचे प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे. त्यामध्ये भारताचा १२५ वा क्रमांक लागतो. भारताचे शेजारी राष्ट्र असणारे भूतान आणि श्रीलंका यांनीही ब्रॉडबँड विस्तारामध्ये आघाडी घेतली आहे.
  • वायरलेस ब्रॉडबँडमध्ये भारताचा जगभरातील देशांमध्ये ११३वा क्रमांक असून, विस्ताराचे प्रमाण १०० यूजरमागे ३.२ टक्के आहे.
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अध्यक्ष : राहुल खुल्लर

  • सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे पोलिस अधीक्षक विवेक प्रियदर्शी यांना आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंग प्रकरणच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची परवानगी दिली. 
  • हि चौकशी समिती स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामध्ये आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमन यांची चौकशी करेल.
  • सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश राजेंद्र मल लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. हि समिती राज कुंद्रा, गुरुनाथ मयप्पन, आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या शिक्षेसंबंधी निर्णय घेणार आहे.

  • बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर उतरलेल्या अंकित केशरी (वय २०) या बंगालच्या नवोदित क्रिकेटपटूचा झेल घेताना सहकारी खेळाडूशी धडक होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. 
  • ‘कॅब’ने (बंगाल क्रिकेट संघटना) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. अंकित ईस्ट बंगालकडून खेळत होता. 
  • भवानीपूर क्लबविरुद्धच्या लढतीसाठी अंतिम संघात त्याचा समावेश नव्हता. रेल्वेचा रणजीपटू अर्णब नंदी याच्याऐवजी तो मैदानावर उतरला होता.

  • भारतातील सरकारी क्षेत्रातील दूसरी सर्वात मोठी तेल उत्खनन कंपनी ऑईल इंडियाने गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये आपल्या ५४ मेगावॅट क्षमतेच्या पवन पवन उर्जा प्रकल्पाला सुरुवात केली.
  • दोन राज्यांच्या भागीदारीमध्ये असलेल्या या योजनेतील १६ मेगावॅट क्षमतेचा एक टप्पा गुजरात मधील पाटण येथे तर ३८ मेगावॅट क्षमेतेचा दुसरा मध्यप्रदेशमधील चंदगढ येथे असेल.
  • या योजनेचा एकूण खर्च ४३९ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये गुजरातमधील प्रकल्पाचा खर्च १२६.५ कोटी आणि मध्यप्रदेशमधील प्रकल्पाचा खर्च ३१२.४५ कोटी रुपये आहे.
  • या योजनेनंतर कंपनीची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता (व्यावसायिक पवन उर्जा आणि सौर ऊर्जा योजना) १२६.०० मेगावॅट झाली आहे.

  • आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीने (IPC) भारतीय पॅराऑलम्पिक समितीला अनिश्चित काळासाठी बरखास्त केले.
  • गाझियाबाद (दिल्ली) मध्ये २० ते २२ मार्च २०१५ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रीय पॅराऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीने हा निर्णय घेतला.
  • भारतीय पॅराऑलम्पिक समितीला बरखास्त करण्याची आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीची (IPC) हि दुसरी वेळ आहे.
  • यामुळे आता भारतीय पॅराऍथलिटला २०१६च्या रिओ दि जनेरो येथे होणाऱ्या पॅराऑलम्पिक स्पर्धा तसेच  आयपीसी पुरस्कृत कोणत्याच स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
  • यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय पॅराऑलम्पिक समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • भारताची वाय. प्रांजला हिने चीनच्या झेंग वूशुआंगचा पराभव करत आशियाई ज्यूनियर टेनिस स्पर्धा जिंकली.
  • प्रांजलाने झेंग वूशुआंगच्या साथीने आशियाई ज्यूनियर टेनिस दुहेरी स्पर्धेचे विजेतेपदहि मिळविले होते.