चालू घडामोडी = ३१ ऑगस्ट २०१५


केंद्रीय गृह सचिवपदी राजीव मेहर्षी

    L.C Goyal & Rajiv Mehrishi
  • केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला असून, त्यांच्या जागी राजीव मेहर्षी यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.
  • यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात गोयल यांच्याकडे अचानकपणे केंद्रीय गृहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गोयल हे केरळ केडरचे १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अनिल गोस्वामी यांना तडकाफडकी दूर करून त्याजागी गोयल यांना आणण्यात आले होते. २०१७ सालापर्यंत गोयल यांचा कार्यकाळ होता. मात्र त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आहे. 
  • मेहर्षी हे १९७८च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या वित्त विभागात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी ते या पदावरून निवृत्त होणार होते. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, त्यांच्याकडे गृहसचिव पदाची अतिरक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘संथारा’वर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती

  • जैन धर्मियांमध्ये पाळल्या जाणाऱ्या उपोषण करून देहत्याग करण्याच्या ‘संथारा’ विधीवर बंदी घालण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे जैन धर्मियांना दिलासा मिळाला आहे.
  • ‘संथारा’ अथवा ‘सल्लेखाना’ असेही नाव असलेल्या या विधीमध्ये जैन धर्मातील श्वेतांबर पंथाचे अनुयायी मरण पत्करण्यासाठी स्वेच्छेने उपवास करतात.
  • आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला आहे, अशी खात्री झाल्यानंतर ‘संथारा’ हा मोक्ष मिळवण्याचा अंतिम मार्ग असल्याची या अतिशय प्राचीन अशा विधीचे पालन करणाऱ्या श्वेतांबरपंथियांची समजूत आहे.
  • ‘संथारा’चे अनुसरण करणे हे आत्महत्या करण्यासारखेच असून असा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला जायला हवा. हे कृत्य भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ अन्वये (आत्महत्येला प्रवृत्त करणे) शिक्षेस पात्र आहे, असा निर्णय राजस्थान न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. सुनील अंबवानी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला होता.
  • न्यायालयाच्या या निकालाविरोधात जैन धर्मियांमध्ये नाराजीची भावना होती. विविध ठिकाणी जैन धर्मियांनी निषेध फेरीही काढली होती. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • संथारा व्रताबद्दल विस्तृत माहिती १३ ऑगस्टच्या चालू घडामोडींमध्ये वाचा.

भूसंपादन विधेयकासाठी नवीन अध्यादेश नाही

  • वादग्रस्त भूसंपादन विधेयकाची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत असल्याने आता सरकार त्याबाबत नव्याने अध्यादेश जारी करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’मध्ये जाहीर केले. 
  • शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या विधेयकामध्ये विविध सूचनांचा समावेश करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांच्या जोरदार विरोधामुळे अखेर सरकारने या विधेयकावरून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • बहुतांश विरोधी पक्षांनी, तसेच सत्ताधारी एनडीएच्या काही घटक पक्षांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे भूसंपादन विधेयक संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे सरकारने तीन वेळा या विधेयकाचा अध्यादेश जारी केला होता.
  • या विधेयकाची सध्या संसदेची संयुक्त समिती छाननी करत आहे. भूसंपादनाचा विषय घटनेमधील समवर्ती सूचीत असल्यामुळे या विषयावर कायदा करण्याचे काम राज्यांवर सोपवले जावे, अशी शिफारस नीती आयोगाने केल्यामुळे अध्यादेश पुन्हा जारी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’

  • भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेचे नामकरण ‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’ असे करण्यात आले आहे.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांना समर्पित करण्यात आलेल्या ‘फ्रीडम करंडका’साठी ही मालिका खेळविण्यात येईल. 
  • ‘स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हे भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधील समान सूत्र आहे. अहिंसा व असहकाराच्या आयुधांच्या सहाय्याने महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीमधून संपूर्ण जगाने प्रेरणा घेतली.
  • या पार्श्वभूमीवर, या दोन देशांसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्वे असलेल्या महात्मा व मदिबा यांना हा करंडक समर्पित करण्यात आला आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक वेस क्रेव्हन यांचे निधन

  • ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्टीट’ तसेच ‘स्क्रीम’ अशा प्रसिद्ध भयपटांमधून आपल्या दिग्दर्शनाचा अमीट ठसा उमटविणारे हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक वेस क्रेव्हन यांचे निधन झाले. त्यांना मेंदुचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ते ७६ वर्षांचे होते. 
  • १९८४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट’ हा चित्रपट व या चित्रपटामध्ये अभिनेता रॉबर्ट एनग्ल्युंड याने साकारलेले फ्रेडी क्रुगेर हे खलनायकाचे पात्र अत्यंत गाजले होते. या चित्रपाटाचे लेखन व दिग्दर्शन क्रेव्हन यांनी केले होते.

‘सहज’ एलपीजी ऑनलाइन बुकिंग उपक्रम

  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘सहज’ या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. 
  • यामुळे आता ग्राहकांना आता घरगुती वापराचा गॅस ऑनलाइन बुक करता येणार असून, त्यासाठीचे पैसेही ऑनलाइनच भरता येतील. केंद्र सरकारच्या www.mylpg.in या वेबपोर्टलवरून ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
 दोन किलोचे एलपीजी सिलिंडर 
  • स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडर उपलब्ध करून दिल्यानंतर आता सरकारने किराणा दुकानांमधून दोन किलोचे एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
  • एलपीजी सिलिंडर १४.२ किलोची असतात पण आता ते पाच व दोन किलोमध्ये उपलब्ध केले जात आहेत. १४.२ किलोच्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४१८ रुपये आहे ते गरिबांना परवडत नाही. पाच किलोच्या सिलिंडर २०१३ मध्ये सुरू करण्यात आले, त्याची किंमत १५५ रुपये आहे.

कर्जबाजारी देशांमध्ये भारत ३५वा

    India stands 35th among debt countries
  • सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात जीडीपीच्या तुलनेत प्रत्येक देशावर किती टक्के कर्ज आहे, याचा आढावा फोर्ब्ज नियतकालिकाने घेतला असून त्यात अशा कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा ३५वा क्रमांक लागला आहे.
  • कर्जाची टक्केवारी जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये जपानचा प्रथम क्रमांक लागला आहे. जपान हा ग्रीसपेक्षाही कर्जबाजारी असला तरी त्याची निर्यात सक्षम असल्याने त्याच्यावर ग्रीससारखी दिवाळखोरीची वेळ आलेली नाही, असे निरीक्षण फोर्ब्जने नोंदवले आहे. 
  • या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक कर्ज असलेले देश या आजमितीला सर्वात श्रीमंत देश समजले जात आहेत, याकडेही फोर्ब्जने लक्ष वेधले आहे.
  • कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिका (यूएसए), चीन व रशिया अनुक्रमे १६, २२ व ४३व्या क्रमांकावर आहेत. 

जैशाचा राष्ट्रीय विक्रम

  • महिलांच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या ओ.पी. जैशा आणि सुधा सिंग या अनुक्रमे १८ आणि १९व्या क्रमांकावर राहिल्या. जैशाने २ तास ३४ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
  • या आधीचा विक्रमही जैशाच्या नावावर होता. तिने मुंबई मॅरेथॉनमध्ये २ तास ३७ मिनिटे आणि २९ सेकंद अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. सुधाने २ तास ३५ मिनिटे व ३५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली.
  • या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या मेअर दिबाबाने सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. दिबाबाने २ तास २७ मिनिटे आणि ३५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. त्यापाठोपाठ केनियाच्या हेला किप्रोपने (२ तास २७ मि. व ३६ से.) रौप्य आणि बहारिनच्या युनाइस किर्वाने ब्राँझपदक मिळविले.

चालू घडामोडी - २९ व ३० ऑगस्ट २०१५

२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिवस) 

बाबासाहेबांच्या स्मरणार्थ १२५ रूपयाचे विशेष नाणे

  • पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली जाणार असून त्यानिमित्त केंद्र सरकारकडून बाबासाहेबांच्या स्मरणार्थ १२५ रूपये मुल्य असणारे विशेष नाणे जारी केले जाणार आहे. या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल.
  • याशिवाय, त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून एका टपाल तिकिटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

सानिया मिर्झाला प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान

    Sania Mirza conferred with Khelaratna
  • भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाचे नाव निश्चित केले होते. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला नोटीस पाठवत या निर्णयाला स्थगिती दिली होती.
  • पॅरालिंपियन लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या एच. एन. गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
  • यावेळी अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच ध्यानचंद पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता
सानिया मिर्झा
अर्जुन पुरस्कार विजेते
जितू राय (नेमबाजी)पी. आर. श्रीजेश (हॉकी)रोहित शर्मा (क्रिकेट)
दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स)अनुप कुमार (रोलरस्केटिंग)अभिलाषा म्हात्रे (कबड्डी)
मनजीत चिल्लर (कबड्डी)एम.आर. पूवम्मा (अॅथलेटिक्स)शरथ गायकवाड (पॅरासिलिंग)
सन्थोई देवी (वुशू)सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग)स्वर्णसिंग विर्क (रोइंग)
के. श्रीकांत (बॅडमिंटन)मनदीप जांगरा (बॉक्सिंग)बजरंग (कुस्ती)
बबिता (कुस्ती)संदीप कुमार (तिरंदाजी)
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते
अनुप सिंग (कुस्ती)नवल सिंग (पॅरालिंपिक)स्वतंत्रसिंग (मुष्टियुद्ध)
हरबन्स सिंग (ऍथलेटिक्स)निहार अमीन (जलतरण)
ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार
रोमियो जेम्स (हॉकी)प्रकाश मिश्रा (टेनिस)टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल)

कन्नड साहित्यिक डॉ. कलबुर्गींची हत्या

    M M Kalburgi
  • कन्नडमधील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट रोजी राहत्या घरात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते ७७ वर्षांचे होते.
  • डॉ. कलबुर्गी हे कन्नड साहित्य विश्वातील महत्वाचे लेखक होते. त्यांच्या पुस्तकांना राज्य आणि केंद्र साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले आहेत.
  • परखड मतांमुळे डॉ. कलबर्गी नेहमीच वादात राहिले होते. हिंदुत्ववादी संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा मत प्रदर्शीत केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात विश्व हिंदु परिषद, बजरंग आदी संघटनांनी निदर्शनेही केली होती.
  • डॉ. कलबुर्गी यांच्या ‘मार्ग ४’ या संशोधनात्मक लेखांच्या पुस्तकाला २००६ सालचा केंद्रिय साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. याशिवाय त्यांना राज्य साहित्य अकादमी, पंप पुरस्कार आणि यक्षगान पुरस्कार लाभला होता.
  • डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी हुबळी-धारवाड पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.

भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारतीय महिला हॉकी संघ हा २०१६ साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्या स्पर्धेत निवडक १२ संघांना खेळण्याची संधी मिळते, यामध्ये भारताने आपले स्थान कमावले.
  • ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारताचा हा पहिलाच महिला हॉकी संघ आहे. १९८०मध्ये मॉस्को, रशिया येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
  • भारतीय महिला हॉकी संघाने 'हॉकी वर्ल्ड लीग'च्या उपांत्य फेरीत जपानचा १-० पराभव करत पाचवे स्थान पटकाविले होते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी हा संघ पात्र ठरण्याच्या आशा बळावल्या होत्या.
  • रिओ ऑलिंपिकसाठी भारतासह नऊ संघ पात्र झाले आहेत. यामध्ये दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ खेळताना दिसणार आहेत.

अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

  • इंग्लंडच्या मोहम्मद फराहने जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीपाठोपाठ पाच हजार मीटर धावण्याची शर्यतही जिंकली.
  • फराहने २०१२मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यती जिंकल्या होत्या. पाठोपाठ त्याने २०१३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यतींचे विजेतेपद मिळवले होते.
  • उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील सोनेरी यशानंतर रिले शर्यतीत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून तिहेरी धमाका साजरा केला.
  • त्याच्या कामगिरीच्या जोरावर जमैकाने ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीचे अजिंक्यपद मिळविले. बोल्टचे जागतिक स्पर्धेच्या कारकीर्दीतील हे ११वे सुवर्णपदक आहे.

उर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राला ५ हजार कोटींची मदत

  • ग्रामीण तसेच शहरी भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे विस्तृत आणि सक्षम करण्याबरोबरच वीज ग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. 
  • दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक उर्जा विकास योजना यांच्याअंतर्गत ही मदत केली जाणार आहे. 
  • केंद्राच्या दोन्ही योजनांमुळे मिळणाऱ्या निधीचा उपयोग राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज यंत्रणांचा आधुनिकीकरण, वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण तसेच सक्षमीकरण आणि इतर मुलभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे.
  • दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ६७ ग्रामपंचायती आणि ६९ गावांना फायदा होणार आहे. तर एकात्मिक उर्जा विकास योजना २५४ प्रस्ताविक शहरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • या योजनेसाठी केंद्राकडून मिळणारी साठ टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात मिळणार असून त्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इसिसवर पाकिस्तानात बंदी

  • पाकिस्तानने 'इस्लामिक स्टेट' म्हणजेच अरबी भाषेत दाएश असे नाव असलेल्या इसिस या दहशतवादी गटावर बंदी घातली आहे.
  • इराक व सीरिया दरम्यानच्या पट्ट्यात या गटाने ताबा मिळवला असून, अनेक ठिकाणी खिलाफतची स्थापना केली आहे. इसिसचे पाकिस्तानात अस्तित्व नाही असेही पाकिस्तानने वारंवार सांगितले असले तरी त्या संघटनेवर बंदी घातली आहे.

लैंगिक चॅटिंगच्या मोबदल्यात लष्कराच्या माहितीची देवाणघेवाण

  • एका महिलेशी स्पष्टपणे लैंगिक संभाषण करण्याच्या मोबदल्यात काही अधिकारी लष्कराच्या तळांच्या ठिकाणांची माहिती देत असल्याची बाब उघड झाली आहे.
  • याबाबत लष्करी गुप्तचर यंत्रणेने ११ ऑगस्ट रोजी लष्कराच्या सर्व कमांड मुख्यालयांना आणि स्ट्रॅटजिक फोर्सेस कमांड अ‍ॅण्ड इंटिग्रेटेड संरक्षण कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये आणखीही काही अधिकारी गुंतलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची कृत्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत, त्याचप्रमाणे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांचे सरळसरळ उल्लंघन आहे.
  • युद्धाच्या व्यूहरचनेबाबतची माहिती सदर अधिकारी फेसबुकवरून पुरवीत होते, असे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. कर्नल पदावरील अधिकाऱ्याची मध्य प्रदेशातील महू येथील लष्कर युद्ध महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे, तर दोन राजपूत तुकडीचा एक मेजर आणि तीन राजपूत आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सचा एका लेफ्टनंट यांचीही ओळख पटली असून त्यांच्या नावांचा उल्लेख लष्करी गुप्तचर यंत्रणेने पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

'ग्रेट एस्केप'मधील पॉलचा मृत्यू

  • 'ग्रेट एस्केप' या १९६३ साली प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनांच्या ताब्यातील पोलंडमधील छळछावणीतून निसटलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांची रोमहर्षक सत्यकथा मांडलेली आहे.
  • त्या घटनेतील ज्या अखेरच्या दोन व्यक्ती जिवंत होत्या त्यातील पॉल रॉयल या वैमानिकाचा ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे वयाच्या १०१व्या वर्षी मृत्यू झाला.
  • ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले पॉल रॉयल दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. युद्धकाळात ते नाझी जर्मनीच्या तावडीत सापडले आणि त्यांची रवानगी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पोलंडमधील स्टालाग लुफ्त-३ नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धकैद्यांच्या शिबिरात करण्यात आली.
  • नाझींकडून त्यांचे अतोनात हाल केले गेले. त्यापैकी ७६ युद्धकैद्यांनी तुरुंगातून गुप्तरीत्या बोगदा खणून पलायन केले होते. त्यातील ७३ जण पुन्हा पकडले आणि त्यातील बहुतेकांना नाझींनी गोळ्या घालून ठार केले.
  • त्यातील केवळ २३ जणांना अॅडॉल्फ हिटलरच्या आज्ञेवरून आश्चर्यकारकरीत्या सोडून मृत्युदंडातून वगळण्यात आले होते. त्यातील पॉल आणि स्क्वॉड्रन लिडर (निवृत्त) डिक चर्चिल हे दोघेच आजवर जिवंत होते. आता त्यातील पॉल यांचे निधन झाल्याने या घटनेचे डिक हे एकमेव साक्षीदार उरले आहेत.

युएफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार लिओनेल मेस्सीला

  • युएफा अर्थात युरोपियन फुटबॉल संघटना युनियनतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४-१५ वर्षांसाठीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सीची निवड करण्यात आली.
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस सुआरेझ यांना मागे टाकत मेस्सीने या पुरस्कारावर नाव कोरले.
  • बार्सिलोनाचे प्रतिनिधित्त्व करताना चॅम्पियन्स लीग, ला लिगा तसेच स्पॅनिश चषकाचे जेतेपद मिळवून देण्यात मेस्सीने निर्णायक भूमिका बजावली होती.
  • मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला. २०१०-११ वर्षांत मेस्सीची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.

चालू घडामोडी - २८ ऑगस्ट २०१५


दिनविशेष


१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण.
देशाची एकात्मता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

दिल्लीतील ‘औरंगजेब रोड’ला अब्दुल कलाम यांचे नाव

    DR. APJ Abdul Kalaam
  • दिल्लीच्या औरंगजेब रोडचे नव्याने नामकरण करण्यात आले असून, आता हा रस्ता माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने ओळखला जाणार. 
  • नवी दिल्ली पालिकेने (एनडीएमसी) हा निर्णय घेतला आहे. केजरीवालांनी ट्विट करुन एनडीएमसीचे अभिनंदन केल्यामुळे रस्त्याच्या नामांतराची माहिती जाहीर झाली आहे.
  • मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे सगळ्यांचे लाडके माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे २७ जुलै रोजी निधन झाले.
  • त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी औरंगजेब रोडचे कलाम रोड असे नामांतर करण्याची सूचना भाजप खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून केली होती. या सूचनेची दखल घेत एनडीएमसीतील सत्ताधारी भाजपने रस्त्याचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला.

बाबासाहेबांच्या लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब

    Dr. Babasaheb Ambedkar's house in london
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेकाळी वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान विकत घेण्याबाबतची अनिश्चितता संपली असून, महाराष्ट्र सरकारने हे घर विकत घेण्याचा करार पूर्ण केला आहे.
  • डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधील तत्कालीन निवासस्थानाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. निवासस्थान खरेदी करार पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार दोन दिवसांत उर्वरित रक्कम देणार आहे.
  • सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे मालकासोबत अदान-प्रदान करत आहेत
  • डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना १९२१-२२ या काळात येथे राहात होते. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी हे निवासस्थान ३१ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.
  • या निवासस्थानाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय स्मृतिस्थळात करण्यात येणार आहे आणि त्याचा वापर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे (डीड ऑफ एक्स्चेंज) मालकासोबत अदान-प्रदान केले

गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जर्मनीचा पुढाकार

  • उत्तर भारताची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास तांत्रिक साहाय्य करण्यासाठी जर्मनीने पुढाकार घेतला आहे.
  • जर्मनीचे परराष्ट्रमंत्री फ्रॅंक-वॉल्टर स्टेईनमायर यांनी गंगा शुद्धीकरणाच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला आहे.
  • युरोपमधील महत्त्वाचा जलमार्ग ठरलेली ऱ्हाईन नदी शुद्ध करण्यासाठी ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, तेच तंत्रज्ञान गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी वापरता येऊ शकते, असे जर्मनीने म्हटले आहे.
  • याशिवाय ‘स्वच्छ विद्यालय’ मोहिमेत सहभागी होण्याची तयारीही जर्मनीने दर्शविली आहे.

जोकोविच बनला युनिसेफचा सद्भावना दूत

    Novak Djokovic
  • जागतिक नंबर वनचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच संयुक्त राष्ट्र बालकोषचा (युनिसेफ) सद्भावना दूत बनला आहे.
  • सर्बियाच्या हा २८ वर्षीय खेळाडू ‘नोव्हाक जोकोविच फाउंडेशन’मार्फत वंचित मुलांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
  • २०११ साली जोकोविचला पहिल्यांदा युनिसेफ सर्बियाचा सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

ऐतिहासिक ‘गीता प्रेस’ बंद पडण्याच्या मार्गावर

  • तब्बल ९० वर्षांहून अधिक काळापासून धार्मिक साहित्य प्रकाशित करणारी ‘गीता प्रेस’ बंद पडण्याच्या मार्गावर असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या अनिश्चित काळासाठी प्रेस बंद ठेवण्यात आली आहे. वेतनाच्या मुद्यावरून गीता प्रेसमधील कर्मचाऱ्यांना संप पुकारला आहे.
  • अगदी साध्या, सोप्या भाषेत आणि अत्यल्प दरात विविध भाषेतील हिंदू धार्मिक साहित्य प्रकाशक म्हणून ‘गीता प्रेस’ लोकप्रिय आहे.
  • गीता प्रेसने आतापर्यंत भगवद्‌गीतेच्या ७.२ कोटी प्रती, तुलशीदासाच्या साहित्याच्या ७ कोटी प्रती, तर पुराण आणि उपनिषदांच्या तब्बल १.९० कोटी प्रती विकल्याची माहिती अक्षर मुकूललिखित ‘गीता प्रेस आणि हिंदू भारताची निर्मिती’ या पुस्तकात दिली आहे.
 ‘गीता प्रेस’ बाबत... 
  • ‘गीता प्रेस’ची स्थापना १९२३ साली गीतातज्ज्ञ जयदयाल गोयन्दका यांनी केली. सर्वाधिक हिंदू धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘गीता प्रेस’ जगभर ओळखली जाते.
  • या प्रेसमध्ये २०० कर्मचारी काम करतात. घराघरात रामचरितमानस आणि भगवद्‌गीता पोचविण्याचे श्रेय ‘गीता प्रेस’कडे जाते. प्रकाशनांची विक्री १८ मोठ्या दुकानांद्वारे तसेच देशातील ३० प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पुस्तकांच्या दुकानाद्वारे आणि हजारो पुस्तक विक्रेत्यांमार्फत केली जाते.
  • ‘गीता प्रेस’ विविध नियतकालिकेही प्रकाशित केली जातात. त्यापैकी ‘कल्याण’ या नियतकालिकाच्या दरमहा दोन लाख तीस हजार प्रतींची विक्री केली जाते. 
  • ट्विटरवर #SaveGitaPressची हाक
  • ट्विटरवर युजर्सनी सेव्ह गीता प्रेस नावाची मोहिम सुरु केली असून त्याद्वारे गीता प्रेस वाचावी यासाठी आवाहन करण्यात येत आहे. युजर्सद्वारे ‘गीता प्रेस’ने प्रकाशित केलेल्या जुन्या पुस्तकांची मुखपृष्ठे तसेच आतील काही पानेही ट्विटरद्वारे शेअर करण्यात येत आहेत.

भारतापेक्षा पाकिस्तानकडे होणार दुप्पट शस्त्रास्त्रे

  • अमेरिकेतील ‘दो थिंक टैंक कॉरनेजी इनडाउमेन्ट फॉर इंटरनेशनल पीस और स्टिमशन सेंटर‘ या संस्थेने ‘ए नॉर्मल न्यूक्‍लिअर पाकिस्तान‘ या शीर्षकाखाली एक अहवाल सादर केला आहे.
  • त्या अहवालानुसार पाकिस्तानमधील शस्त्रास्त्रांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पुढील पाच ते दहा वर्षांत ते भारतापेक्षा दुप्पट होईल.
  • विशेष म्हणजे ब्रिटन, चीन व फ्रान्सपेक्षाही पाककडे जास्त शस्त्रास्त्रे असणार आहेत. अमेरिका व रूस या देशानंतर पाकिस्तानचा क्रमांक असेल.
  • पाकिस्तानकडे सन २०१३ मध्ये ९० ते १२० अणूबॉम्ब होते. वर्षाला २० अणूबॉम्ब ते तयार करत आहे. हा आकडा वाढत राहिला तर पुढील पाच वर्षांमध्ये त्यांच्याकडे ३५० अणूबॉम्ब असणार आहेत, असेही अहवालामध्ये म्हटले आहे. 

आणखी एका दहशतवाद्यास जिवंत पकडण्यात यश

  • उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रफिदाबाद येथे झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले असून, अन्य एका दहशतवाद्यास जिवंत पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
  • काही दिवसांपूर्वी उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता, या वेळी महंमद याकूब नावेद या पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले होते.
  • पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव सज्जाद जावेद ऊर्फ अबू उबैदुल्लाह असे असून, तो पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मुझफ्फरगडमध्ये राहणारा आहे.
  • या दहशतवाद्याला विशेष हेलिकॉप्टरने श्रीनगरला आणण्यात आले असून, अन्य दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
  • सज्जादच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, तो २०१२ साली लष्कर-ए-तोयबा संघटनेत सामील झाला होता. त्याचे केवळ चौथी पर्यंतचे शिक्षण झाले असून तो पाकिस्तानच्या नैर्ऋत्येकडील मुझफ्फरगडचा आहे.
  • लष्कर-ए-तोयबात सामील होण्याआधी जमाद-उद-दवा या हाफिज सईदच्या संघटनेसाठी देखील सज्जाद काम करीत होता. तेथेच त्याला दहशतवादी कारवाया करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळाले होते.

चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१५


जीसॅट-६ चे यशस्वी प्रक्षेपण

    GSAT 6
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) संवाद उपग्रह ‘जीसॅट-६’चे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक जीएसएलव्ही डी-६ च्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५२ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रावरून (श्रीहरीकोटा) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • इस्रोने तयार केलेला जीसॅट-६ हा २५ वा भूस्थिर उपग्रह आहे तर जीसॅट मालिकेतील हा १२ वा उपग्रह आहे. हा उपग्रह ९ वर्षे कार्यरत राहणार आहे.
  • नियोजित मार्गावरून अचूक मार्गक्रमण करत 'जीएसएलव्ही'ने उपग्रहाला १७ मिनिटांत १६८ किलोमीटर बाय ३५९३९ किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित केले.
  • त्यानंतर तात्काळ उपग्रहावरील सौरपंखे उघडले जाऊन त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर उपग्रहावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने 'जीसॅट ६'ला ३६ हजार किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पाठवण्यात येईल.
  • इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार
  • प्रकल्पाचे संचालक : आर. उमामहेश्वरन
 ‘जीसॅट-६’ ची वैशिष्ट्ये 
  • उपग्रहाचे वजन : २११७ किलो (११३२ किलो इंधनाचे वजन + ९८५ किलो मूळ उपग्रहाचे वजन)
  • वैशिष्ट्य : या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास ६ मीटर आहे.
  • कार्य : जीसॅट-६ हा उपग्रह एस बँड व सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी वापरला जाणार आहे.
  • वापर : या उपग्रहाचा वापर प्रामुख्याने लष्करासाठी केला जाणार आहे.

 जीएसएलव्ही 
  • हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्त्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. जीएसएलव्ही (जिओस्टेशनरी सॅटेलाइट लाँच व्हेईकल) प्रक्षेपकाचे हे एकूण नववे उड्डाण आहे.
  • स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने जीएसएलव्हीने केलेले हे दुसरे यशस्वी उड्डाण आहे. १५ एप्रिल २०१० रोजी एका अयशस्वी उड्डाणानंतर ५ जानेवारी २०१४ ला क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने केलेले उड्डाण यशस्वी झाले होते.
  • त्यानंतर २७ ऑगस्ट २०१५ रोजी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनासह इस्रोच्या जीएसएलव्ही डी-६ प्रक्षेपकाने जीसॅट-६ उपग्रह यशस्वीपणे कक्षेमध्ये सोडला. इस्रोच्या वतीने प्रक्षेपित करण्यात आलेला हा पंचविसावा संवाद उपग्रह आहे.
  • स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्सनंतर फक्त सहावा देश आहे. 
‘जीएसएलव्ही डी-६’ची वैशिष्ट्ये
व्यास : ३.४ मीटरलांबी : ४९.१ मीटरवजन : ४१६ टन

'स्मार्ट सिटी' योजनेसाठी ९८ शहरांची अंतिम यादी जाहीर


  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या ९८ शहरांची अंतिम यादी २७ ऑगस्ट रोजी केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून जम्मू-काश्मीर आपली दोन शहरे नंतर नोंदविणार आहे.
  • देशातील शंभर शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या प्रयोजनाने सुरू करण्यात आलेल्या 'स्मार्ट सिटी' योजनेच्या अंतिम यादीत महाराष्ट्राच्या खालील दहा शहरांना स्थान मिळाले आहे.
मुंबईठाणेसोलापूरपुणेऔरंगाबाद
नवी मुंबईकल्याण-डोंबिवलीनागपूरनाशिकअमरावती
  • राज्य सरकारने शिफारस केलेल्या यादीत पिंपरी-चिंचवडचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, केंद्राकडून जाहीर झालेल्या अंतिम यादीत पिंपरी-चिंचवडला स्थान देण्यात आलेले नाही.
  • या यादीत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक १३ शहरांचा, तर तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६, पश्चिम बंगाल व राजस्थानधील ४, आणि बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी ३ शहरांचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश आहे.
  • या शहरांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून पुढील पाच वर्षांमध्ये ९८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
 स्मार्ट सिटी योजना 
  • योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभर राज्य पातळीवर स्पर्धा घेऊन शहरांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला शहरांच्या संख्येचा वाटा ठरवून दिला होता.
  • 'स्मार्ट सिटी' योजनेकरवी केंद्राकडून मिळणाऱ्या अधिकच्या निधीचा या शहरांच्या विकासासाठी राज्यांच्या सरकारांना उपयोग करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शहरांतील आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळणार आहे.
  • या योजनेबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सर्व ९८ शहरांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

उसेन बोल्ट २०० मीटरचाही चॅम्पियन

  • जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले. 
  • बोल्टने २०० मीटरची शर्यत १९.५५ सेकंदात पूर्णकरून आपणच जगातील सर्वात वेगवान व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
  • अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनला याही स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गॅटलीनने १९.७४ सेकंदात शर्यत पूर्ण करून बोल्टला कडवी टक्कर दिली.
  • या स्पर्धेच्या १०० मीटर श्रेणीत उसेन बोल्टने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धेचे जेतेपद कायम राखले होते, तर गॅटलीनने ९.८० सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदकाची कमाई केली.

डिव्हिलियर्सचा नवा विक्रम

  • दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वात कमी डावात ८ हजार धावांचा टप्पा गाठून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीस काढला.
  • डिव्हिलियर्सने अवघ्या १८२ डावांत ८ हजार धावांचा आकडा गाठला आहे. हा विक्रम याआधी सौरव गांगुलीच्या नावावर होता. सौरवने २०० डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
  • त्यानंतर सर्वात वेगवान ८ हजार धावा करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर (२१० सामने), वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा (२११ सामने) आणि भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२१४ सामने) यांचे नाव घेतले जाते.
  • डिव्हिलियर्सच्या नावावर सध्या १९० एकदिवसीय सामन्यात १८२ डावांमध्ये ५३.२७ च्या सरासरीने ८०४५ धावा जमा आहेत. 
  • ए.बी.डिव्हिलियर्सच्या नावावर याआधी सर्वात वेगवान अर्धशतक, शतक आणि दीडशतक ठोकण्याच्याही विक्रमाची नोंद आहे. आता वेगवान ८ हजार धावांचा विक्रम रचून डिव्हिलियर्सने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

पाकचे माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश

  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधात २७ ऑगस्ट रोजी फेडरल न्यायालयाकडून भ्रष्टाचारप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आले.
  • पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते असलेल्या गिलानी यांच्यासह त्यांच्याच पक्षाच्या मखदूम अमीन फाहीम यांच्या विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
  • न्यायालयाने हे आदेश फेडरल इनव्हेस्टीगेटिंग एजन्सीच्या (एफआईए) वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर दिले आहेत.
  • गिलानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांच्यावर अनेक बनावट कंपन्या स्थापन करून या कंपन्यांना बेकायदेशीरित्या व्यापारी सवलती दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
  • न्यायालयाने यापूर्वीही गिलानी आणि फईम यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. मात्र, या दोघांकडून या नोटीशींना उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांना गिलानी आणि फईम यांना अटक करून १० सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे.

पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण

  • पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला २६ ऑगस्ट रोजी हिंसक वळण लागले.
  • या आंदोलनात ९ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून गुजराती बांधवांशी संवाद साधत आंदोलन थांबवून चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन पटेल समाजाच्या नेत्यांना केले आहे.
  • आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुस्थितीत असलेल्या पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
  • हार्दिक पटेल याने येथील जीएमडीसी मैदानावर घेतलेल्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिकला पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीनंतर सोडून दिले होते. मात्र, त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या.

टिंटू लुकाचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित

  • भारताच्या टिंटू लुकाला जागतिक मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले, परंतु तिने ऑलिम्पिकमधील प्रवेश मात्र निश्चित केला.
  • २६ वर्षीय लुकाने ही शर्यत २ मिनिटे ०.९५ सेकंदांत पार करीत पहिल्या प्राथमिक फेरीत सातवे स्थान मिळवले. प्रत्येक प्राथमिक फेरीतील पहिले तीन खेळाडूच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
  • आशियाई विजेती व राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी खेळाडू लुकाची १ मिनिट ५९.१७ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. तिला ही वेळ नोंदविता आली नाही. मात्र, २ मिनिटे १ सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेपेक्षा कमी वेळ नोंदवत तिने रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले.

आयसीआयसीआयची 'एक्स्ट्रा' गृह कर्ज योजना

  • परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण, मध्यमवयीन पगारदार आणि व्यवसाय असणाऱ्या ग्राहकांसाठी आयसीआयसीआय बँकेने 'एक्स्ट्रा' या अनोख्या कर्ज योजनेची घोषणा केली.
  • देशातील ही पहिलीच 'मॉर्गेज गॅरंटी'चे पाठबळ असणारी योजना असून अतिरिक्त शुल्क भरून कर्ज रक्कम आणि कर्जफेडीचा कालावधी निवृत्तीपलीकडे वाढवून घेण्याची सुविधा यात ग्राहकांना मिळणार आहे.
  • 'इंडिया मॉर्गेज गॅरेंटी कॉर्पोरेशन'च्या मदतीने सुरू केलेल्या या 'आयसीआयसीआय बँक एक्स्ट्रा होम लोन्स'मुळे कर्जदार ग्राहकांना गृहकर्जाची रक्कम २० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते.
  • तसेच, कर्जाच्या परतफेडीचा कालावधीत वयाच्या ६७व्या वर्षापर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. यामुळे ग्राहकांना स्वत:ला उभी करावी लागणारी रक्कम कमी करण्यास मदत होते.
  • यासाठी उर्वरित विस्तारित कालावधीसाठी मासिक हप्ता तेवढाच असेल. मात्र या सुविधेकरिता १.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम शुल्क म्हणून आकारली जाईल.
  • हे कर्ज पहिले घर खरेदी करण्यासाठी असेल व त्याचा वार्षिक व्याजदर बँकेच्या नियमित रचनेप्रमाणे असेल. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई उपनगर, नवी दिल्ली परिसर, बंगळुरू आणि सूरत या शहरांतील घरांसाठी ७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज याअंतर्गत मिळेल.
  • या अनोख्या योजनेचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून यामुळे माफक दरातील घरमागणी वाढून सरकारच्या 'सर्वाना घरे' मोहिमेलाही पाठबळ मिळणार आहे.
 दृष्टिक्षेपात 'एक्स्ट्रा' गृह कर्ज योजना 
  • कर्जफेड कालावधी वयाच्या ६७ वर्षांपर्यंत
  • २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त अर्थसाहाय्य
  • कालावधी विस्तारल्याने घटलेला मासिक हप्ता
  • कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत सुविधा शुल्क
  • ७५ लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध
  • आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर

सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदत वाढ

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
 पार्श्वभूमी 
  • केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी न्या. ए. के. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती.
  • ही स्थापना ज्या प्रस्तावाद्वारे झाली होती त्यानुसार स्थापना दिवसापासून १८ महिन्यांच्या आत या आयोगाला आपल्या सूचना सादर करायच्या होत्या व ही मुदत २७ ऑगस्ट २०१५ रोजी संपत आहे.
  • कामाचा आवाका व संबंधितांशी सखोल सल्लामसलत या गोष्टींच्या अनुषंगाने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने सरकारला हा कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत अर्थात चार महिन्यांनी वाढवून देण्याची विनंती केली होती.

अमेरिकेकडून अब्दुल हक्कानी 'जागतिक दहशतवादी'

  • पाकिस्तानातील कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या हक्कानी नेटवर्कचा सर्वोच्च नेता अब्दुल अझीझ हक्कानी याला अमेरिकेने विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हक्कानी याने अफगाणिस्तानात अनेक हल्ले केले आहेत, त्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
  • जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आता अब्दुल हक्कानीचा अमेरिकेने समावेश केल्यामुळे त्याच्या नावावर अमेरिकेत असलेली सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्याच्यासोबत कुठल्याही अमेरिकी नागरिकाने कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, असे अमेरिकी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
  • कट्टर दहशतवादी असलेल्या हक्कानी याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास सुमारे ५० लाख रुपयांचे बक्षीस अमेरिकेने मागील वर्षी जाहीर केले होते.
  • अल कायदाशी संबंधित असलेल्या हक्कानी नेटवर्कचा माजी प्रमुख आणि अब्दुल याचा भाऊ बद्रुद्दीन हक्कानी याचा मृत्यू झाल्यानंतर हक्कानी नेटवर्कची धुरा अब्दुल हक्कानीकडे आली होती. अफगाणिस्तानात मागील काही वर्षांमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटांमध्ये अब्दुल हक्कानीचा हात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

सेशल्स-भारत सहकार्य वाढणार

  • भारत आणि सेशल्स या दोन देशांतील संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून, त्यासाठी विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
  • भारताच्या दौऱ्यावर असलेल्या सेशल्सचे अध्यक्ष जेम्स ऍलेक्स मायकेल यांनी २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानीतील हैदराबाद हाउसमध्ये भेट घेतली.
  • यावेळी विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. कृषी, हवाई वाहतूक, सागरी सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यासाठीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा असलेले अत्याधुनिक डॉर्निअर विमान भारतातर्फे सेशल्सला देण्यात येणार आहे. यापूर्वीही भारताने अशा प्रकारचे एक विमान सेशल्सला दिले आहे.
  • याशिवाय एक नाविक बोट आणि अत्याधुनिक रडारदेखील सेशल्सला भारताकडून देण्यात येणार आहे.

डॉ. नरेंद्र जाधव आरबीआय इतिहास लेखन सल्लागार समितीचे अध्यक्ष

    Narendra Jadhav
  • नियोजन मंडळाचे माजी सदस्य व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) इतिहास लेखन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
  • रिझर्व्ह बॅंकेच्या या इतिहास लेखन समितीचे अध्यक्षपद रिझर्व्ह बॅंकेच्या निवृत्त गव्हर्नरांकडेच देण्याची परंपरा आजवर काटेकोर पाळली गेली होती. त्यानुसार डॉ. बिमल जालान यांच्याकडे हे पद होते.
  • मात्र, त्यांची उचलबांगडी करून डॉ. जाधव यांची प्रतिनियुक्ती तेथे केली गेली आहे. जाधव आता ‘आरबीआय’चा १९९७ ते २००७ या काळातील इतिहासाचा पाचवा खंड तयार करणाऱ्या इतिहास लेखन समितीचे प्रमुख सल्लागार असतील.

चालू घडामोडी - २६ ऑगस्ट २०१५


सानिया मिर्झाच्या ‘खेलरत्न’ पुरस्काराला स्थगिती

    Sania Mirza
  • भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय क्रीडादिनी २९ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे.
  • जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता.
  • मात्र, लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून कर्नाटक उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
  • या याचिकेच्या सुनावणीनंतर कर्नाटक न्यायालयाने हा पुरस्कार स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. 
  • क्रीडा सचिव अजित शरण यांच्या माहितीनुसार क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शिफारशीनंतर सानियाला ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
  • हा पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

अभिनव बिंद्राला प्रशिक्षणासाठी ५००० युरोंचा निधी

  • ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटाकविणारा अभिनव बिंद्रा याला जर्मनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ५००० युरोंची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
  • नेमबाज अभिनव बिंद्रा हा १ ते ११ सप्टेंबर दरम्यान जर्मनीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीमधून ही मदत अभिनवला देण्यात येणार आहे.
  • अंदाजित खर्चाच्या ९० टक्के रक्कम आगाऊ मंजूर करण्यात आली आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत अभिनव बिंद्राला मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून त्याचा खर्च करण्यात येईल. 
  • पिस्तुलाची चाचणी, परीक्षण आणि देखभालीसाठी हा निधी देण्यात येणार आहे.

‘प्यासा’ व्हेनिस ‘क्लासिक’ स्पर्धेत

  • महान चित्रपटनिर्माते गुरूदत्त यांची अजरामर कलाकृती असलेल्या ‘प्यासा’ या एकमेव भारतीय चित्रपटाचा आगामी ७२व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्पर्धा विभागात प्रीमियर दाखविण्यात येणार आहे.
  • अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या ४५ तज्ज्ञांच्या गटाने चार महिने अहोरात्र काम करून हा चित्रपट मूळ दर्जा चित्रांमध्ये (रिस्टोअर) मिळविल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील रसिकांसाठी तो उपलब्ध झाला आहे.
  • रिस्टोअर करण्यात आलेल्या इतर वीस चित्रपटांशी आता ‘प्यासा’ स्पर्धा करणार आहे. रिस्टोअर केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या व्हेनिस क्लासिक्स अवॉर्ड या पुरस्कारासाठी ही स्पर्धा होणार आहे.

‘ईस्ट इंडिया कंपनी’वर आता भारतीयाचे राज्य

  • भारतावर १०० वर्षे राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता विकत घेतली आहे.
  • संजीव मेहता यांनी १.५ कोटी डॉलरला ही कंपनी विकत घेतली आहे. संजीव मेहता यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केले आहेत. संजीव यांनी ४० भागधारकांकडून ही हिस्सेदारी खरेदी केली आहे.
  • कधीकाळी भारतावर राज्य केलेल्या कंपनीला एका भारतीय व्यक्तीने खरेदी केले आहे. शिवाय ईस्ट इंडिया कंपनी आता नवीन व्यवसायांना सुरूवात करणार आहे. तसेच ई-कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू करणार आहे.
 ईस्ट इंडिया कंपनी 
  • ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० मध्ये करण्यात आली होती. १७व्या आणि १८व्या शतकात कंपनीने जगभरातील व्यवसायांवर ताबा मिळवून अनेक देशांवर राज्य केले.
  • ईस्ट इंडिया कंपनीने इ.स.१७५७ मध्ये भारतात प्रवेश केला होता. हळूहळू ‘फोडा आणि राज्य करा’ (डिवाइड अँड रूल) धोरणाचा अवलंब करून पूर्ण भारतावर राज्य केले.

सोनियांविरुद्धची अमेरिकेतील याचिका रद्द

  • भारतात १९८४मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात अमेरिकेतील न्यायालयाने दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात आली आहे.
  • ‘शीख्स फॉर जस्टीस’ ही संस्था, तसेच मोहिंदरसिंग आणि जसबीरसिंग या शीखविरोधी दंगलीतील दोन पीडितांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात न्यूयॉर्कमधील इस्टर्न डिस्ट्रिक्ट न्यायालयात खटला दाखल केला होता.
  • या दंगलीत सहभागी असलेले कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सोनिया गांधी वाचवत आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
  • अमेरिकेतील एलियन टॉर्ट क्लेम्स कायदा, तसेच पीडित संरक्षण कायद्याअंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सोनिया यांना समन्स ही पाठविण्यात आले होते.
  • न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना हे प्रकरण आपल्या न्यायधिकरण क्षेत्राच्या बाहेर असल्याने याचिका रद्दबातल करण्याचा निर्णय सुनाविला.

खून प्रकरणी इंद्राणी मुखर्जींना अटक

  • ‘स्टार इंडिया‘चे माजी प्रमुख पीटर मुखर्जी यांच्या पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना खून प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली.
  • इंद्राणी यांची मुलगी शीना बोरा यांच्या २०१२मध्ये खून झाला होता. या प्रकरणात इंद्राणी यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली.
  • शीना यांच्या मृतदेहाची रायगड जिल्ह्यातील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यासाठी इंद्राणी यांना त्यांच्या वाहन चालकाने मदत केली होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
  • पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर इंद्राणी यांचे नाव या प्रकरणी समोर आले होते. इंद्राणी यांना ३१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहेत.

'इंडिकॅश'चा वापर विपणन व प्रचार-प्रसाराची वाहिनी

    Indicash
  • भारतात सर्वप्रथम व्हाइट लेबल एटीएमची 'इंडिकॅश' ही नाममुद्रा प्रस्तुत करणाऱ्या टाटा कम्युनिकेशन्स पेमेण्ट सोल्यूशन्स लि.ने देशभरात फैलावलेले आपल्या एटीएम जाळ्याचा अधिकाधिक महसुली वापरासाठी विपणन व प्रचार-प्रसाराची वाहिनी म्हणून वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
  • इंडिकॅश एटीएम केंद्राची बाह्य-दृश्यता, अंतर्भाग ब्रॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन आणि डिजिटल स्क्रीनवरील फ्लॅश कन्टेंट अशा तीन माध्यमातून जाहिरातीच्या अमर्याद संधी उपलब्ध असून, त्याचा पुरेपूर महसुली वापर करण्यात येणार आहे.
  • इंडिकॅशने अल्पावधीत २१ शहरे, तसेच तीन हजारांहून गावे व निमशहरी भागांत ६,००० एटीएमचे जाळे निर्माण केले आहे.
 व्हाइट लेबल एटीएम म्हणजे काय? 
  • नामसंकेताप्रमाणे कोणत्याही बँकेचे नाव (लेबल) न लावणारे एटीएम केंद्र म्हणजे 'व्हाइट लेबल' एटीएम होय. अशा एटीएमच्या संचालनात तीन बिगर-बँकिंग संस्था एकत्र आल्या असतात.
  • जसे या 'इंडिकॅश' या व्हाइट लेबल एटीएम नाममुद्रेचे प्रवर्तक टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सर्व्हिसेस, प्रत्यक्ष एटीएम केंद्राचे अधिकृत चालक/फ्रँचाइझी आणि रूपे, व्हिसा, मास्टरकार्ड यांसारख्या कार्ड पेमेंट नेटवर्कच्या चालक कंपन्यांचा सहभाग असतो.
  • बँकांच्या सामान्य एटीएमप्रमाणे व्हाइट लेबल एटीएमचा कार्डधारकांना वापर करता येतो.

उत्तर प्रदेशच्या लोकायुक्त निवडीवरून वाद

  • उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदासाठी राज्य सरकारने सुचविलेले रवींद्र सिंग (निवृत्त) यांचे नाव राज्यपाल राम नाईक यांनी फेटाळले आहे. मंत्रिमंडळाची शिफारस स्वीकारणे बंधनकारक नसल्याचे सांगत राज्यपालांनी याबाबतची फाइल परत पाठविली आहे.
  • लोकायुक्त नियुक्तीची एक प्रक्रिया ठरलेली आहे. त्यात मंत्रिमंडळाचा थेट संबंध नाही. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशांनी चर्चेद्वारे योग्य व्यक्तीचे नाव या पदासाठी सुचविणे अपेक्षित असते, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.
  • न्या. सिंग यांच्या नावाबाबत किंवा एकूणच लोकायुक्तपदाबाबत कोणतीही चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली नसल्याचे, विरोधी पक्षनेते स्वामी प्रसाद मौर्य आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केल्यानंतर राज्यपालांनी फाइल परत पाठविली आहे.
  • न्या. सिंग यांची सत्ताधारी समाजवादी पक्षाशी जवळीक असून, ती लोकायुक्तपदाच्या नियुक्तीमध्ये मोठी अडचण असल्याचे स्पष्ट मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.

सौदी अरेबियात महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

    Women register to vote for the first time in Saudi Arabia
  • सौदी अरेबियात या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकांत महिला पहिल्यांदाच मतदान करणार आहेत; तसेच त्यांना निवडणूकही लढविता येणार आहे.
  • महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यांची नावे मतदारयाद्यांमध्ये नोंदवण्याच्या कामाला २३ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहेत.
  • हा निर्णय म्हणजे सामाजिक सुधारणांच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

चालू घडामोडी - २५ ऑगस्ट २०१५


धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर

    Our Census - Our Future (Census 2011)
  • देशाच्या धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर झाला असून देशात हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तर मुस्लिम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
  • एकूण लोकसंख्येपैकी देशात हिंदूंची लोकसंख्या ९६ कोटी ६३ लाख इतकी असून, देशात १७ कोटी २२ लाख मुस्लीम नागरिक आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटी ९ लाखांच्या घरात गेली आहे.
  • अहवालानूसार, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंचे प्रमाण ०.७ टक्क्यांनी घटल्याचे व मुस्लीमांचे ०.८ टक्क्यांनी वाढले आहे. शिखांचे लोकसंख्येतील प्रमाण ०.२ टक्क्यांनी तर बौद्धांचे ०.१ टक्क्यांनी घटले असून जैन व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाणात फारसा बदल झालेला नाही.
धर्मनिहाय जनगणना अहवाल २०११
धर्मलोकसंख्यालोकसंख्येतील प्रमाणदशवार्षिक वाढ
हिंदू९६ कोटी ६३ लाख७९.८ टक्के१६.८ टक्के
मुस्लीम१७ कोटी २२ लाख१४.२ टक्के२४.६ टक्के
ख्रिस्ती२ कोटी ७८ लाख२.३ टक्के१५.५ टक्के
शीख२ कोटी ८ लाख१.७ टक्के८.६ टक्के
बौद्ध८४ लाख०.७ टक्के६.१ टक्के
जैन४५ लाख०.४ टक्के५.४ टक्के
अन्य धर्म आणि पंथ७९ लाख०.७ टक्के-
धर्म जाहीर न केलेले नागरिक२९ लाख०.२ टक्के-
एकूण१२१.०९ कोटी१०० टक्के१७.७ टक्के

महाराष्ट्रातील स्थिती
धर्मलोकसंख्यालोकसंख्येतील प्रमाण
हिंदू८ कोटी ९७ लाख७९.८ टक्के
मुस्लीम१ कोटी २९ लाख११.५४ टक्के
ख्रिस्ती१० लाख ८० हजार०.९६ टक्के
शीख२ लाख २३ हजार०.१९ टक्के
बौद्ध६५ लाख ३१ हजार५.८१ टक्के
जैन१४ लाख१.२४ टक्के
अन्य धर्म आणि पंथ१ लाख ७८ हजार०.१५ टक्के
धर्म जाहीर न केलेले नागरिक२ लाख ८६ हजार०.२५ टक्के
एकूण११ कोटी २४ लाख१०० टक्के

‘द्रोणाचार्य‘ पुरस्कारासाठी पाच जणांची निवड

    Dronacharya Award
  • भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांमधील प्रशिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘द्रोणाचार्य‘ पुरस्कारासाठी पाच जणांची क्रीडा मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे.
  • दीपांकर भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडलेल्या आणि सूचवलेल्या आधारे पुरस्कारांची निवड करण्यात आली.
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने समितीच्या शिफारसी आणि चौकशीनंतर कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंग व पॅरालिंपिक प्रशिक्षक नवल सिंग यांची २०११ ते २०१४ या कालावधीतील कामगिरी विचारात घेऊन त्यांच्या नावावर सहमती दर्शवली.
  • तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे कुस्ती प्रशिक्षक अनुप सिंग यांनी सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, सत्यवर्त कॅडीयन, बजरंग, अमित दाहिया यांच्यासह ५८ कुस्तीपटूंना मार्गदर्शन केलेले आहे.
  • जलतरण प्रशिक्षक निहार अमीन, मुष्टियुद्ध प्रशिक्षक स्वतंत्रसिंग सिंग आणि ऍथलेटिक्स प्रशिक्षक हरबन्स सिंग यांची जीवनगौरव कॅटेगरीनुसार गेल्या २० वर्षांत त्यांनी खेळासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करता द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली.
  • रोमियो जेम्स (हॉकी), प्रकाश मिश्रा (टेनिस) आणि टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल) यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे क्रीडापटू घडविणाऱ्या प्रशिक्षकांसाठी १९८५पासून द्रोणाचार्य पुरस्कार सुरू करण्यात आले होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये असे द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांचे (२००२ पासून सुरुवात) स्वरूप आहे.
  • याव्यतिरिक्त वर्ष २००९ पासून राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रारंभ करण्यात आला आहे. क्रीडा विकासासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील संस्था, तसेच बिगर सरकारी संघटनांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 
  • राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या संस्थांना प्रमाणपत्र आणि चषक प्रदान करण्यात येईल. २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून या विजेत्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

संजीव चतुर्वेदी यांना अखेर पदोन्नती

    Sanjiv Chaturvedi
  • भारतीय वन खात्याचे आयएफएस अधिकारी व मॅगसेसे पुरस्कार विजेते संजीव चतुर्वेदी यांना बढती मिळाली असून त्यांना संचालक पद देण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती.
  • चतुर्वेदी यांना गेल्या वर्षी अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावरून काढण्यात आले होते. त्या संस्थेत राजकीय नेते वैद्यकीय सुविधांचा गैरफायदा घेतात, हे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले. हरियाणातही त्यांना काही पदांवरून काढण्यात आले होते, कारण तेथे त्यांनी भ्रष्टाचार उघडकीला आणला होता.
  • आता त्यांना हरियाणासरकारचे बढतीचे पत्र मिळाले असून त्यांना १ जानेवारी २०१५ पासून उपसचिव पदाऐवजी संचालक पद देण्यात आले आहे.
  • चतुर्वेदी हे २००२च्या तुकडीतील भारतीय वनसेवा अधिकारी असून त्यांना १ जानेवारीलाच पदोन्नती मिळणे अपेक्षित होते, पण त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था व हरियाणा या दोन ठिकाणी काम करत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती त्यामुळे त्यांची पदोन्नती रोखली होती.
  • दोन विभागीय खातेनिहाय समित्यांनीही त्यांच्या अर्जाची दखल २७ जानेवारी व १६ जूनच्या बैठकात घेतली नव्हती. त्यांच्या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांना मात्र पदोन्नती मिळाली होती.
  • चतुर्वेदी हे सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात उपसचिव असून  त्यांनी १९ जूनला लवादाकडे दाद मागितली होती.

जागतिक मैदानी स्पर्धेत जमैकन शेलीची 'सुवर्ण' धाव

  • जमैकाच्या शेली अ‍ॅन फ्रेसर प्रायस हिने जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे १०० मीटर शर्यतीतील तिसरे सुवर्णपदक आहे.
  • दोन वेळा ऑलिम्पिक विजेतीचा मान पटकावणाऱ्या शेलीने १०.७६ सेकंदाची वेळ नोंदवून जमैकन उसेन बोल्टच्या पावलावर पाऊल टाकत 'सुवर्ण' धाव घेतली.
  • नेदरलँडच्या डॅफने शिपरने १०.८१ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य, तर अमेरिकेच्या टोरी बॉवीने १०.८६ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. 
  • शेलीने २००९ आणि २०१३ मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर शर्यतीत बाजी मारून दुहेरी धमाका केला होता.

जयललिता यांची दोन मोठ्या आरोग्य योजनांची घोषणा

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी विधानसभेत ‘अम्मा मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन’ आणि महिलांसाठी ‘अम्मा विशेष मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन’ या दोन मोठ्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांची घोषणा केली आहे.
  • या दोन्ही योजनांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चालू वर्षात दहा नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • त्याचबरोबर अड्यार येथील कर्करोग संस्थेला विशेष संस्थेचा दर्जा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.

ललिता बाबरचा नवा राष्ट्रीय विक्रम

    Lalita Babar in World athletics
  • भारताची महिला धावपटू ललिता बाबरने जागतिक मैदानी स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • आशियाई सुवर्णपदक विजेत्या ललिताने ९ मिनिटे २७.८६ सेकंदात हे अंतर पार केले आणि स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम (९ मिनिटे ३४.१३ सेकंद) मोडीत काढला.
  • जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.
  • महाराष्ट्राच्या या महिला धावपटूने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
  • या शर्यतीत टय़ुनिशियाच्या हबिबा घिरिबीने हे अंतर ९ मिनिटे २४.३८ सेकंदात पार केले. जर्मनीच्या गेसा फेलिसिटासने ९ मिनिटे २४.९२ सेकंदात ही शर्यत पूर्ण करीत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.

सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा : रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स विजयी

    Roger Federer and Serena Williams
  • स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने अप्रतिम खेळ करताना नोव्हाक जोकोव्हिचवर ७-६(७/१), ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फेडररचे सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेचे हे सातवे जेतेपद आहे. 
  • त्याचे हे कारकीर्दीतील ८७वे आणि मास्टर्स १००० स्पर्धेतील २४वे जेतेपद आहे.
  • महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जेतेपद पटकावले. सेरेनाने तिसऱ्या मानांकित सिमॉन हॅलेपचा ६-३, ७-६ (७/५) असा पराभव करून दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारली.
  • फेडररने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचवर ९० मिनिटांत विजय मिळवला. या विजयामुळे फेडररने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून जोकोव्हिच अव्वल स्थानावर कायम आहे.

पटेल समाजाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांच्याकडे

  • गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे.
  • २५ ऑगस्ट रोजी अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखो नागरिक सहभागी झाले.
  • आरक्षण हा पटेल समाजाचा हक्क असून आम्हाला भीक म्हणून आरक्षण नको आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २०१७ मध्ये गुजरातमध्ये कमळ बहरु देणार नाही असा इशारा यावेळी हार्दिक पटेल यांनी दिला आहे.
  • गेल्या १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे.
  • देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले. 
  • गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.

व्यापमं घोटाळ्यातील तपास सीबीआयकडे

  • मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील सर्व प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करेल, असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाने तपास संस्थेला तीन आठवड्यांच्या आत सरकारी वकील नियुक्त करण्याचे आदेश दिले.
  • दिलेल्या मुदतीत सरकारी वकिलांची नियुक्ती न झाल्यास यासंदर्भात न्यायालयीन आदेश काढण्यात येईल, असेही पीठाने स्पष्ट केले.
  • विशेष तपास पथक (एसआयटी) आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) ७८ प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले असले तरी, व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयलाच करावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • या प्रकरणांची संख्या आता १८५ वरून वाढून २१२ झाली आहे. सीबीआयमध्ये तपास कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. गेल्या सुनावणीतही याकडे लक्ष वेधण्यात आले होते.

चालू घडामोडी - २३ व २४ ऑगस्ट २०१५


भारत-पाक चर्चा रद्द

    National Security Advisor Ajit Doval (L), and Pak NSA Sartaj Aziz (R)
  • भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होणार असलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने तडकाफडकी रद्द केली. या चर्चेत काश्मीरचा मुद्दा असावा आणि हुरियत नेत्यांची भेटही घेता यावी, हा पाकिस्तानचा हेका भारताने धुडकावला होता.
  • ही चर्चा विनाअटच असली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. परंतु भारताने त्यात अटी लादल्याने आम्ही ही चर्चा रद्द करीत आहोत, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाने जाहीर केले.
  • पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यातील या चर्चेत काश्मीर मुद्याचा अडसर निर्माण झाला होता.
  • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीरवर चर्चा होणार नाही आणि हुरियत नेत्यांची भेट घेणार नाही, या दोन मुद्यांबाबत नि:संदिग्ध हमी देण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंतचा वेळ आहे, असा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता.
  • तसेच अझीझ यांना भेटण्यासाठी दिल्लीत थडकलेले हुरियतचे नेते शाबीर अहमद शाह, बिलाल लोन याच्यासह तिघांना स्थानबद्ध करण्यात आले. या स्थानबद्धतेबद्दल पाकिस्तानने आगपाखड करीत रात्री उशीरा चर्चाच रद्द करण्याची घोषणा केली.
 दाऊदची पाकिस्तानात ९ घरे 
  • कुख्यात दाऊद इब्राहिम याची पाकिस्तानात नऊ घरे असून तो सातत्याने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलतो, याबाबतचे पुरावे सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत भारत देणार होता. या घरांचा तपशील उघड झाला आहे.
  • यातील कराचीतील एक घर दाऊदने दोन वर्षांपूर्वीच घेतले असून ते पाकिस्तानी नेते बिलावल भुत्तो झरदारी यांच्या निवासस्थानाजवळ असल्याचे भारताने उघड केले आहे.
  • दाऊदकडील तीन पारपत्रांचा तसेच त्याची पत्नी, मुले व भावांच्या पारपत्रांचा तपशीलही भारताने जाहीर केला आहे.
 पाकिस्तानशी क्रिकेट नाही 
  • दाऊद पाकिस्तानात असताना आणि भारतातील दहशतवादी कारवायांना सीमेपलीकडून पाठबळ मिळत असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे शक्य नाही, अशी टिप्पणी बीसीसीआयचे सरचिटणीस अनुराग ठाकूर यांनी केली.
  • उभय देशांत संयुक्त अरब अमिरातीत डिसेंबरमध्ये क्रिकेट सामना नियोजित असून तो आता होणार नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे

अरूण जेटली यांच्याहस्ते बंधन बँकेचे उद्घाटन

    Bandhan Bank
  • देशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेतील परिवर्तन अखेर २३ ऑगस्ट रोजी झाले. तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ६० हजार खाती व ८० कोटी रुपये ठेवींसह झाला.
  • 'आपका भला, सबकी भलाई' या ब्रिदसह सुरू झालेल्या बंधन बँकेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कोलकता येथे झाले. त्याचबरोबर बँकेच्या देशभरातील ५०१ शाखांची सुरुवातही झाली.
  • येत्या सात महिन्यात बँकेच्या शाखांची संख्या ६३२ पर्यंत तर एटीएमची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचा बँकेचा मनोदय आहे. तसेच चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत बँकेचे अस्तित्व देशभरातील २७ राज्यांमध्ये निर्माण होणार आहे.
  • देशातील विविध २४ शहरांमध्ये पहिल्याच टप्प्यातील ५०१ शाखांसह २,०२२ सेवा केंद्रे, ५० एटीएम कार्यरत झाले. १.४३ कोटी बँक खाती व १०,५०० कोटी कर्ज याद्वारे बँकेच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे.
  • २,५७० कोटी रुपये भांडवलासह बँक व्यवसाय सुरू करणाऱ्या बंधनने लवकरच ३,०५२ कोटी रुपयांच्या भांडवलाचे ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेची भांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांची आहे.
  • बँकेत सध्या १९,५०० कर्मचारी असून ७१ शाखा ग्रामीण तर ३५ शाखा बँक नसलेल्या भागात असतील. राज्यांमध्ये सर्वाधिक २२० शाखा या बंधनचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये असतील. महाराष्ट्रात तिच्या २१ शाखा आहेत.
  • कोलकाता येथे लघु वित्त पुरवठा करणाऱ्या बंधन फायनान्स सर्व्हिसेसला गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेकडून सामान्य बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती.
  • बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  : चंद्रशेखर घोष

‘डीआरडीओ’ची पतंजली आयुर्वेद कंपनीसोबत भागीदारी

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली असून, आता डीआरडीओने विकसीत केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंट्स आणि अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहिरात रामदेव बाबा करणार आहेत.
  • यासाठी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, डीआरडीओ प्रमुख एस. क्रिस्तोफर आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थित एक करार करण्यात आला.
  • पतंजली योगपीठ आणि ‘डीआरडीओ’च्या डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (DIHAR) मध्ये हा करार झाला. या करारानुसार ‘डीआरडीओ’च्या लेह येथील ‘डीआयएचएआर’ या प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी होणार आहे. 
  • या प्रयोगशाळेत शेती व प्राण्यांवर आधारित उत्पादनांचे विकसन केले जाते. उत्पादनांच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळेचा वापर होईल आणि तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री व जाहिरातीसाठी पतंजली योगपीठ मदत करेल.
  • याशिवाय ‘डीआयएचएआर’ आणि पतंजली यांच्यात तांत्रिक देवाण-घेवाण देखील होणार आहे. ‘डीआयएचएआर’ रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आपली पाच उत्पादने कशी तयार करायची याची तांत्रिक माहिती देणार आहे.
  • पतंजली मार्फत अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यात येतात. त्यास मोठी मागणी देखील आहे. या करारामुळे ‘डीआरडीओ’च्या उत्पादनांनासुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

५० शहरे सोलर सिटी म्हणून विकसित करण्यास मंजुरी

  • राष्ट्रीय राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी तसेच गोव्यातील पणजीसह देशातील एकूण ५० शहरांना ‘सौर शहरे’ अर्थात ‘सोलर सिटी’ म्हणून विकसित करण्यास नवीन आणि नविनीकरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
  • मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली गेली आहे. एकूण प्रस्तावित ६० शहरांपैकी ५० शहरांना सौर शहरे म्हणून विकसित करण्यास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ५० शहरांपैकी ४६ शहरांसाठी ‘मास्टर प्लान’ही तयार करण्यात आला आहे.
  • यात नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी या महाराष्ट्रातील चार शहरांसह आग्रा, गांधीनगर, राजकोट, सुरत, इम्फाळ, चंदीगड, गुडगाव, फरिदाबाद, बिलासपूर, रायपूर, आगरतळा, गुवाहाटी, जोरहाट, म्हैसूर, सिमला, हमीरपूर, जोधपूर, विजयवाडा, लुधियाना, अमृतसर, डेहराडून, पणजी आणि नवी दिल्ली (एनडीएमसी क्षेत्र) या शहरांचा समावेश आहे.
  • याशिवाय पाच शहरांना मंत्रालयाने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. यात थिरुवनंतपुरम, जयपूर, इंदूर, लेह आणि महबूबनगर यांचा समावेश आहे.

‘प्रो कबड्डी लीग २०१५’चे जेतेपद यु मुंबाकडे

    U Mumba pose for a photo after they won the Pro Kabaddi League title 2015
  • अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपद प्राप्त केले. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत उत्कंठा टिकवणाऱ्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा ३६-३० असा पराभव केला.
  • प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेत्याला १ कोटी रुपये आणि चषक देण्यात आले. तसेच उपविजेत्याला ५० लाख तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे ३० आणि २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
  • तेलुगू टायटन्सला तिसरे स्थान : राहुल चौधरीच्या दिमाखदार चढायांच्या बळावर तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सचा ३४ :२६ असा पराभव केला आणि तिसरे स्थान प्राप्त केले.
 अंतिम सामन्याची वैशिष्ट्ये 
  • सामन्याचे ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (वरळी)
  • सर्वोत्कृष्ट चढाईपटू : शब्बीर बापू
  • सर्वोत्कृष्ट बचावपटू : विशाल माने
  • सर्वोत्कृष्ट क्षण : शब्बीर बापू (एका चढाईत ३ गुण)
  • परिणामकारक खेळाडू आणि प्रेक्षक पसंती पुरस्कार : अनुप कुमार
  • भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते प्रो कबड्डी दुसऱ्या हंगामाच्या विजेत्या संघाला देण्यात येणार असलेल्या चषकाचे अनावरण झाले. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेला धोनी १०६ पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहे.
  • अत्यंत कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये आपल्या अभियानाने छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सादर केले.
  • अंतिम सामन्याला अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री कतरिना कैफ, भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दन गेहलोत आणि प्रो कबड्डीचे सहसंस्थापक आनंद महिंद्र उपस्थित होते.
  • त्याचबरोबर सामन्याला जयपूर पिंक पँथर्स संघाचा मालक अभिषेक बच्चन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनीही हजेरी लावली होती.
 प्रो कबड्डी लीग २०१५ स्पर्धेचे पुरस्कार 
  • विजेता संघ : यु मुंबा
  • उपविजेता संघ : बंगळुरू बुल्स
  • सर्वोत्कृष्ट चढाईपटू : काशिलिंग आडके (दिल्ली दबंग)
  • सर्वोत्कृष्ट पकडपटू :रवींद्रसिंग पहेल (दिल्ली दबंग)
  • सर्वोत्तम खेळाडू : मनजीत चिल्लर (बंगळुरू बुल्स)
 प्रो कबड्डी लीग 
    Pro Kabaddi
  • इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर २६ जुलै २०१४ रोजी ८ संघांसह प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली होती.
  • प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात जयपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगली, ज्यामध्ये जयपूरच्या संघाने मुंबईचा ३५-२४ असा पराभव करुन पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली होती.
  • प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला १८ जुलै रोजी मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली. महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन प्रो कबड्डी दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले.
  • दुसऱ्या सत्रातही अंतिम सामन्यात स्थान प्राप्त केल्यामुळे यु मुंबा संघ अंतिम सामन्यामध्ये २ वेळा स्थान मिळविणारा पहिला संघ ठरला.
सहभागी संघ
यू मुम्बापुणेरी पलटण
जयपूर पिंक पँथर्सबंगाल वॉरियर्स
पटणा पायरेटस्दबंग दिल्ली
तेलगू टायटन्सबंगळूर बुल्स

यिप्पी नूडल्समध्येही शिशाचे प्रमाण जास्त

  • उत्तर प्रदेश अन्न व औषध प्राधिकरणाने (एफडीए) केलेल्या तपासणीत यिप्पी नूडल्स या आयटीसी लि. कंपनीच्या नूडल्समध्येही शिशाचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. या प्रकरणी अन्न आयुक्तांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • २१ जूनला अधिकाऱ्यांनी स्थानिक मॉलमधून वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे ८ नमुने गोळा केले होते त्यात यिप्पी नूडल्सचाही समावेश होता. नंतर ते नमुने तपासणीसाठी लखनौ व मीरत येथे पाठवण्यात आले.
  • या नमुन्यांच्या तपासणीच्या अहवालानुसार यिप्पी नूडल्समध्ये शिसे १.०५७ पीपीएम एवढे सापडले आहे, ते १ पीपीएम पर्यंत घातक मानले जात नाही.
  • जादा शिशामुळे मुलांना रोग होतात तसेच प्रौढांनाही मेंदूचे आजार होतात, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
  • याआधी नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये जादा शिसे सापडले होते तसेच मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाणही अधिक होते. 

इटालियन नाविकांविरोधातील खटले मागे घेण्याचे भारताला आदेश

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या लवादाकडून भारत आणि इटली या दोन्ही देशांना इटालियन नाविकांच्या प्रकरणासंदर्भात एकमेकांविरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
  • दोन इटालियन नाविकांवर भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप आहे. मात्र, अशा प्रकारच्या खटल्यांमुळे हा मुद्दा अधिक चिघळू शकतो, असे सांगत लवादाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
  • लवादाने येत्या २४ सप्टेंबरपर्यंत दोन्ही देशांना आपापली बाजू मांडणारे अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. 
 पार्श्वभूमी 
  • केरळच्या सागरी हद्दीत २०१२ मध्ये मॅसिमिलिआनो लॅटोर आणि सॅल्व्हाटोर गिरोन या खलाशांनी समुद्री चाचे समजून दोन भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला होता. या घटनेत दोन्ही मच्छिमारांचा जागीच मृत्यू झाला होता.
  • त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने एनआयएकडे सोपविला होता. तसेच या आरोपींचा ताबा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडेच असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
  • मात्र, इटली सरकारने या संपूर्ण खटल्याच्या हाताळणीसंदर्भात नाराजी व्यक्त करताना हे प्रकरण आंतरराष्ट्रीय सागरी कायदा लवादाकडे नेले होते. 
  • या संपूर्ण प्रकरणावरून भारत आणि इटली या दोन्ही देशांमध्ये मोठ्याप्रमाणावर तेढ निर्माण झाली होती.

तंबाखूसेवनाने होणाऱ्या मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

  • ब्रिटनमधील ‘हुलयॉर्क मेडिकल स्कूल’च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार जगभरात तंबाखूसेवनाने जितके मृत्यू होतात, त्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे.
  • जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखूसेवनाने होणाऱ्या विकारांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापैकी ७५ टक्के नागरिक भारतातील आहे.
  • जगभरात तंबाखूच्या सेवनाने सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के मृत्यू दक्षिण आशियात होतात. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू भारतात आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये होत आहेत.
  • तंबाखूमुळे कर्करोग व हृदयविकार बळावत आहेत. तंबाखूचा धोका मोठा असून, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या व्यसनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 अहवालाचा सारांश 
  • जगभरातील ११५ देशांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केले जाते.
  • तंबाखूमुळे विविध ११३ प्रकारचे विकार होतात.
  • तंबाखूमुळे सर्वाधिक मृत्यू कर्करोग आणि हृदयविकारामुळे होतात.
  • भारतात दरवर्षी १० लाख नागरिक तंबाखूच्या सेवनाने मृत्युमुखी पडतात.

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : बोल्टला सुवर्णपदक

  • जमैकाच्या उसेन बोल्टने आपणच जगातील सर्वात जलद व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्टने ९.७९ सेकंदात १०० मीटरचे अंतर पूर्ण करून जेतेपद कायम राखले.
  • अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनकडून त्याला कडवी टक्कर मिळाली. गॅटलीनने ९.८० सेकंदाज शर्यत पूर्ण केली. अवघ्या ०.१ सेकंदाच्या फरकाने गॅटलीनचे सुवर्णपदक हुकले.
  • कॅनडाचा अ‍ॅड्रे डे ग्रासे (९.९२ से.) आणि अमेरिकेचा ट्रायव्हॉन ब्रोमेल (९.९२ से.) यांनी समान वेळ नोंदविल्यामुळे संयुक्तरित्या कांस्यपदक देण्यात आले.

निर्भया फंडा’तून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

  • रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने भारतीय रेल्वेने ‘निर्भया फंडा’च्या ७०० कोटी रुपयांतून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पंतप्रधान कार्यालयात झालेल्या एका बैठकीत नव्या मार्गांचे काम, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरब्रिजचे बांधकाम, तसेच प्रवाशांना उत्तम सुविधा आणि सुरक्षा पुरविणाऱ्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यात रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ‘निर्भया’ फंडातून लवकर निधी मिळविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालयासोबत समन्वय. बहुतांश रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची रेल्वेची योजना आहे; मात्र आतापर्यंत फार थोड्या गाड्यांमध्ये हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

इराण व इंग्लंडचे एकमेकांच्या राजधानीत दूतावास पुन्हा सुरु

  • मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने गेली चार वर्षे ठप्प झालेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दूतावास सुरू केले. 
  • २०११ साली तेहरानमधील दूतावासासमोर निदर्शने होऊन हल्लाबोल केल्यानंतर तेथील दूतावास बंदच करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला होता.
  • अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन यांच्याबरोबर इराणचा करार झाल्यांनतर दोन्ही देशानी एकमेकांच्या राजधानीमध्ये दूतावास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 रुहानी इफेक्ट 
  • इंग्लंड आणि इराणमध्ये दूतावास उघडून संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यामागे इराणमधील नव्या सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. २०१३ साली हसन रुहानी अहमदेजिनादना हरवून राष्ट्राध्यक्ष झाले.
  • त्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य देश, रशियाशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेबरोबरच्या अणुकरारापाठोपाठ इतरही सकारात्मक पावले उचलल्यामुळे त्यांची पाठ थोपटली जात आहे.