चालू घडामोडी : १३ एप्रिल

भारत-पाक सीमेवर अत्याधुनिक सुरक्षा योजना

  • हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना (कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम) लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
  • अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर २४ तास सीमेवर कडक नजर ठेवणारी ही योजना भारत पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कच्छपासून काश्मीरपर्यंत २९०० किलोमीटर परिसरासाठी असेल.
  • सीमेतून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी प्रत्येक ५ ते ६ किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम स्थापन केली जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास या कंट्रोल रूममधून सीमा सुरक्षा दलांना लगेच अलर्ट संदेश जारी होईल.
  • युद्धक्षेत्रात पहारा ठेवणाऱ्या रडार यंत्रणेचा वापर करण्याबरोबरच सीमेवर जागोजागी अंडरग्राऊंड सेन्सर्सही बसवले जाणार आहेत.
  • सीसीटीव्ही कॅमेरे तर सज्ज असतीलच, त्याचबरोबर ज्या भागात तारांचे कुंपण नाही, अशा ठिकाणी लेजर अवरोधक उपकरणेही वापरली जाणार आहेत.
  • पाचस्तरीय नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की एका यंत्रणेच्या नजरेतून एखादी बाब सुटली तरी पर्यायी यंत्रणेच्या देखरेखीतून ती सुटणे शक्य नाही असे या योजनेचे सूत्र आहे.
  • सीमेवर कडक देखरेखीची ही नवी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर अंतराला किमान १ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
  • वारंवार होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी यापेक्षा दुसरा प्रभावी उपाय सरकारकडे उपलब्ध नाही. जम्मू व पंजाबमधे प्रस्तुत योजनेचे दोन पायलट प्रकल्प पूर्वीच सुरू झाले आहेत.
  • येत्या दोन वर्षांत पश्चिम सीमेवर हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे. योजना वेळेत पूर्ण व्हावी म्हणून ५० ते ६० खाजगी कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

लॉजिस्टिक एक्स्चेंज करारास मान्यता

  • दोन्ही देशांच्या सैन्याला दुरुस्ती आणि साहित्याच्या पुरवठ्यासाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा करार (लॉजिस्टिक एक्स्चेंज) करण्यास भारत आणि अमेरिकेन तत्त्वत: मान्यता दिली आहे.
  • भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर असा करार करण्याचे निश्चित करण्यात आले.
  • मात्र अमेरिकेचे सैन्य भारतीय भूमीवर उतरून तळ ठोकेल, असा या कराराचा अर्थ नसल्याचेही दोघांनी या वेळी स्पष्ट केले. 
 लॉजिस्टिक एक्स्चेंज कराराचे महत्त्व 
  • लॉजिस्टिक एक्स्चेंज करार झालेल्या देशांना एकमेकांच्या सैन्याला माहिती, पुरवठा आणि इतर संरक्षण सेवा पुरविता येतात.
  • याचा अर्थ, आपत्तीच्या काळात मदत करणाऱ्या देशांना इंधन पुरवठा, साहित्य पुरवठा करण्यासाठी लष्करी तळांचा वापर करता येतो.

केरळमध्ये आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

  • पुट्टींगल मंदिरातील दुर्घटनेनंतर केरळ उच्च न्यायालयाने सूर्यास्त ते सूर्योदय या दरम्यान आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
  • परवानगीशिवाय असे फटाके वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 
  • पुट्टींगल मंदिरामध्ये महोत्सवादरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांचा भंग करण्यात आला होता, तसेच सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा