चालू घडामोडी : १९ जुलै

देशात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक अपघात

  • रस्ते व महामार्ग वाहतूक राज्यमंत्री पोन्नी राधाकृष्णन यांनी लोकसभेत अपघातांबाबत दिलेल्या माहितीनुसार, देशात २०१५मध्ये तमिळनाडूमध्ये सर्वाधिक अपघात (६९,०५९) झाले. त्यात १५,६४२ जणांचा बळी गेला.
  • २०१५मध्ये महाराष्ट्रात ६३ हजारांहून अधिक अपघात झाले असून, त्यात १३,२१२ जणांचा बळी गेला. अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र देशात दुसरा असून, बळींच्या संख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • याउलट देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात झालेल्या अपघातांची संख्या तुलनेने कमी (३२,३८५) आहे. मात्र, तेथे मृत्युमुखींची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६६ आहे.
  • महाराष्ट्रापाठोपाठ अपघातांची संख्येमध्ये मध्य प्रदेश व कर्नाटक अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहे.
  • २०१५मध्ये भारतात एकूण ५,०१,४२३ अपघात झाले आणि त्यात १,४६,१३३ जणांचा मृत्यू झाला. 
  • अपघातांची वाढती संख्या पाहून रस्ते व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय रस्ते निधीचा (सीआरएफ) १० टक्के हिस्सा रस्ते सुरक्षेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
 जगामध्ये भारतात सर्वाधिक अपघात 
  • आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जगामध्ये अपघातांची सर्वाधिक संख्या भारतामध्ये आहे.
  • त्यासाठी त्यांनी २०१३मधील आकडेवारी ग्राह्य धरली आहे. त्यानुसार, २०१३मध्ये भारतात अपघाती मृत्युमुखींची संख्या १ लाख ३७ हजार ५७२ इतकी होती. त्यापाठोपाठ अमेरिका (३२,७१९) आणि रशियाचा (२७,०२५) क्रमांक आहे.
 लक्षद्वीप जवळपास अपघातमुक्त 
  • एकीकडे या राज्यांमध्ये हजारोंचे अपघाती मृत्यू होत असताना, लक्षद्वीप या चिमुरडय़ा केंद्रशासित प्रदेशात एकही अपघाती मृत्यू झालेला नाही आणि फक्त तीनच अपघात झाले आहेत.
  • लक्षद्वीपची लोकसंख्या फक्त ६५ हजारांच्या आसपास आहे. तेथे २०१५मध्ये तीन अपघातांची नोंद झाली आहे. मात्र, त्यात जिवितहानी झालेली नाही.

भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा

  • इस्तंबूल येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.
  • त्यानुसार युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगड व सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष  यांचा समावेश आहे.
  • नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
  • याशिवाय पॅरिस येथील स्थापत्य विशारद ले कोर्बिझीयर यांनी मांडणी केलेल्या चंडीगडला वारसा ठिकाणात स्थान मिळाले आहे. १९५०मध्ये त्यांनी या शहराची रचना केली होती.
  • सिक्कीम नॅशनल पार्कचाही वारसा ठिकाणात समावेश केला आहे. माउंट कांचनजुंगा हे पर्वतशिखर त्यातच येते. काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडित आहेत. 
  • या बैठकीत एकूण ७ देशातील १७ ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत दीपिका व सौरवला विजेतेपद

  • बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने स्पर्धेच्या जेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवली.
  • मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्ना चिनप्पावर ३-१ असा विजय मिळवला.
  • पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस रक्कम नसल्याने दीपिकाने २०११नंतर राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
  • बक्षीस रकमा समान झाल्याने खेळणाऱ्या दीपिकाने १४ राष्ट्रीय जेतेपदे नावावर असणाऱ्या जोश्नाला नमवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
  • या स्पर्धेत भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल याने पुरुष गटाच्या अंतिम फेरीत हरींदरपाल सिंग संधूला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले.
  • सौरवने हरींदरपालला ३-२ असे पराभूत करताना ११व्य्यांदा राष्ट्रीय जेतेपद पटकावले.

उत्तर कोरियाची तीन क्षेपणास्त्रांची चाचणी

  • उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ५०० ते ६०० किलोमीटरपर्यंत आहे.
  • उत्तर कोरियाने नुकतेच पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे.
  • उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.

मुशर्रफ यांची बॅंक खाती व संपत्ती गोठविण्याचे आदेश

  • पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची सर्व बॅंक खाती आणि इतर संपत्ती गोठविण्याचे आदेश पाकिस्तानमधील विशेष न्यायालयाने दिले आहेत.
  • मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. याप्रकरणी मुशर्रफ यांना हजर राहण्याबाबत अनेकदा नोटीस बजावूनही त्याचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
  • मुशर्रफ यांनी शरणागती पत्करेपर्यंत अथवा त्यांना अटक होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करत असल्याचेही न्यायालयाने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा