चालू घडामोडी : २६ जुलै

दिनविशेष : कारगिल विजय दिवस

आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांना विमा संरक्षण

  • ऑनलाइन तिकिट बुकिंग करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आयआरसीटीसी १ रुपयात १० लाख रुपयांच्या विम्याचे कवच देणार आहे.
  • यासाठी आयआरसीटीसीने तीन विमा कंपन्यासोबत करार केला असून या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या १ सप्टेंबरपासून मिळणार आहे. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना तिकिटाऐवजी एक रुपया अतिरिक्त द्यावा लागणार आहे. ऑनलाइन तिकिट बुकिंग केल्यानंतर प्रवाशाला या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही असे दोन पर्याय असतील.
  • या योजनेंतर्गत जर प्रवाशांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू, हिंसेत मृत्यू, चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यू, तसेच चढताना किंवा उतरताना अपघातात मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ प्रवाशांना मिळू शकणार आहे. 
  • रेल्वे अपघातात जर पूर्णतः अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपये, तर जखमी झाल्यास उपचारासाठी २ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
  • आयआरसीटीसीने या योजनेसाठी रॉयल सुंदरम, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्योंरेंस आणि श्रीराम जनरल इंश्योंरेंस कंपनीची निवड केली आहे.

काश्मीरमधील संचारबंदी समाप्त

  • हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वणी याला ठार केल्यावर उसळलेल्या हिंसाचारावर काबू मिळविण्यासाठी काश्मीरच्या विविध भागांत लागू केलेली संचारबंदी सतराव्या दिवशी उठविण्यात आली.
  • गेले काही दिवस बंद असलेली श्रीनगर मुझफ्फराबाद बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. पाकिस्तान आणिभारत यांच्यात एप्रिल २००५पासून ही बससेवा सुरू करण्यात आली होती.
  • बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत ४०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
  • वणी लष्कराशी उडालेल्या धुमश्चक्रीत ठार झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरातील फुटीरतावादी संघटनांनी नऊ जुलैपासून बंद पुकारला आहे.
  • फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स (एचसी) संघटनेचे अध्यक्ष सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 
  • हुरियत कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दोन संघटनांनी ‘अनंतनाग चलो’ची हाक दिली होती. या सभेला जाण्यासाठी गिलानी घराबाहेर पडताच पोलिसांनी त्याला अटक केली.
  • किश्तवार येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळाफेकपटू इंदरजीत सिंग उत्तेजक सेवनात दोषी

  • रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय खेळाडू व गोळाफेक प्रकारातील आशियाई विजेता इंदरजीत सिंग उत्तेजक सेवनात दोषी ठरला आहे.
  • राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) २२ जून रोजी इंदरजीतच्या नमुन्याची चाचणी घेतली होती. त्यापैकी ‘अ’ नमुन्यात तो दोषी आढळला. यामुळे त्याच्या रिओला जाण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • ‘नाडा’ने इंदरजीतला येत्या काही दिवसांत ‘ब’ नमुन्याची चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यातही तो दोषी आढळला, तर जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) नवीन नियमानुसार त्याच्यावर चार वर्षांची बंदी येऊ शकते.
  • एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा इंद्रजित सिंह रिओ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता.

फ्लिपकार्टच्या ‘मिंत्रा’कडून जबाँगचे अधिग्रहण

  • फ्लिपकार्टचा मालकी हक्क असलेल्या मिंत्रा कंपनीने ऑनलाइन फॅशन संकेतस्थळ जबाँगचे अधिग्रहण आहे.
  • मिंत्रा आणि जबोंगचे एकत्रितपणे सुमारे दीड कोटी युझर्स आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑनलाईन मंचावर अनेक बड्या फॅशन ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध आहेत.
  • २०१२मध्ये सुरू झालेली जबाँग आर्थिक कामगिरी खालावल्याने गेल्या काही काळापासून खरेदीदाराच्या शोधात होती. 
  • जबोंगची खरेदी करण्यासाठी फ्युचर समुह, स्नॅपडील, आदित्य बिर्ला समूह अशा अनेक कंपन्या शर्यतीत होत्या.
  • २०१४मध्ये फ्लिपकार्टने जवळजवळ २००० कोटी रुपयांत मिंत्राची खरेदी केली होती. जबाँगच्या अधिग्रहणाने भारतातील फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात फ्लिपकार्ट ग्रुप निर्विवादपणे अग्रणी राहाणार आहे.

शरद पवार यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक

  • माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’चे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ जाहीर झाले आहे.
  • लोकमान्य टिळक यांची ९६वी पुण्यतिथी आणि त्यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्ष या निमित्ताने या पारितोषिकाचे वितरण १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
  • पारितोषिकाचे हे ३४वे वर्ष असून एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
  • या आधी इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, डॉ. शंकरदयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, डॉ. वर्गिस कुरियन, नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा अशा मान्यवरांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
  • कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत देशाची प्रगती घडविण्यात शरद पवार यांनी साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांची यंदाच्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

नीता अंबानी यांना ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना सरकारकडून आता ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा देण्यात आली आहे.
  • केंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात नीता अंबांनी यांना विशेष सुरक्षा देण्याची  शिफारस करण्यात आली होती.
  • मुकेश अंबानी यांना देखील बऱ्याच वर्षांपासून ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी १० सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • झेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत ४० सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात. सीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते.
  • झेड सुरक्षा ही झेड प्लसनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा आहे. सध्या भारतात ५८ व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.

आयटी क्षेत्रात टीसीएस सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी

  • नवी दिल्ली देशातील माहिती तंत्रज्ञान अर्था आयटी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये मुंबईस्थित टीसीएस अग्रेसर ठरली आहे.
  • त्याखालोखाल इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो व कॅपेजेमिनी या कंपन्यांचे क्रमांक लागले आहेत. ही माहिती आयटी उद्योगाची संघटना असलेल्या नॅसकॉमने आपल्या निवेदनात दिली आहे. 
  • यापैकी कॉग्निझंट ही अमेरिकास्थित कंपनी असली तरी तिचे सर्वाधिक कर्मचारी भारतात आहेत. चेन्नई, बंगळूरु व हैदराबाद येथे कंपनीची विकासकेंद्रे आहेत.
  • जून २०१६अखेर टीसीएसमध्ये ३.६२ लाख कर्मचारी नोंदवले गेले आहेत. त्याखालोखाल इन्फोसिसमध्ये १.९७ लाख आणि विप्रोमध्ये १.७३ लाख कर्मचारी असल्याचे आढळले आहे.
  • पहिल्या १० कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजिज, टेक महिंद्र, जेनपॅक्ट, इंटेलनेट ग्लोबल सर्व्हिसेस व एजिज या कंपन्यांचाही समावेश आहे. 

अरुंधती घोष यांचे निधन 

  • अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत अरुंधती घोष यांचे निधन झाले.
  • घोष यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असला, तरी त्यांची जडणघडण मुंबईत झाली.
  • कोलकात्यातील लेडी ब्रेबोर्न महाविद्यालय आणि विश्व-भारती विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर १९६३मध्ये त्या भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या होत्या.
  • भारताच्या मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक युरोपीय देशांमध्ये काम केले. यामध्ये ऑस्ट्रिया, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि नेदरलॅंड आदी देशांचा समावेश आहे.
  • जिनिव्हातील अमेरिकेच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या अधिकारी होत्या. जिनिव्हा येथे आण्विक चाचणीबंदी करारासंबंधी परिषदेत मांडलेल्या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
  • १९९७मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर १९९८ ते २००४ या काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्या म्हणून काम पाहिले होते.

सलमान खानची चिंकारा शिकार आरोपातून मुक्तता

  • अभिनेता सलमान खान याला राजस्थान उच्च न्यायालयाने चिंकारा शिकारप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या दोन आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.
  • सलमान आणि त्याच्या सहकारी कलाकारांनी १९९८मध्ये जोधपूरमध्ये चिंकाराची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल झाले होते.
  • स्थानिक न्यायालयाने या दोन्हीप्रकरणी सलमानला दोषी ठरवत अनुक्रमे एक आणि पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात सलमानने वरिष्ठ न्यायालयात अपील केले होते.
  • दुर्मिळ चिंकाराची शिकार केल्याच्या या प्रकरणात सलमानला २००७मध्ये सात दिवस तुरुंगातही काढावे लागले होते. 
  • चिंकाराच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या सलमान खानच्या बंदुकीतून मारल्या गेल्या नव्हत्या, हा मुद्दा मान्य करत न्यायालयाने सलमानची आरोपातून मुक्तता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा