चालू घडामोडी : २८ जुलै

अमेरिकेकडून पी ८ आय या लढाऊ विमानांच्या खरेदी

  • भारताने अमेरिकेसोबत चार पोसायडन ८आय (पी ८आय) या लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक अब्ज डॉलरचा करार केला.
  • गेल्या दहा वर्षांत भारताने संरक्षण सामग्रीसाठी केवळ अमेरिकेसोबत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. 
  • याआधी २००९ मध्ये २.१ अब्ज डॉर्लसना खरेदी केलेली अशी आठ लढाऊ विमाने मे २०१३ आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती.
  • पोसायडन ८आय १२०० मैलांपर्यंत मारा करू शकणार आहे. समुद्री निरीक्षण व गुप्तचर तपास मिशन अशा महत्त्वाच्या मोहिमांवर याचा उपयोग होणार आहे.
  • हारपून ब्लॉक क्षेपणास्त्राने सज्ज असणारी ही विमाने टेहळणी बरोबरच शत्रूच्या पाणबुडयांनाही लक्ष्य करु शकतात.
  • २२ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या एएन-३२ या विमानाच्या शोधासाठीही या विमानांची मदत घेण्यात येत आहे.
  • सध्या नौदलात पी ८आयएस हे लढाऊ विमान हार्पन ब्लॉक २ मिसाईलसह सज्ज आहे. याचसोबत एमके-५४ लाइटवेट पाणबुड्या, रॉकेट आदींचा समावेश आहे.
  • तसेच समुद्रावर लक्ष्य करण्यासाठी ‘इंटेलिजंट हॉक आय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे. 

ज्येष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांचे निधन

  • ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी (वय ९०) यांचे २८ जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • महाश्वेता देवी यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यामध्ये झाला. नंतर महाश्वेता देवी यांचे संपूर्ण कुटुंब पश्चिम बंगालमध्ये येऊन स्थायिक झाले.
  • कोलकाता विद्यपीठातून इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यावर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून नोकरी केली.
  • महाश्वेता देवी यांनी विविध बंगाली मासिकांमधून तरुण वयातच लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. ‘झाँशी की रानी’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.
  • महाश्वेता देवी यांचे लघुकथेचे २० संग्रह, त्याचबरोबर बंगाली भाषेत १०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • ‘झाँसी की रानी’, ‘हजार चौराशिर माँ’, ‘रुदाली’ या त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
  • महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा कोरकू या मागासलेल्या जमातीवर बेतलेली होती.
  • महाश्वेतादेवी लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारताच्या वेगवेगळया समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले.
  • त्यांच्या या साहित्यीक योगदानासाठी १९९६ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पुढच्याच वर्षी मॅगसेसे पुरस्कारही त्यांना मिळाला. हे दोन्ही पुरस्कार पटकाविणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.

बेनामी व्यवहार सुधारणा विधेयक मंजुर

  • काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून लोकसभेमध्ये सर्वसमावेशक बेनामी व्यवहार सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
  • बेनामी व्यवहार (मनाई) सुधारणा विधेयक २०१५ लोकसभेमध्ये मांडताना अर्थमंत्री जेटली म्हणाले की, हे विधेयक प्रामुख्याने काळ्या पैशाविरोधातील एक उपाय आहे.
  • या कायद्याचा उद्देश बेनामी मालमत्ता जप्त करणे आणि संबंधित गुन्हेगारांवर खटला चालवणे हा आहे.
  • बेहिशेबी उत्पन्न मिळवणारे असंख्य लोक काल्पनिक नावांवर बेनामी मालमत्ता खरेदी करतात. अशा व्यवहारांना चाप लावणे आवश्यक आहे.

अमृतलाल मकवाना यांच्याकडून पुरस्कार वापसी

  • गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत.
  • मकवाना यांना २०१२-१३ मध्ये ‘खरापत नू दलित लोकसाहित्य’ याबद्दल देसी जीवन श्रेष्ठ दलित साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • मकवाना यांनी उना येथील घटनेच्या निषेधार्थ या पुरस्कारासह मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कमही अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केली आहे.
  • उना येथे चार दलित नागरिकांना गायीची कातडी काढल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा