चालू घडामोडी : ८ ऑक्टोबर

जुआन मॅन्युएल सॅन्टोस यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

  • कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅन्युएल सॅन्टोस यांना २०१६ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 
  • कोलंबियामध्ये ५२ वर्षांपासून सुरु असलेला यादवी संघर्ष संपविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात आले.
  • कोलंबियन यादवी युद्धात आत्तापर्यंत २ लाख २० हजार लोक मरण पावले असून, ६० लाख लोक विस्थापित झाले आहेत.
  • बंडखोरांबरोबर शस्त्रसंधी करार घडवून आणत शांतीचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केल्याचे नोबेल समितीने त्यांच्या नावाची घोषणा करताना म्हटले आहे.

 शस्त्रसंधी करार वादग्रस्त 
  • सॅन्टोस यांनी केलेला हा करार जनतेने नुकताच धुडकाविला असल्याच्या पार्श्वभूमीवर नोबेल पुरस्काराची ही निवड काही प्रमाणात वादग्रस्त ठरली आहे.
  • सलग चार वर्षे रेव्हल्यूशनरी आर्म फोर्सेस ऑफ कोलंबिया (एफएआरसी) या बंडखोर संघटनेचा प्रमुख रॉड्रीगो लॉन्डोनो याच्याबरोबर चर्चा करून सॅन्टोस यांनी गेल्याच महिन्यात हा करार केला होता.
  • या करारावर सॅन्टोस यांनी सार्वमत घेतले, त्यात सँटोस यांना काठावरचे बहुमत मिळाले होते. अनेकांनी या करारातील अटी फेटाळल्या होत्या.
 तरीही पुरस्कार देण्याचे कारण 
  • अनेक मतदारांनी शांतता करार फेटाळला होता तरी त्याचा अर्थ शांतता प्रक्रिया संपली, असा नव्हता. ते शांततेविरोधातील मतदान नव्हते.
  • सॅन्टोस यांच्या प्रयत्नांमुळे कोलंबियामुळे शांतीची आशा निर्माण झाल्याचे नोबेल समितीच्या अध्यक्षा कॅसी कुलमन यांनी म्हटले आहे.
  • कोलंबियातील यादवी युद्ध हे आधुनिक काळातील मोठे युद्ध असून त्यात सामाजिक अन्याय, दारिद्रय़, अमली पदार्थ अशी अनेक आव्हाने आहेत.
  • कोलंबियामध्ये अराजकतेचे वातावरण असताना शांततेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही या वेळी समितीने म्हटले आहे.
  • सॅन्टोस यांना पुरस्कार जाहीर करताना नोबेल निवड समितीने कोलंबियाच्या नागरिकांचेही कौतुक केले आहे.
  • प्रचंड नुकसान सहन करूनही या नागरिकांनी शांततेची आशा सोडलेली नाही. त्यांचा सन्मानही या पुरस्काराने झाला आहे.

गुजरातमधून पाकला होणारा भाजीपाला पुरवठा बंद

  • भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानला भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दररोज ३ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. गेल्या २ दिवसांपासून निर्यात बंद करण्यात आली आहे. 
  • गुजतरामधून पाकिस्तानला दररोज ५० ट्रकद्वारे १० टन भाजीपाला निर्यात करण्यात येतो. त्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीचे प्रमाण सर्वाधिक असते.
  • टोमॅटो आणि मिरचीसोबतच लिंबू आणि भोपळ्याचीही पाकिस्तानमध्ये निर्यात केली जाते. वाघा सीमारेषेवरुन हा भाजीपाला पाकिस्तानमध्ये पाठवला जातो.
  • गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी १९९७नंतर प्रथमच पाकिस्तानला भाजीपाल्याची निर्यात बंद केली आहे.
  • जोपर्यंत दोन्ही देशातील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत पाकला भाजीपाल्याचा पुरवठा करणार नाही, अशी ठोस भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
  • बांगलादेश, आखाती देश, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आदी देशांना नियमितपणे भाजीपाल्याची निर्यात सुरूच असल्याचेही ते म्हणाले.

परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे यांची हत्या

  • फर्स्ट लेडी ऑफ स्मेल अशी ओळख असलेल्या परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे यांची त्यांच्या गोव्यातील राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे.
  • त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला. मारेकऱ्यांनी मोनिका यांच्यावर बलात्कार करून घरात चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • मोनिका या घरात एकट्याच होत्या. मोनिका या पतीसोबत दुरावा निर्माण झाल्यानंतर जुलै २०१६पासून येथे भाड्याने राहत होत्या. मोनिका घुरडे या भारतातील प्रसिद्ध परफ्यूम एक्सपर्ट होत्या.
  • मोनिका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 कोण आहेत मोनिका घुरडे ? 
  • मोनिका घुरडे या मूळच्या नागपूरमधील आहेत. त्यांचे वडिल मुंबईत लहान प्रकरणातील न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
  • मोनिकाने जे. जे. इन्स्टिट्युटमधून फोटोग्राफी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. परफ्युम क्षेत्रात रस असल्याने त्या २००९साली चेन्नईमध्ये गेल्या.
  • त्यानंतर २०११साली पुन्हा गोव्यात आल्या. तेथे त्यानीं स्वत:ची परफ्युम तयार करणारी ‘मो लॅब’ नावाची कंपनी स्थापन केली.
  • नामांकित कंपन्यांसाठी परफ्युम तयार करत असल्याने गोव्यात त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त केली होती. शिवाय सामाजिक क्षेत्रात त्या सुपरिचित होत्या.

हैतीला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

  • उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटावरील सर्वांत गरीब देश असलेल्या हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे.
  • या चक्रीवादळामुळे हैतीमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली असून, ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 
  • वादळाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाचा दुर्गम भागाशी संपर्क तुटला असून त्यामुळे तेथील हानीची माहितीही उपलब्ध झालेली नाही.
  • हैती आणि क्यूबामध्ये आपला परिणाम दाखवून या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.
  • हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबामा प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आहे.
  • कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक व शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा