चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर

नवीन बेनामी संपत्ती प्रतिबंध कायदा १ नोव्हेंबरपासून लागू

  • बेनामी संपत्ती प्रतिबंध या कायद्यातील नवीन नियम आणि तरतुदींची अमंलबजावणी १ नोव्हेंबर २०१६ पासून करण्यात येणार आहे.
  • काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी संसदेने ऑगस्टमध्ये बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा पारित केला केला आहे.
  • हा कायदा लागू झाल्यानंतर १९८८च्या बेनामी व्यवहार कायद्याचे नाव बदलणार असून, ते बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंध कायदा असे होणार आहे.
  • जुन्या कायद्यानुसार बेनामी व्यवहार केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद होती.
  • मात्र नवीन कायद्यामुळे ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • याशिवाय बेनामी संपत्ती आढळल्यास ती नुकसानभरपाई न देता जप्त करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे.
  • चर्च, गुरुद्वारा, मशीद तसेच मंदिरात मूळ संपत्ती असेल तर कलम ५८ अंतर्गत सरकारला ती मुक्त ठेवण्याचा अधिकार असेल.
  • नवीन कायद्यामध्ये शिक्षेमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे बेनामी व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.

बॉक्सिंग फेडरेशनला सरकारची मान्यता

  • बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला क्रीडा मंत्रालयातर्फे बॉक्सिंगची राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • ही मान्यता दिल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय बॉक्सर्सना जय्यत तयारी करता येईल.
  • २०१२पासून बॉक्सिंग संघटनाच अस्तित्वात नसल्यामुळे भारतीय बॉक्सर्सचे प्रचंड नुकसान झाले होते.
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये तर भारताचे केवळ ३ बॉक्सर्स सहभागी झाले. लंडन ऑलिम्पिकमध्ये ही संख्या ८ होती.
  • बॉक्सिंग असोसिएशनच्या सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये स्पाइसजेट एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
  • महाराष्ट्र बॉक्सिंगचे अध्यक्ष जय कवळी यांची बॉक्सिंग फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून निवड झाली.

एनआयए महासंचालकपदी शरदकुमार यांना मुदतवाढ

  • राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शरदकुमार यांना सलग दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • शरदकुमार हे १९७९च्या तुकडीचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. ३० जुलै २०१३ रोजी त्यांची ‘एनआयए’च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • पठाणकोट हल्ला, काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, समझोता एक्स्प्रेस स्फोट, वर्धमान स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास सध्या ‘एनआयए’ करीत आहे.
  • या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होण्यासाठी शरदकुमार यांच्या नियुक्तीचा लाभ होणार आहे.
  • शरदकुमार यांना त्यांच्या सेवाकाळात १९९६ आणि २००४मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

काश्मीरी गायिका राज बेगम यांचे निधन

  • काश्मीरमधील गानकोकिळा, काश्मीरच्या आशा भोसले अशी ख्याती मिळवलेल्या राज बेगम यांचे २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • रेडिओ काश्मीरसाठी त्यांनी गायन केले होते. तसेच भारत व परदेशात मैफलीही केल्या होत्या.
  • राज बेगम यांचा जन्म श्रीनगरमध्ये २७ मार्च १९२७ रोजी झाला. सुरुवातीला त्या महिलांसाठी गायन करीत असत, कारण त्या काळात समाजाची स्थिती बंदिस्त होती, अनेक बंधने महिलांवर होती.
  • शास्त्रीय संगीत, गीते यात त्यांना निपुणता मिळालेली होती. १९५४ ते १९८६ या काळात त्यांनी रेडिओ काश्मीरसाठी गायन केले.
  • २००२मध्ये त्यांना पद्मश्री तर २०१३मध्ये संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सादिक स्मृती पुरस्कार, काश्मिरी लोकसंगीत सुवर्णपदक, कला केंद्राचे रजत पदक, बक्षी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 
  • बेगम यांच्या गायनाचा फारसा प्रसार झाला नाही. बरेच प्रयत्न करूनही त्यांचे संगीत सार्वजनिक पातळीवर आले नव्हते.
  • रेडिओ काश्मीरमध्ये केवळ सरकारी मनोवृत्ती असल्याने त्यांच्या गाण्याच्या कॅसेट वगैरे सहज उपलब्ध होताना दिसत नव्हत्या.
  • पतीने त्यांना गाण्यास मनाई केली पण प्रत्यक्ष मैफलीचा प्रतिसाद बघून त्यांचा विरोध मावळला.
  • त्यांनी या क्षेत्रात महिलांवर असलेल्या सामाजिक मर्यादा ओलांडल्या आणि दाल सरोवरइतकीच त्या काश्मीरची शान बनल्या.

भारत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

  • कर्णधार आणि गोलरक्षक पी आर श्रीजेशच्या जबरदस्त बचावामुळे भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
  • भारताने दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटमध्ये दक्षिण कोरियावर ५-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे २-२ गोल झाले होते. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने दक्षिण कोरियाला ५-४ असे रोखले.
  • भारताचा संघ तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
  • मलेशिया आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार असून, त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा अंतिम फेरीत सामना होईल. 
  • २०११मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा