चालू घडामोडी : ४ फेब्रुवारी

विक्रम लिमये एनएसईचे नवे एमडी व सीईओ

  • राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयडीएफसी लिमिडेटचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची नियुक्ती झाली आहे.
  • एनएसईच्या पहिल्या महिला अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्यानंतर २ डिसेंबर २०१६पासून हे पद रिक्त होते.
  • अशोक चावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बाजाराच्या संचालक मंडळात लिमये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीला बाजार नियामक सेबीची मंजुरी प्रतिक्षित आहे.
  • नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळातील एक सदस्य म्हणून लिमये यांची नियुक्ती झाली. कॅगचे माजी प्रमुख विनोद राय हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
  • स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीची वित्त पुरवठादार कंपनी असलेल्या आयडीएफसी लिमिटेडचे विक्रम लिमये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
  • वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या लिमये यांनी वित्त आणि बहु व्यवस्थापन विषयातील व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहेत.

'विस्डेन'च्या मुखपृष्ठावर विराट कोहली

  • भारतीय कसोटी, एकदिवसीय व टी-२० क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहलीला क्रिकेटचा धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या 'विस्डेन'च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळाला आहे.
  • ख्रिसमसपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराटने द्विशतक ठोठावले आणि करीअरमधील सर्वोच्च धावसंख्याही (२३५) नोंदवली होती.
  • विस्डेनचा २०१७चा अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'विस्डेन'ने अंकाचे मुखपृष्ठ ट्विट केले आहे. 
  • विस्डेनच्या अंकात झळकण्याचा मान मिळवणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१४साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला होता.
  • नोव्हेंबर २०१३मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ‘विस्डेन’ने कव्हर फोटोतून त्याच्या कारकिर्दीला सलाम केला होता.

भारतीय वंशाच्या लेखिका भारती मुखर्जी यांचे निधन

  • ‘द मिडलमन अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’ या कादंबरीच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी लेखिका भारती मुखर्जी यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म २७ जुलै १९४० रोजी कोलकात्यामध्ये झाला. अमेरिकेत त्यांनी सर्जनशील लेखनात पदवी घेतली होती व अनेक वर्षे कॅनडात राहात होत्या.
  • कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठात त्या इंग्रजीच्या मानद प्राध्यापक होत्या. स्थलांतरितांचे संपन्न अनुभव व त्यातील विविधता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.
  • त्यांच्या ‘द मिडलमन अ‍ॅण्ड द अदर स्टोरीज’ या कादंबरीला नॅशनल बुक क्रिटिक सर्कल पुरस्कार मिळाला होता. तिला स्थलांतरितांवर बेतलेल्या पात्रांचा साज होता.
  • त्यांची ‘जस्मीन’ ही कादंबरी सर्वाधिक गाजलेली होती. या कादंबरीला शाळा, महाविद्यालयांच्या वाचनप्रिय पुस्तकात लगेच स्थान मिळाले.
  • भारती मुखर्जी यांनी आयोवात डॉक्टरेट केली. ‘अ‍ॅन इनव्हिजिबल वुमन’ हा सॅटर्डे नाइट या नियतकालिकातील त्यांचा निबंध गाजला होता.
  • ‘द टायगर्स डॉटर’ ही त्यांची आत्मचरित्रात्मक कहाणी आहे. याशिवाय होल्डर ऑफ द वर्ल्ड, डिझायरेबल डॉटर्स, द ट्री ब्राइड, मिस न्यू इंडिया या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या.
भारती मुखर्जी यांची साहित्यसंपदा
दि टायगर्स डॉटर वाइफ डिजायरेबल डॉटर्स
दि होल्डर ऑफ द वर्ल्ड डार्कनेस दि ट्री ब्राइड

दुसरे घर खरेदी करणाऱ्यांना करात सवलत नाही

  • दुसरे घर खरेदी करणाऱ्यांना करात वर्षाला २ लाख रुपयांची सूट देण्याचा प्रस्ताव मागे घेण्यास सरकारने ठामपणे नकार दिला आहे.
  • दुसऱ्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात मिळालेल्या सवलतीचा अनेकदा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे.
  • त्याशिवाय पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना करसवलत देण्यास प्राधान्य मिळायला हवे. याउलट दुसरे घर घेणाऱ्यांना अशा प्रकारची करसवलत देणे योग्य नाही, असेही सरकारचे म्हणणे आहे.
  • सध्याच्या नियमानुसार, घरमालक भाड्याने दिलेल्या घरावर अथवा मालमत्तेवरील व्याजावर पूर्ण कपातीचा दावा सांगू शकतात.
  • तर आपल्या राहत्या घरावरील कर्जाच्या व्याजदरामुळे ते २ लाखापर्यंतची करसवलत घेऊ शकतात.
  • मात्र, अर्थमंत्र्यांनी अलीकडेच सादर केलेल्या प्रस्तावात घर भाड्याने दिले तरी, मालक केवळ २ लाखापर्यंतच्या करसवलतीसाठीच दावा करू शकतो.
  • त्यामुळे दुसऱ्या घराच्या कर्जावरील व्याजात करसवलत मिळवण्यासाठी आता ते अर्ज करू शकणार नाहीत.

गोध्रा दंगलीतील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

  • गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीतील सर्वच्या सर्व म्हणजे २८ आरोपींची गांधीनगर न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी ३१ जानेवारी रोजी निर्दोष मुक्तता केली.
  • गोध्रा रेल्वे स्थानकांत झालेल्या जळीतकांडानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत आरोपींवर आरोप ठेवण्यात आले होते.
  • गांधीनगर जिल्ह्यातील कलोल तालुक्यातील पालियाड गावात जाळपोळ, दंगल माजविणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोप या २८ जणांवर होते.
  • या प्रकरणातील साक्षीदारांनी आरोपींना ओळखण्यास असमर्थता दर्शविल्याने या आरोपींविरुद्ध पुरेसा सबळ पुरावा नसल्याचे कारण या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
  • गोध्रा रेल्वे स्थानकात साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी लावण्यात आलेल्या आगीत जवळपास ५८ जण मृत्युमुखी पडले होते.
  • त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत मुख्यत्वे अल्पसंख्य समाजातील जवळपास एक हजार जण ठार झाले होते.

हाफिज सईदच्या जमात उद दवाचे नामांतर

  • मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने आपल्या जमात उद दवा या संघटनेचे ‘तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर’ असे नामांतर केले आहे.
  • पाकिस्तान सरकारने त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतर जमात उद दवाचे जाळे पाकिस्तानमध्ये अबाधित राखण्यासाठी त्याने असे नामांतर केल्याची शक्यता आहे.
  • हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान सरकारने परदेश प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. काही दिवसांपासून त्याला नजरकैदेतही ठेवण्यात आले आहे.
  • ५ फेब्रुवारी रोजी काश्मीर दिवस आहे. या दिवशी लाहोर आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये सईदच्या नव्या संघटनेच्या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
  • या नव्या संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत तसेच रुग्णवाहिकांची सेवादेखील सुरू करण्यात आली आहे.
  • सईदच्या कारवायांचा दाखला देऊन भारत पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा