चालू घडामोडी : ५ फेब्रुवारी

१ एप्रिलपासून रोख व्यवहारांवर निर्बंध

  • १ एप्रिलपासून ३ लाखांपुढील सर्व रोख व्यवहारांवर केंद्र सरकार १०० टक्के दंड लावणार आहे. रोख व्यवहार पूर्णपणे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • अर्थसंकल्प २०१७-१८ मध्ये अरुण जेटलींनी आयकर कायद्यामध्ये कलम २६९ एसटीमध्ये ही तरतूद टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
  • त्यानुसार एका दिवसात ३ लाखांच्यावर रोख व्यवहार करण्यास निर्बंध लावण्यात येतील. बॅंक आणि सरकारी कामासाठी हे निर्बंध नसतील.
  • जी व्यक्ती ही रक्कम स्वीकारेल त्या व्यक्तीलाच दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याची तरतूद आहे.
  • लोकांनी जास्त मोठ्या रकमेचे रोख व्यवहार करू नये या दृष्टीने १ एप्रिलपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे.
  • नोटाबंदीद्वारे काळ्या पैशांच्या साठ्यावर सरकारने हल्ला चढवला. आता, भविष्य काळात काळा पैसा निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने दिलेल्या अहवालात ५०,०००च्या वर रोख व्यवहार करण्यासाठी निर्बंध असावेत अशी सूचना करण्यात आली होती.

सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांचे निधन

  • सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग यांचे प्रदीर्घ आजारानंतर ४ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
  • सिंग यांची वयाच्या विसाव्या वर्षी आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. ते कर्नाटक केडरचे अधिकारी होते.
  • त्यांनी देवेगौडा पंतप्रधान असताना केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयची सूत्रे १९९६मध्ये हाती घेतली.
  • त्यांच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी बोफोर्स प्रकरण, बिहारमधील चारा घोटाळा प्रकरण यांसारखी अतिशय महत्त्वाची प्रकरणे हाताळली होती.
  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी व फ्रान्स या देशांत गेलेल्या सरकारी शिष्टमंडळांचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
  • अगदी कमी काळात झारखंड मुक्ती मोर्चा खासदारांचे लाच प्रकरण, १३३ कोटींचा युरिया घोटाळा व तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम यांचा दूरसंचार घोटाळा ही प्रकरणेही त्यांनी हाताळली.
  • आयटीबीपीचे महासंचालक, अमलीपदार्थ विरोधी पथकाचे महासंचालक, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक ही पदेही त्यांनी भूषवली.
  • त्यांनी इनसाईड सीबीआय, फिफ्टी डेझ टू टॉप, पुलिस कि कहानी मेरी जुबानी अशी एकूण ३० पुस्तके लिहिली. अनेक नियतकालिकांतही त्यांनी लेखन केले.
  • त्यांना पंथरत्न, दिल्लीरत्न, पंजाबची शान असे पुरस्कार मिळाले आहेत. प्रामाणिक व निर्भीड अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. प्रसारमाध्यमे त्यांना टायगर संबोधत असत.

गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड

  • २०१७मध्ये सर्वात लोकप्रिय आणि जास्त किंमत असलेला जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ब्रॅंड म्हणून गुगल पुढे आला आहे.
  • ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अॅपलला मागे टाकून गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड बनला आहे.
  • गेल्या काही वर्षांमध्ये गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. २०११पासून अॅपल प्रथम स्थानावर होता. आता हे स्थान गुगलने मिळवले आहे.
  • गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू मागील वर्षी ८८.२ अब्ज डॉलर (५८०८ अब्ज कोटी रुपये)  होती, यावर्षी ती १०९.४ अब्ज डॉलर (७,१९४ अब्ज कोटी रुपये) आहे. 
  • तर मागील वर्षी अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
  • मागील वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लाँच करुन देखील अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली आहे. 
  • या सर्वेक्षणानुसार, तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉन, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.

जगातील पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका सेवामुक्त

  • अमेरिकेने जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका यूएसएस इंटरप्राइजला सेवामुक्त केले आहे.
  • या युद्धनौकेने क्युबा मिसाइल संकट, व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • भारत आणि पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धातही अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात ही युद्धनौका पाठवली होती.
  • यूएसएस इंटरप्राइज १९६१मध्ये अमेरिकेच्या ताफ्यात दाखल झाली. ही जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका असून, तिला अमेरिकेच्या १० राष्ट्रपतींचे नेतृत्व लाभले आहे.
  • या युद्धनौकेला निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती सुमारे ४ वर्ष चालणार आहे.

1 टिप्पणी: