चालू घडामोडी : १८ मार्च

उत्तराखंच्या मुख्यमंत्रीपदी त्रिवेंद्रसिंह रावत

  • उत्तराखंडमध्ये भाजपच्या विजयानंतर त्रिवेंद्रसिंह रावत यांना राज्यपाल के के पॉल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री आहेत.
  • त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासह ७ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर २  आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • रावत हे आरएसएस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. २०१३मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड करण्यात आली होती.
  • झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने त्यांना राज्याचे प्रभारी म्हणून पाठवले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमतही मिळवले.
  • रावत यांनी डोईवाला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हिरासिंह यांचा २४ हजारांवर मताधिक्याने पराभव केला. २००२नंतर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
  • रावत हे भाजपकडून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे पाचवे नेते आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या त्रिवेंद्रसिंह यांनी पत्रकारितेची पदविका देखील मिळवलेली आहे.
  • उत्तर प्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक झाली. या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला ४०पेक्षा अधिक जागा मिळाल्या नव्हत्या.
  • ७० सदस्यीय उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर कॉंग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या आहेत.
  • २०००मध्ये उत्तर प्रदेशापासून वेगळे होऊन स्वतंत्र उत्तराखंड राज्य झाले त्यावेळी भाजपचे नित्यानंद स्वामी हे पहिले मुख्यमंत्री झाले.

बुलढाण्यात पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन

  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यानुसार पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी २६ मार्च रोजी पार पडणार आहे.
  • यासाठी करवंड परिसराला ‘राजमाता जिजाऊ साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड असणार आहेत. 
  • संमेलनाचे उद्घाटन २६ मार्च रोजी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल. तर कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे प्रमुख अतिथी असतील.
  • या संमेलनात नवोदितांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन समीक्षक डॉ. एस एम कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद देशमुख व रवींद्र इंगळे करतील.

इंद्राणी दासला ज्युनियर नोबेल पुरस्कार

  • भारतीय वंशाच्या इंद्राणी दास हिने विज्ञानातील ज्युनियर नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार मिळविला आहे.
  • अमेरिकेत रेजेनेरॉन सायन्स टॅलेंट सर्च ही गणित व विज्ञानावर आधारित स्पर्धा १९४२पासून भरवली जाते. या स्पर्धेचा पुरस्कार यंदा तीन जणांना मिळाला असून त्यात पहिला पुरस्कार इंद्राणीला मिळाला.
  • विज्ञानातील ज्युनियर नोबेल असे या पुरस्काराचे वर्णन केले जाते. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळालेल्यांपैकी १२ जणांना पुढे खरे नोबेल मिळाले आहे.
  • इंद्राणी ही न्यूजर्सी येथील बर्जन अ‍ॅकॅडमीजची विद्यार्थिनी आहे. मेंदूतील क्रियांच्या संशोधनासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
  • मेंदूला मार लागल्यानंतर न्यूरॉनचा ऱ्हास होऊन ते मरतात. न्यूरॉन्स वाचण्याची शक्यता कशी वाढवता येईल यावर तिचे संशोधन आहे.

अमरावतीमध्ये पाचवे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन

  • देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज आहेत.
  • संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
  • १९ आणि २० मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या २५ व्यक्ती तसेच १६ संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.
  • संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

कार रेसर अश्विन सुंदरचा कार अपघातात मृत्यू

  • प्रसिद्ध कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा १८ मार्च रोजी झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
  • चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिल्यानंतर पेट घेतला.
  • अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा