चालू घडामोडी : १० जुलै

भारत, अमेरिका आणि जपानचा मलबार युद्धाभ्यास

  • भारत, अमेरिका आणि जपान नौदलाच्या ‘मलबार २०१७’ या युद्धाभ्यासाला बंगालच्या उपसागरात १० जुलैपासून सुरुवात झाली आहे.
  • मलबार युद्धाभ्यासात १६ युद्धनौका, ९५ लढाऊ विमानांसह २ पाणबुड्यांचा सहभाग आहे. हा युद्धाभ्यास १७ जुलैपर्यंत चालणार आहे.
  • १९९२पासून  भारत आणि अमेरिका बंगालच्या उपसागरात दरवर्षी मलबार नाविक सरावाचे आयोजन करत आहे.
  • या सरावाचे हे २१ वे पर्व असून, तिन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात येते.
  • या सरावात जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सने सलग चौथ्या वर्षी सहभाग घेतला आहे.
  • एकमेकांच्या सहकार्याने टेहेळणी, बचाव आणि हल्ला यांचा सराव या वेळी केला जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय मदत, शस्त्रसाठा पुरविणे, हेलिकॉप्टर कारवाई यांचा सरावही केला जाणार आहे.
  • या युद्धसरावात भारतीय नौदलात २०१३मध्ये समावेश करण्यात आलेल्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवरील प्रात्यक्षिकाचे विशेष आकर्षण असणार आहे.
  • तसेच अमेरिकेकडून १ लाख टन वजनी एअरक्राफ्टची वाहतूक करु शकणारी युएसएस निमित्ज ही महत्त्वाची युद्धनौका युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे.
  • आण्विक ऊर्जेवर चालणारी ही युद्धनौका एफए-१८ या फायटर जेट्स विमानांनी सज्ज आहे.
  • तर जपानकडून २७ हजार टन वजनी हेलिकॉप्टर कॅरिअर इझुमो या सरावात सहभागी असेल. याशिवाय जेएस साजानामी या जहाजाचाही सहभाग असेल.
  • गेल्या तीन आठवड्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सिक्किम सीमेजवळील डोक्लाम भागात जोरदार खडाजंगी सुरु आहे.
  • भारत आणि चीनमधील या ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपानच्या या संयुक्त युद्धाभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
  • २००७मध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरने मलबार युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता. त्यावेळी चीनने याचा तीव्र विरोधदेखील दर्शवला होता.

अहमदाबाद भारतातील पहिले जागतिक वारसा शहर

  • युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.
  • युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज सिटी हा दर्जा मिळवणारे अहमदाबाद भारतातील पहिले शहर ठरले आहे.
  • पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या ४१व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा शहर निवड प्रक्रियेसाठी भारतातून दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद शहरांचा समावेश करण्यात आला होता.
  • अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह २० देशांनी पाठिंबा दिला.
  • बादशहा अहमद शहा याने सहाशे वर्षांपूर्वी अहमदाबाद शहराची बांधणी केली होती. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.
  • अहमदाबादचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात आला आहे. आता अहमदाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्किटेक्ट टेक्नोलॉजिकल मदत मिळणार आहे.
  • कांकरिया झील, हठीसिंह जैन मंदिर, जामा मशीद, राणी सिपरी मशीद, साबरमती आश्रम, केलीको संग्रहालय या सारख्या वास्तूंनी हे शहर पर्यटन समृद्ध आहे.
  • अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.
  • अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची २६ सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत.
  • राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.
  • युनेस्को: संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था
 जागतिक वारसा शहर 
  • ज्या शहराला सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे अशा शहराला युनेस्को ‘जागतिक वारसा शहर’ असा दर्जा देते.
  • एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

स्वयंप्रभा डिजिटल योजनेचा शुभारंभ

  • इयत्ता नववी ते पीएचडीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण देशातील कोणालाही घरबसल्या उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्वयंप्रभा डिजिटल योजनेची’ अनोखी व क्रातिकारी भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुपौर्णिमेनिमित्त देशाला दिली.
  • देशभरातील विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये असलेले सुमारे ७२ लाख ग्रंथांचे ज्ञानभांडार जनतेसाठी खुल्या करणाऱ्या या योजनेचे लोकार्पण ९ जुलै रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले.
  • राष्ट्रपतिपदावरून पायउतार होण्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी प्रणव मुखर्जींचा शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा अखेरचा कार्यक्रम होता.
  • ‘डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन’ या राष्ट्रीय योजनेत स्वयं, स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म, नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.
 स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म 
  • ही योजना टेलिव्हिजन संचावर, ३२ वाहिन्यांद्वारे आठवड्याचे सातही दिवस २४ तास चालणारी डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे.
  • स्वयं (मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स उर्फ ‘मूक’) द्वारे या वाहिन्यांवरून सर्व इयत्ता व अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांच्या व्हिडीओंचे हिंदी व इंग्रजी भाषेत प्रक्षेपण केले जाईल.
  • इयत्ता नववी ते पीएचडीपर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी यामुळे साऱ्या देशाला उपलब्ध होणार आहे. हे व्हिडीओ प्रादेशिक भाषांतही उपलब्ध करून देण्यात येतील.
 नॅशनल डिजिटल लायब्ररी 
  • या योजनेद्वारे ७२ लाख पुस्तकांचे ज्ञानभांडार उपलब्ध होईल. याखेरीज देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, एनआयटीचे शोध निबंध व पुस्तके या योजनेद्वारे उपलब्ध करून दिली जातील.
  • स्पर्धा परीक्षा, तसेच विविध अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे महागडी पुस्तके खरेदी करावी लागणार नाहीत.
 नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी 
  • या योजनेमुळे आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका इत्यादींचे एकदा सत्यापन केल्यानंतर, विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश, नोकरी इत्यादीसाठी हे दस्तऐवज वारंवार घेउन हिंडण्याची गरज पडणार नाही.
  • साऱ्या गोष्टी या योजनेद्वारे या ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांच्या वैधता तपासता येईल.
  • बनावट पदव्या व मार्कशीटसचा धोका त्यामुळे आपोआप संपुष्टात येणार आहे.

एसबीआयकडून नेपाळमध्ये ‘डिजिटल व्हिलेज’

  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ‘डिजिटल व्हिलेज’ उपक्रमांतर्गत नेपाळमधील काठमांडूपासून पूर्वेला २५ किमी अंतरावर असलेल्या जारीसिंगपौवा या गावाचा कायापालट केला आहे.
  • एसबीआयच्या नेपाळमधील सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या गावात डिजिटल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
  • या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना ४३० डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
  • हे गाव डोंगराळ भागात असल्याने काठमांडूपासून नजीक असूनही त्याचा फारसा अन्य भागाशी संपर्क नाही.
  • त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

अमरनाथ यात्रेला निघालेल्या बसवर दहशतवादी हल्ला

  • दहशतवाद्यांनी १० जुलैच्या रात्री रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केला.
  • या हल्ल्यात ७ भाविक मरण पावले असून, ३ पोलिसांसह ३२ जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ५ महिला यात्रेकरूंचा समावेश आहेत.
  • ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती.
  • ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते.
  • पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी ७ नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने या नियमाचे उल्लंघन केले.
  • अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता. त्यानुसार सुरक्षाही वाढविण्यात आली होती.
  • टेहळणीसाठी ड्रोनचही वापर यावेळी करण्यात येत होता. मात्र त्यानंतरही हल्ला झाल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी पुढे आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा