चालू घडामोडी : २ ऑगस्ट

आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर

  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने द्विमासिक पतधोरण जाहीर केले.
  • त्यानुसार रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे, रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आला आहे.
  • निर्धारित लक्ष्यापेक्षा चलनवाढ नियंत्रणात असल्याने रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली आहे.
  • चलनवाढ नियंत्रणाला प्राधान्य देणाऱ्या आरबीआयने यापूर्वी सलग चार पतधोरणांमध्ये व्याजदर स्थिर ठेवले होते.
  • यासोबत रिव्हर्स रेपो रेटमध्येदेखील सव्वा टक्क्याने कपात करून तो ५.७५ टक्के करण्यात आला आहे. हा गेल्या सहा वर्षांमधील निच्चांक आहे.
  • यामुळे कर्जदारांचा ईएमआय कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय बँकांवर अवलंबून आहे.
  • कारण रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांकडूनही व्याज दरात कपात केली जाऊ शकते. ज्याचा लाभ ग्राहकांना आणि कर्जदारांना होईल.
 रेपो रेट 
  • बँकांनी दररोजच्या कामकाजांसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. या पैशांच्या उभारणीसाठी बँका आरबीआयची मदत घेतात.
  • आरबीआयकडून देशभरातील बँकांना कर्ज पुरवठा केला जातो. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या प्रमाणाला रेपो रेट म्हणतात. 
  • रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे बँकांना आरबीआयला कमी प्रमाणात व्याज द्यावे लागेल. त्यामुळे बँकांकडे काही प्रमाणात अतिरिक्त रक्कम शिल्लक राहिल.
  • हा पैसा बाजारात आणून त्या माध्यमातून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न बँकांकडून केला जाईल.
  • यासाठी व्याज दरांमधून कपात करुन अधिकाधिक लोकांनी कर्ज घ्यावे, यासाठी बँकांचा प्रयत्न असेल.
 रिव्हर्स रेपो रेट 
  • रिझर्व्ह बँक ज्या दराने अन्य बँकांकडून पैसे घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बँकांना फायदा होतो. पण बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो.

जम्मू-काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पांना परवानगी

  • भारतास ‘काही बंधने’ पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी जागतिक बॅंकेने दिली आहे.
  • जम्मू-काश्मीरमधील भारताच्या दोन जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानने प्रश्न उपस्थित करत गेल्या वर्षी जागतिक बँकेकडे दाद मागितली होती.
  • यापैकी किशनगंगा (३३० मेगावॉट) प्रोजेक्ट हा झेलम नदीवर आणि रातले (८५० मेगावॉट) प्रोजेक्ट चिनाब नदीवर बनवला जातोय.
  • सिंधु पाणीवाटप करारात या दोन्ही नद्या सिंधू नदीच्या पश्चिमेकडील उपशाखा असल्याचे म्हटले आहे.
  • या नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत भारतावर कोणतेही निर्बंध लादता येणार नाहीत. तसेच पाकिस्तानही यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असेही जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे.
  • भारत ज्या स्वरूपात या नद्यांच्या पाण्याचा वापर करू शकतो, त्यात जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठीही परवानगी आहे. मात्र जागतिक बँकेने काही मर्यादाही अधोरेखित केल्या आहेत.
  • या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवण्यास दोन्ही पक्ष सहमत असून, पुढची बैठक सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टनमध्ये होणार आहे. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे.

ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस स्थापन

  • उच्चशिक्षितांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ची स्थापना केली आहे.
  • देशातील राजकारणात आणि धोरण आखताना प्रोफेशनल तरुणांचाही विचार होणे गरजेचे असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सामील व्हावे, असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
  • उच्चशिक्षित तरुणांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने शशी थरुर आणि अन्य नेत्यांच्या पुढाकाराने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना केली आहे.
  • प्रोफेशनल काँग्रेसमध्ये तुम्ही केलेले काम थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले जाईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
  • यामध्ये समान विचारधारा असलेल्या मंडळींना एकत्र आणून त्यांना वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची संधी दिली जाणार आहे.
  • काँग्रेससाठी प्रचार मोहीमेची आखणी, धोरण तयार करणे तसेच जाहिरनामा तयार करण्याचे काम ‘प्रोफेशनल काँग्रेस’ करणार आहे. शशी थरुर प्रोफेशनल काँग्रेसचे प्रमुख असतील.

खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी ३ कोटींचा निधी

  • ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे मूळ गाव असलेल्या गोळेश्वर (ता. कराड) येथे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या नियोजित खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी राज्य शासनाने ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
  • राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी या कुस्ती संकुलाची घोषणा केली होती; परंतु अपुऱ्या निधीमुळे हे क्रीडा केंद्र उभारण्याची सुरुवातच झाली नव्हती.
  • निधी वाढवून देण्याबाबत शासन उदासीन राहिल्याने खाशाबा यांचे पुत्र रणजित यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
  • रणजित यांनी खाशाबा यांना ऑलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक लिलावात काढण्याचा इशारा देऊन शासनाला धक्का दिला होता.
  • खाशाबा यांच्या गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती संकुल व्हावे, यासाठी शासन आदेश ८ वर्षांपूर्वी जारी करण्यात आला होता.
  • यापूर्वीच्या शासन आदेशातील १.५८ कोटींची तरतूद अपुरी असल्याचे मान्य करून सदर नियोजित संकुलासाठी ३ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
  • सोबतच खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार आहे.

गरीब मुलींच्या लग्नासाठी युपी सरकारची योजना

  • उत्तरप्रदेशातील गरीब मुलींच्या लग्नासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला आहे.
  • या सोहळ्यासाठी खासदार, आमदार आणि समाजातील प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. 
  • योगी आदित्यनाथ सरकारकडून सामुदायिक विवाह सोहळ्याअंतर्गत एका मुलीसाठी ३५ हजार रुपये खर्च करणार आहे.
  • याआधी राज्य सरकारकडून २० हजार रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, आता ३५ हजार रुपयांसोबत एक स्मार्टफोन देण्यात येणार आहे.
  • यापैकी २० हजार रुपये थेट मुलीच्या खात्यात जमा होतील. उर्वरित १० हजार रुपये कपडे, भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जातील. तर ५ हजार रुपये लग्न मंडपासारख्या खर्चासाठी देण्यात येणार आहे.
  • यासंदर्भातील प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, लवकरच तो मजूर होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा