चालू घडामोडी : ३१ डिसेंबर

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र

  • उत्तर प्रदेशातील (वाराणसी) चांदपुर येथील सहाव्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्राचे (IRRI SARC) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • दक्षिण आशिया आणि सार्क क्षेत्रात तांदूळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणून हे काम करेल.
  • या केंद्रामध्ये तांदळाचे उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यासाठी संशोधनावर भर दिला जाणार आहे.
  • या संस्थेमध्ये तांदळाचे मूल्यवर्धन करण्यासाठी उत्कृष्टता केंद्राची सुविधा आहे. त्यामध्ये आधुनिक प्रयोगशाळेची व्यवस्था असेल, जेथे तांदळाची गुणवत्ता आणि पोषक तत्त्वांचा अभ्यास केला जाऊ शकेल.
  • पूर्व भारतातले हे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र असून या क्षेत्रातील तांदूळ उत्पादनात ते महत्वाची भूमिका बजावेल.
  • या केंद्राचा उपयोग पूर्वांचललाच नाही तर पूर्वोत्तरकडील सर्व राज्यांना फायदा होणार आहे.
  • बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या केंद्रामध्ये काला नमक, राजरानी, बादशाह पसंद आणि काळ्या तांदूळ यांसारख्या प्रजातींवरही संशोधन केले जाणार आहे.
  • पूर्वोत्तरकडील राज्यांमधील हवामान आणि मातीत उत्पादित होणाऱ्या सुगंधा, बासमती आणि मंसूरी या हायब्रीड प्रजातींच्या उत्पादकता, गुणवत्ता, चव, पौष्टिकता आदी बाबींवरही या केंद्रात संशोधन केले जाणार आहे.
  • याशिवाय या केंद्रामध्ये विविध प्रजातींचे चांगले जीन घेऊन नवीन प्रजातींच्या निर्मिती वरही भर दिला जाणार आहे.
  • जवळपास ९३ कोटी रुपये खर्चून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेशी भारत १९६०पासून जोडला गेला असून संस्थेच्या मनिला येथील मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
  • फिलिपाइन्समधल्या मनिला इथल्या मुख्यालयाला नोव्हेंबर २०१७मध्ये मोदींनी भेट देऊन तांदळासाठी कृषी क्षेत्रातील नवीनतम शोध आणि संशोधन यावर चर्चा केली होती.
या केंद्राचे फायदे
  • दक्षिण आशिया आणि सार्क क्षेत्रातील तांदूळ संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून हा संस्था म्हणून काम करेल.
  • ही संस्था उत्पादन पीक उत्पादन, बियाणांची गुणवत्ता आणि पौष्टिकत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • ही संस्था शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर टाकेल तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास्तही आपले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवेल.
  • हे केंद्र तांदूळ उत्पादकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि कुपोषणासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

महिला पोलिस स्वयंसेवक योजना

  • केंद्र सरकारने महिला पोलिस स्वयंसेवक योजना राबविण्यासाठीच्या आंध्र प्रदेश, गुजरात, मिझोराम, छत्तीसगढ, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • महिला पोलिस स्वयंसेवक योजना सुरु करणारे हरियाणा हे देशातील पहिले राज्य आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये निर्भया निधीअंतर्गत या योजनेची सुरुवात हरियाणातील कर्नाल येथे करण्यात आली होती.
  • महिला पोलिस स्वयंसेवक योजना
  • या योजनेची सुरुवात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहाय्याने केली होती.
या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
  • स्वेच्छेने मुली व महिलांच्या सबलीकरणासाठी प्रतिबद्ध असलेली आणि पोलिसांना हिंसा व लिंग भेदभाव मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी मदत करू शकेल अशी कोणतीही स्त्री महिला पोलिस स्वयंसेवक असू शकते.
  • महिला पोलिस स्वयंसेवकांचे किमान वय २१ वर्षे आहे व किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास आहे.
  • महिला पोलिस स्वयंसेवक संबंधित प्रदेशातील असावी आणि तिला स्थानिक बोलीभाषा परिचित असावी.
  • तिचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा व ती कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसावी.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिला पोलीस स्वयंसेवक पोलिस आणि महिला यांच्यात दुवा म्हणून काम करेल.
  • प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक महिला पोलीस स्वयंसेवक असेल.
  • महिला पोलिस स्वयंसेवक पोलीस ठाण्यात सर्कल इंस्पेक्टरला जबाबदार असेल.
  • महिला पोलिस स्वयंसेवकांना ‘महिला व शिशु रक्षक दल’ (MASRD) तयार करावे लागेल.
  • महिलांविरुद्ध होणारी घरगुती हिंसा, बालविवाह, हुंडा प्रथा, सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना रिपोर्ट करणे, हे त्यांचे मुख्य कार्य असेल.
  • महिला पोलिस स्वयंसेवक हे एक मानद पद आहे. त्यांना प्रति महिना १००० रुपये मानधन देण्यात येते.
  • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना ही योजना सुरु करण्यास सांगितले आहे.

सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्‍तपदी नियुक्ती

  • राजस्थान केडरचे १९७९च्या बॅचचे आयएएस अधिकारी सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्‍तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याशिवाय केंद्रीय माहिती आयोगात ४ माहिती आयुक्‍तांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
  • भार्गव हे माहिती विभागात सूचना आयुक्‍त आहेत त्‍यांना आता बढती देत मुख्य आयुक्‍तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
  • माजी आयएफएस अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा, माजी आयआरएस अधिकारी वनजा एन सरना, माजी आयएएस नीरज कुमार गुप्ता आणि माजी विधी सचिव सुरेश चंद्र यांची केंद्रीय माहिती अयोगात माहिती आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.
  • सिन्हा १९८१च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी होते. त्‍यांनी ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्‍त म्‍हणूनही काम पहिले आहे.
  • माहिती विभागात वनजा एन सरना या एकमेव महिला माहिती आयुक्‍त आहेत. त्‍या १९८०च्या बॅचमधील भारतीय राजस्‍व अधिकारी होत्‍या. तसेच त्‍या केंद्रीय उत्‍पादन आणि सेवा कर बोर्डाच्या प्रमुख होत्‍या.
  • नीरज कुमार गुप्ता हे १९८४च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सार्वजनिक संपत्‍ती प्रबंधनमध्ये सचिवपदी ते कार्यरत होते.
  • सुरेश चंद्र हे यावर्षी केंद्रीय विधी विभागाच्या सचिव पदावरुन निवृत्‍त झाले आहेत. ते २००२ ते २००४ या काळात तत्‍कालीन कायदामंत्री अरुण जेटली यांचे खासगी सचिव होते.
केंद्रीय माहिती आयोग
  • केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केंद्र सरकारद्वारे १२ ऑक्टोबर २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा (आरटीआय) २००५अंतर्गत करण्यात आली होती.
  • निरोगी लोकशाहीच्या कामकाजात पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी या आयोगाची भूमिका फार महत्वाची आहे.
  • या पारदर्शकतेमुळे भ्रष्टाचार, शोषण, दडपशाही आणि शक्तीचा गैरवापर हे रोखता येते.
  • या आयोगाचे व्यवस्थापन व निर्देशन मुख्य माहिती आयुक्तांद्वारे केले जाते. मुख्य माहिती आयुक्तांच्या मदतीसाठी माहिती आयुक्त नियुक्त केले जातात.
  • केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त आणि १० माहिती आयुक्त असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनंतर करतात.
  • केंद्रीय माहिती आयोग आरटीआयच्या अंमलबजावणी संदर्भातील वार्षिक अहवाल केंद्र सरकारला देतो. हा आयोग आपला अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करतो.
केंद्रीय माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये
  • कोणत्याही आधार असलेल्या प्रकरणाची तपासणी करण्याचा आदेश देऊ शकतो.
  • जर सार्वजनिक प्राधिकरण आरटीआय कायद्यानुसार काम करत नसेल हा आयोग समन्वय वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची शिफारस करू शकतो.
  • हा आयोग कोणत्याही व्यक्तीकडून तक्रार स्वीकारू शकतो आणि त्या तक्रारीची चौकशीही करू शकतो.
  • हा आपल्या आपल्या अंतर्गत असलेल्या सरकारी कार्यालयाच्या नोंदी तपासू शकतो. तपासणी दरम्यान या आयोगाकडे दिवाणी न्यायालयाची शक्ती असते.

स्मृती मानधना: वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

  • भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.
  • वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार तिला जाहीर करण्यात आला.
  • यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तसेच तिला २०१८च्या आयसीसीच्या यंदाच्या टी-२० आणि एकदिवसीय संघातही स्थान देण्यात आले आहे.
  • स्मृतीने वर्षभरात १२ एकदिवसीय सामन्यात ६७च्या सरासरीने ६६९ धावा केल्या. तर २५ टी-२० सामन्यांत सुमारे १३०च्या स्ट्राईक रेटने ६२२ धावा केल्या.
  • स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने या स्पर्धेत ५ सामन्यांत १२५.३५च्या स्ट्राईक रेटने १७८ धावा केल्या होत्या.
  • आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीतही ती अनुक्रमे ४थ्या व १०व्या स्थानी आहे.
  • याशिवाय, आयसीसीने महिला क्रिकेटमधील आयसीसी एकदिवसीय संघ आणि आयसीसी टी-२० संघाची घोषणा केली. महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड या संघामध्ये केली जाते.
  • यामधील आयसीसी महिला टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा मान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देण्यात आला आहे. या संघात स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचाही समावेश आहे.
  • तर आयसीसी महिला एकदिवसीय संघाच्या नेतृत्व सुझी बेट्स हिच्याकडे देण्यात आले आहे. या संघातही स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे.
  • २०१८च्या टी-२० विश्वचषकात स्मृती मानधना व पूनम यादव या दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती.
  • ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक-फलंदाज एलिसा हेलीला आयसीसी महिला टी-२० प्लेयर ऑफ द ईयर म्हणून निवडण्यात आले.
  • तर इंग्लंडची १९ वर्षीय स्पिनर सोफी एक्लेस्टोनला आयसीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर (उदयोन्मुख खेळाडू)म्हणून निवडण्यात आले.

तेल विपणन कंपन्यांचे उज्वला सॅनिटरी नेपकिन अभियान

  • तेल विपणन कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत ओडिशामध्ये उज्वला सॅनिटरी नेपकिन अभियान सुरू केले.
  • राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-४नुसार ओडिशामध्ये फक्त ३३.५ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.
  • ओडिशातील १५-२४ वयोगटातील फक्त ४२.८ राक्के महिला मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता पद्धतींचा वापर करतात.
  • ही समस्या लक्षात ठेवून, तेल विपणन कंपन्यांनी उज्वला सॅनिटरी नॅपकिन अभियान सुरू केले आहे.
या अभियानाची ठळक वैशिष्ट्ये
  • ओडिशातील ३० जिल्ह्यांतील ९३ ब्लॉक्समध्ये तेल विपणन कंपन्यांद्वारे १०० स्थानिक उत्पादन प्रकल्प स्थापन केले जातील.
  • यातील प्रत्येक प्रकल्पाची दररोज १२०० ते २००० सॅनिटरी पॅड तयार करण्याची क्षमता असेल.
  • प्रत्येक प्रकल्पामध्ये निर्जंतुकीकरण विभाग असेल, जो सर्व नॅपकिन्स निर्जंतुक झाल्याची खात्री करेल.
  • तेल विपणन कंपन्या एकदा यंत्रणा (मशिनरी) आणि कच्चा माल खरेदी करून देतील. त्यांनतर हे प्रकल्प महिलांद्वारे व्यवस्थापित केले जातील आणि महिला पॅड विकून पैसे कमावतील.
  • महिलांना पॅड तयार करण्याचे तसेच त्यांची विक्री व विपणन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • सध्या ही मोहीम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात या मोहिमेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समिती

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी केंद्र सरकार लवकरच एक समिती स्थापन करणार आहे.
  • देखरेख आणि पर्यवेक्षण याव्यतिरिक्त, ही समिती या शिफारशींच्या अंमलबजावणीशी संबंधित लोकांसह मिळून कार्य करेल.
  • ही समिती विविध शिफारशींच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करेल. ही समिती उत्पादन आणि कापणीनंतरच्या टप्प्यावर विशेष लक्ष देईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समिती
  • २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शिफारशी करण्यासाठी अशोक दलवाई यांच्या नेतृत्वाखाली २०१६मध्ये सरकारने एक समिती स्थापन केली होती.
  • या समितीने १२ खंडांचा पाला अहवाल सादर केला होता. या अहवालात कृषी साधणे, जोखीम व्यवस्थापन, कापणीनंतरची प्रक्रिया व कृषी उत्पादनांची वाहतूक इत्यादी विविध पैलू समाविष्ट करण्यात आले होते.

निधन: जेष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन

  • भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मृणाल सेन यांचे ३० डिसेंबर रोजी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
  • १४ मे १९२३ रोजी फरीदपूरमध्ये (आजच्या बांगलादेशमध्ये) सेन यांचा जन्म झाला. ‘रातभोर’ या १९५५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
  • १९६० मध्ये प्रदर्शित ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे मृणाल सेन यांची दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली. ‘बाइशे श्रावण’मुळे त्यांचे नाव जागतिक पातळीवर गाजले.
  • सेन यांचे सर्वाधिक चित्रपट बांगला भाषेत आहेत. मिथुन चक्रवर्तीच्या पहिल्या ‘मृगया’ चित्रपटाचे दिग्दर्शन सेन यांनी केले होते.
  • २००२मध्ये ८० व्या वर्षी सेन यांनी ‘आमार भुवन’ या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सेन यांची बंगाली आणि हिंदी भाषेतील विविध चित्रपटांमुळे देश-विदेशात मोठी ख्याती होती.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेन यांच्या सिनेमांची दखल घेण्यात आली होती. त्यांना २० राष्ट्रीय, १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
  • चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना १९८३ साली पद्मभूषण आणि २००५ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • याशिवाय त्यांना १९७९साली नेहरू-सोव्हिएत लँड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच १९८३ साली त्यांच्या ‘खारिज’ चित्रपटाला कान्स, व्हेनिस, बर्लिन, कार्लोवी चित्रपट महोत्सवात ज्यूरी पुरस्कार मिळाला होता.
  • सत्तर-ऐशींच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
  • १९९८ ते २००३ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. ‘इप्टा’ या सांस्कृतिक संघटनेत ते सक्रिय होते.
  • ते भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे (FTII) अध्यक्ष आणि राष्ट्रीय फिल्म विकास निगमचे सदस्य होते.
  • विद्यार्थीदशेत असताना ते डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेच्या सांस्कृतिक आघाडीवर सक्रिय होते. मात्र, त्यांनी कधीही डाव्या पक्षाचे सभासदत्व स्विकारले नाही.
  • त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट: नील आकाशेर निचे, पदातिक, इंटरव्ह्यू, कोलकाता इकेतोर, ओका उडी कथा, जेनेसिस, महापृथ्वी, खारिज, एक दिन प्रोतिदिन, भुवन शोम, अकालेर संधान, खंडहर, एक दिन अचानक, मृगया आणि अंतरिन.

उत्तर प्रदेशची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजना

  • उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शिल्प आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजना सुरू केली.
  • उत्तर प्रदेशचा समृद्ध वारसा आधुनिकीकरणाद्वारे पुनरुज्जीवित करून उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमधील उत्पादनांना उत्तेजन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • उत्तर प्रदेश हे एक विशाल राज्य असून, येथे भरपूर विविधता आहे. येथील उत्पादने आणि शिल्प यामधील विविधता चित्तथरारक आहे.
  • यामध्ये हस्तोद्योग, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी वस्तू, कपडे, चर्मोत्पादने आदी उत्पादनांचा, जी परकीय चलन मिळवून देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार पुरवतील, अशा उत्पादनांचा समावेश आहे.
  • परंतु यापैकी बरीच उत्पादने आणि परंपरा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजना म्हणजे हा वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा एक प्रयत्न आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून उत्तम यंत्रे, प्रशिक्षण आणि विपणन सहाय्याने या उत्पादनांचे व कलांचे फायदेशीर व्यापारात रुपांतर होईल.

राजस्थानमध्ये निवडणुकांसाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट समाप्त

  • राजस्थानमधील नवनिर्वाचित अशोक गेहलोत सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील किमान शैक्षणिक पात्रतेची अट समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळाने महापौर आणि पालिकेच्या अध्यक्षांची निवड प्रत्यक्ष पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सरकारने यासाठी अप्रत्यक्ष पद्धत वापरली होती.
  • राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया २०१५मध्ये केलेल्या राजस्थान पंचायती राज (दुरुस्ती) कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असणे आवश्यक होते:
  • नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान १०वी उत्तीर्ण.
  • ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक लढविण्यासाठी किमान ८वी उत्तीर्ण.
  • जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान ८वी उत्तीर्ण.
  • याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी उमेदवाराच्या घरात शौचालय असणे आवश्यक आहे.
  • वरीलपैकी किमान शैक्षणिक पात्रतेची अट समाप्त करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.
निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
  • यापूर्वी हरियाणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची आत घालणारा कायदा केला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
  • अशिक्षित लोकांना पंचायतराज निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी हरियाणा सरकारने केलेल्या या कायद्याची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या मते, शिक्षण ही अशी एकमेव गोष्ट आहे जी माणसाला चांगले-वाईट व चूक-बरोबर यातील फरक ओळखण्याची शक्ती देते.
  • सर्वोच्च न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केले की, घरात शौचालय नसलेल्या उमेदवारांना स्वच्छतेचे मूलभूत निकष पूर्ण न केल्याबद्दल निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणेही योग्य ठरेल.

बांगलादेशमध्ये अवामी लीगला सलग तिसऱ्यांदा बहुमत

  • बांगलादेशमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले.
  • पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग व त्यांच्या सहयोगी पक्षांनी ३०० पैकी २८८ (सुमारे ९६ टक्के) जागांवर विजय संपादन केला.
  • तर त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी गट बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीला फक्त ५ जागा मिळाल्या.
  • या विजयासह बांगलादेशच्या वर्तमान पंतप्रधान शेख हसीना यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
  • या निवडणुकांदरम्यान राजकीय हिंसेत देशभरात १७हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
शेख हसीना
  • शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी झाला. त्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान (२००८पासून) आहेत.
  • यापूर्वी २३ जून १९९६ ते १५ जुलै २००१ दरम्यान त्या पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर २००८ आणि २०१३मध्ये त्या पुन्हा पंतप्रधानपदावर निवडून आल्या.
  • शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान यांच्या कन्या असून त्या १९८१पासून अवामी लीग या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत.
जातियो शान्ग्सद
  • बांगलादेशमध्ये एकसदनी संसद आहे, जी बांगलामध्ये ‘जातियो शान्ग्सद’ आणि इंग्रजीमध्ये हाउस ऑफ नेशन म्हणून ओळखली जाते.
  • बांगलादेशच्या संसदेमध्ये एकूण ३५० जागा आहेत. त्यापैकी ३०० जागांवरील उमेदवार प्रत्यक्ष मदतानाद्वारे प्रादेशिक मतदार संघातून निवडले जातात.
  • उर्वरित ५० जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत, ज्यांची निवड एकल संक्रमणीय मतदानाद्वारे केली जाते.

चालू घडामोडी : ३० डिसेंबर

राष्ट्रीय आयोग विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

  • भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक २०१८च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • पारदर्शकतेसाठी सध्याची नियामक संस्था केंद्रीय भारतीय वैद्यकशास्त्र परिषदेऐवजी नवी संस्था स्थापन करण्यासाठी हे विधेयक आहे.
  • विधेयकामध्ये ४ स्वायत्त मंडळांसह राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे.
  • यानुसार आयुर्वेदाशी संबंधित संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आयुर्वेद मंडळावर असेल.
  • तसेच युनानी, सिद्ध व सोवारिग्पाशी संबंधित संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीयुनानी, सिद्ध व सोवारिग्पा मंडळावर असेल.
  • याखेरीज २ सामायिक मंडळे आहेत. भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीच्या शैक्षणिक संस्थांच्या मंजुरी आणि मूल्यांकनासाठी, मूल्यांकन आणि मानांकन मंडळ असेल.
  • तर भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीच्या व्यवसायींचे नैतिक व नोंदणी मंडळ, भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतींशी संबंधित मुद्यांसाठी नॅशनल रजिस्टरचे व्यवस्थापन करेल.
  • विधेयकातील तरतुदीनुसार सामायिक प्रवेश परीक्षा आणि दीक्षांत परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक ठरेल. परवाना मिळवण्यासाठी ते आवश्यक असेल.
  • याखेरीज नियुक्ती आणि बढतीसाठी शिक्षकांच्या मूल्यांकनाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा विधेयकात प्रस्तावित आहे.
  • भारतीय वैद्यकशास्त्र शिक्षणात सुधारणा करणे, हा प्रस्तावित विधेयकाचा उद्देश आहे.
  • प्रस्तावित नियामक व्यवस्थेमुळे पारदर्शकतेबरोबर सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणाची जबाबदारी निश्चित होईल.
  • भारतीय वैद्यकशास्त्र पद्धती, राष्ट्रीय आयोगामुळे देशाच्या सर्व भागात परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास चालना मिळेल.

राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग (NCH) विधेयक २०१८च्या मसुद्याला मंजुरी दिली.
  • हे विधेयक सध्याच्या केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या ऐवजी पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एका नव्या संस्थेची स्थापना करेल.
  • विधेयकाच्या मसुद्यात राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा उल्लेख आहे. या आयोगांतर्गत ३ स्वायत्त परिषदा असतील.
  • होमिओपॅथी शिक्षण परिषदेद्वारे देण्यात येणाऱ्या होमिओपॅथी शिक्षणाच्या संचलनाची जबाबदारी स्वायत्त परिषदांवर असेल.
  • मूल्यांकन आणि योग्यता निर्धारण परिषद, होमिओपॅथीच्या शैक्षणिक संस्थाचे मूल्यांकन करेल आणि त्यांना मंजूरी प्रदान करेल.
  • नीति आणि नोंदणी परिषद होमिओपॅथीच्या डॉक्टरांची नोंदणी करेल आणि एक राष्ट्रीय रजिस्टर तयार करेल.
  • मसुद्यामध्ये एक प्रवेश परीक्षा आणि एक्जिट परीक्षेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी सर्व पदवीधरांना या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतील.
  • याशिवाय शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा प्रस्तावित्त आहे, याद्वारे शिक्षकांची नियुक्ति आणि पदोन्नति पूर्वी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन केले जाईल.
  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ॲलोपॅथी वैद्यकीय प्रणाली स्थापनेचा प्रस्ताव दिला असून त्याच धर्तीवर होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणात सुधारणा करणे हा या मसुद्याचा उद्देश आहे.

देशातील पहिला व्हर्टिकल-लिफ्ट ब्रिज

  • रामेश्वरमला देशाच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वे देशातील पहिला व्हर्टिकल-लिफ्ट ब्रिज (पूल) बनवित आहे.
  • या नवीन पुलाच्या बांधकामानंतर जहाजे आणि स्टीमर येथून सहज जाऊ शकतील.
  • हा नवीन पुल १०४ वर्ष जुन्या पांबन पूलाची जागा घेईल. येत्या ४ वर्षांत हा नवीन पूल तयार होणार आहे.
  • हा नवीन पूल ६३ मीटर लांब असेल. यात लिफ्ट-अप प्रणालीचा वापर करण्यात येईल, ज्यामुळे सागरी जहाजांना मार्ग दिला जाऊ शकेल. लिफ्टिंगसाठी दोन्ही बाजूंना सेन्सर वापरले जातील.
  • नवीन पुलामध्ये इलेक्ट्रो-मॅकेनिकल कंट्रोल सिस्टमचा वापर केला जाईल, जे ट्रेन नियंत्रण प्रणालीसह जोडले जाईल.
पांबन पूल
  • हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे.
  • मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी या हिंदी महासागराच्या उपसमुद्रांवर बांधला गेलेला ६,७७६ फूट (२,०६५ मी) लांबीचा हा पूल पांबन बेटावर स्थित रामेश्वरम नगरला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो.
  • १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रामेश्वरम गावामध्ये फक्त या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे.
  • २४ फेब्रुवारी १९१४मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतातील सर्वात पहिला सागरी पूल आहे.
  • मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग २०१०मध्ये बांधून पूर्ण होण्याआधी हा देशातील सर्वात लांब सागरी पूल होता.
  • या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला, जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो. या दोन्ही पुअलांना एकत्रितपणे पांबन पूल संबोधले जाते.

हरितगृह वायू उत्सर्जनावर भारताचा द्वितीय द्वैवार्षिक अहवाल

  • संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत भारताच्या द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल सादरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवालात ५ प्रमुख घटक आहेत: राष्ट्रीय परिस्थिती, राष्ट्रीय हरितगृह वायू, शामक कृती; वित्त, तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी गरजा व प्राप्त साहाय्य आणि देशांतर्गत देखरेख; पडताळणी व्यवस्था.
  • राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अभ्यासानंतर द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल तयार करण्यात आला आहे.
  • राष्ट्रीय हरितगृह वायू आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
भारताचे २०१४मध्ये हरितगृह वायू उत्सर्जन
  • भारतात २०१४मध्ये २६,०७,४८८ गीगाग्रॅम (सुमारे २.६०७ अब्ज टन कार्बन डायऑक्साईडच्या समकक्ष) हरितगृह वायूंचे उत्सर्जन केले गेले.
  • भारताचे नेट राष्ट्रीय हरितगृह वायूंचे उत्सर्जन २०१४मध्ये २३,०६,२९५ गीगाग्रॅम (सुमारे २.३०६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईडच्या समकक्ष) होते.
  • एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात ऊर्जा क्षेत्राचा वाटा ७३ टक्के, औद्योगिक प्रक्रिया आणि उत्पादनाचा वाटा ८ टक्के, कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्के आणि कचरा क्षेत्राचा वाटा ३ टक्के होता.
पॅरिस हवामान करारांतर्गत भारताची प्रतिबद्धता
  • २०३०पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन २००५च्या पातळीच्या ३३-३५ टक्के खाली आणणे.
  • भारतातील ४० टक्के ऊर्जा क्षमता अजीवाश्म इंधन स्त्रोतांपासून निर्माण केली जाईल.
  • अतिरिक्त वन क्षेत्राद्वारे २०३०पर्यंत २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डायऑक्साइडचे ‘कार्बन सिंक’ तयार करणे.

रशियाची हायपरसॉनिक अण्वस्त्र प्रणाली ‘अवनगार्ड’

  • रशियाने अलीकडेच हायपरसॉनिक अण्वस्त्र वितरण प्रणाली ‘अवनगार्ड’ची दक्षिण युराल पर्वतातील दोम्बारोव्सकी मिसाइल बेसमध्ये यशस्वी चाचणी केली.
  • या चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्राने ६००० किमी अंतरावरील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
  • अवनगार्ड हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगाच्या २७ पट वेगाने आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करते.
  • याची निर्मिती नवीन कम्पोझिट पदार्थापासून करण्यात आली आहे, त्यामुळे ते २००० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करण्यास सक्षम आहे.
  • अवनगार्ड जमिनीपासून कितीतरी किलोमीटरवर उंचीवर वातावरणात जाऊ शकते, ज्यामुळे ते क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेला चुकवू शकते.
  • अवनगार्डची लांबी सुमारे ५.४ मीटर आहे, तसेच हे क्षेपणास्त्र १ मेगाटनपर्यंत अण्वस्त्रे व पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

पॅलेस्टाईन युएनच्या पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज करणार

  • पॅलेस्टाईन जानेवारी २०१९मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज करणार असल्याची घोषणा पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद-अल-मालिकी यांनी केली आहे.
  • पूर्ण सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ पैकी किमान ९ सदस्यांच्या सहमतीची आवश्यकता आहे.
  • पॅलेस्टाईन पश्चिम आशियामध्ये स्थित देश आहे. त्याचे क्षेत्रफळ ६,०२० चौकिमी आहे.
  • पॅलेस्टाईनची घोषित राजधानी जेरुसलेम आहे, परंतु सध्या त्यांची प्रशासकीय राजधानी रामल्लाह येथे स्थित आहे.
  • पॅलेस्टाईनने १५ नोव्हेंबर १९८८ रोजी स्वातंत्र्य घोषित केले होते. सीमेवरून या देशाचा इस्राईलसह दीर्घकाळापासून वाद आहे.
  • पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या १३६ सदस्यांनी मान्यता दिली आहे. तसेच हा देश अरब लीग, इस्लामिक सहयोग संघटना, जी-७७ इत्यादी संघटनांचा सदस्य आहे.
  • पॅलेस्टाईन २०१२पासून संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यवेक्षक सदस्य आहे.

एन. बिरेन सिंग यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार

  • मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्काराने सन्मानित केले.
  • मणिपूरमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • त्याशिवाय केंद्रीय अन्न मंत्रालयाचे मंत्री साध्वी निरंजन ज्योती, आदिवासी व्यवहार मंत्री सुदर्शन आणि खासदार निशिकांत दुबे यांनाही सन्मानित करण्यात आले.
  • हा पुरस्कार ११५ आकांक्षित जिल्ह्यांमधील प्रगतीसाठी स्थापन करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील विकास कार्यांच्या प्रगतीचे अवलोकन नीती आयोगाद्वारे केले जात आहे.

लुका मोड्रिचला बाल्कन अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार

  • क्रोएशियाच्या लुका मोड्रिचने टेनिसपटू नोव्हाक जोकाविचला मागे टाकत ‘बाल्कन अॅथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला.
  • हा पुरस्कार जिंकणारा तो दुसराच फुटबॉलपटू ठरला. यापूर्वी १९९४मध्ये बल्गेरियन फुटबॉलपटू हृस्तो स्तोयीचकोव्हने हा खिताब जिंकला होता.
  • महिला गटामध्ये हा पुरस्कार रोमानियाची टेनिसपटू सिमोना हालेपने जिंकला.
ल्युका मॉड्रीच
  • ल्युका मॉड्रीच हा क्रोएशियाचा फुटबॉलपटू असून, तो क्रोएशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमचा चा कर्णधार व मिडफिल्डर आहे.
  • या दर्जाची कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक असल्याचे मानले जाते.
  • मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात मात्र फ्रान्सने त्यांचा पराभव केला.
  • याशिवाय लुका मॉड्रिचने गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रिदला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • विश्वचषक स्पर्धेत त्याला चांगल्या कामगिरीसाठी गोल्डन बॉलने गौरविण्यात आले. याशिवाय यावर्षी त्याने युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि बॅलोन डि ओर असे मानाचे पुरस्कार पटकावले.
  • फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला.

चालू घडामोडी : २९ डिसेंबर

पोक्सो कायद्यातील सुधारणांना मंत्रिमंडळाची मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने बालकांविरोधातील लैंगिक गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना अधिक कठोर शिक्षा देण्यासाठी बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२मध्ये दुरुस्तीला मंजुरी दिली.
  • पोक्सो कायदा आता आणखी कडक करण्यात आला असून त्यानुसार आता बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
  • देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्याला आळा घालण्यासाठी बाल लैंगिक शोषण केल्यास मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याच्या पोक्सो कायद्यातील दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
  • पोक्‍सो कायदा २०१२ मुलांचे हित आणि कल्याण लक्षात घेऊन मुलांना लैंगिक अपराध, लैंगिक शोषण आणि पोर्नोग्राफी पासून संरक्षण प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आला होता.
  • या कायद्यात लैंगिक भेदभाव नाही. हा कायदा मुलांना १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्‍यक्ति म्हणून परिभाषित करतो.
  • मुलांचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक विकास सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक टप्प्याला अधिक महत्‍व देत मुलांचे हित आणि कल्‍याण यांचा आदर करतो. 
  • मुलांना शारीरिक, मानसिक, सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे.
  • या कायद्यात कमीतकमी १० वर्ष तर जास्तीजास्त जन्मठेपेची शिक्षेची तरतूद होती, आता ही शिक्षा वाढवून मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • या दुरुस्तीमुळे या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद समाविष्ट केल्यामुळे बाल लैंगिक अपराध प्रवृत्ती रोखण्यात मदत मिळेल अशी आशा आहे. यामुळे मुलांच्या हिताचे संरक्षण होईल आणि त्यांची सुरक्षा आणि मर्यादा सुनिश्चित होईल.
  • कायद्यातील नव्या तरतुदी
  • १२ वर्षांखालील बालकांच्या लैंगिक शोषणासाठी २० वर्षे कारावास किंवा मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
  • १२ वर्षांखालील बालकांच्या सामुहिक लैंगिक शोषणासाठी जन्मठेप किंवा मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
  • १६ वर्षांखालील किशोरवयीन बालकांच्या लैंगिक शोषणासाठीची शिक्षा १० वर्षांवरून वाढवून २० वर्षे करण्यात आली आहे, ही शिक्षा जन्मठेपेमध्येही बदलली जाऊ शकते.
  • १६ वर्षाखालील बालकांच्या लैंगिक छळाच्या बाबतीत आरोपीला जामीन मंजूर केला जाणार नाही.
  • प्रौढ महिला लैंगिक शोषणासाठीची शिक्षा ७ वर्षांवरून वाढवून १० वर्षे करण्यात आली आहे, ही शिक्षा जन्मठेपेमध्येही बदलली जाऊ शकते.
  • या विधेयकात जलद सुनावणीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार विशेष न्यायालयात यासंबंधी खटल्याची सुनावणी १ वर्षात संपविणे बंधनकारक आहे.

भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग भारत दौऱ्यावर

  • भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग २७ डिसेंबर रोजी ३ दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले.
  • भारत व भूतान दरम्यान राजनयिक संबंधांना सुरुवात झाल्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात होत असलेला हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण होता.
  • लोते त्शेरिंग यांचे दिल्लीच्या राष्ट्रपती भवन येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली.
  • त्यांनतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोते त्शेरिंग यांच्यात शिष्टमंडळाच्या पातळीवरील चर्चा करण्यात आली.
  • या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या १२व्या पंचवार्षिक योजनेसाठी ४५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
भारत-भूतान राजनयिक संबंध
  • भारत आणि भूतानमधील राजनयिक संबंधांना १९६८मध्ये सुरूवात झाली. भारताने १९६८मध्ये भूटानची राजधानी थिम्फू येथे एक विशेष कार्यालय स्थापन केले.
  • त्यापूर्वी भूतानबरोबर भारतीय राजनयिक संबंधांचे व्यवस्थापन सिक्किममधील भारतीय राजकारणी अधिकारी करीत होते.
  • भारत-भूतान द्विपक्षीय संबंधांचे नियमन १९४९मध्ये झालेल्या मैत्री आणि सहकार संधीद्वारे केले जाते. फेब्रुवारी २००७मध्ये या संधीमध्ये सुधारणा करण्यात आल्या.
  • भारत-भूतानमधील राजनयिक संबंधांना २०१८मध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे भारत-भूतानमधील राजनयिक संबंधांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
लोते त्शेरिंग
  • व्यवसायाने डॉक्टर असलेले लोते त्शेरिंग सध्या भूतानचे पंतप्रधान आहेत. तसेच ते १४ मे २०१८पासून द्रुक न्याम्रूप त्शोग्पा राजकीय पक्षाचे अध्यक्षही आहेत.
  • लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते भूतानचे तिसरे पंतप्रधान आहेत.

आरबीआयची ६ तज्ञांची समिती स्थापन

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील अतिरिक्त रक्कमेचा आढावा घेण्यासाठी तसेच किती प्रमाणातील रक्कम सरकारला हस्तांतरित करावी याबाबत निर्णय घेण्यासाठी आरबीआयने ६ तज्ञांची समिती नियुक्त केली आहे.
  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान या समितीच्या अध्यक्षपदी तर, राकेश मोहन हे उपाध्यक्षपदी असतील.
  • आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन, आरबीआयच्या सेन्ट्रल बोर्डचे सदस्य भरत दोशी, सुधीर मांकड हे या समितीचे सदस्य असतील.
  • १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केंद्रीय बँकांच्या फ्रेमवर्कची समीक्षा करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
  • त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती आरबीआयचा आर्थिक भांडवल आराखडा निश्चित करेल. या समितीला ९० दिवसांत त्यांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. 
  • रिझव्‍‌र्ह बँकेकडील अतिरिक्त रकमेपैकी किती स्वत:कडे ठेवायची व किती केंद्र सरकारकडे हस्तांतरित करावयाची याबाबतचे मार्गदर्शन ही समिती करेल.
  • या संदर्भात अन्य देशांच्या मध्यवर्ती बँकांची पद्धतीचा आढावा घेऊन रिझव्‍‌र्ह बँकेच्या जोखमीचे भान ठेवत निर्णय घेण्यासाठी ही समिती पावले उचलेल.
बिमल जालान
  • बिमल जालान यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४१ रोजी राजस्थानमध्ये झाला. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता, केंब्रिज आणि ऑक्सफर्डमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
  • ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २०वे गव्हर्नर होते. २००० ते २००४ दरम्यान ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी प्रत्येकी २ वर्षांचे सलग २ कार्यकाळ आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पूर्ण केले.
  • त्यांच्या कार्यकाळात १००० रुपये मूल्याची चलनी नोट जारी करण्यात आली होती. 
  • १९८०च्या दशकात ते भारत सरकारचे प्रमुख सल्लागार होते. १९८५ ते १९८९ या काळात त्यांनी बँकिग सचिव म्हणून कार्य केले.
  • जानेवारी १९९१ ते सप्टेंबर १९९२ दरम्यान ते वित्त सचिवही होते. २००३-२००९ दरम्यान जालान राज्यसभेचे सदस्य होते.

भारताच्या वित्तीय तूटीत वाढ

  • नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष वित्तीय तूट ७.१६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे प्रमाण चालू आर्थिक वर्षाच्या वित्तीय तुटीच्या लक्ष्याच्या ११४.८ टक्के आहे.
  • वर्ष २०१८-१९ साठी सरकारने ६.२४ लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य निश्चित केले होते.
  • गेल्या वर्षीही याच कालावधीत तुटीचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे, संपूर्ण वर्षांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११२ टक्के असे होते.
  • सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तुटीचे प्रमाण चालू वित्त वर्षांकरिता ३.३ टक्के मर्यादेत राखण्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना निर्धारीत केले होते.
  • चालू आर्थिक वर्षांत नोव्हेंबर २०१८पर्यंत एकूण महसुली उत्पन्न ८.७० लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेत ते निम्मे आहे.
  • चालू संपूर्ण वर्षांसाठी सरकारचे महसुली उत्पन्नाचे लक्ष्य १७.२५ लाख कोटी रुपये आहे. तर नोव्हेंबर २०१८ अखेर खर्च १६.१३ लाख कोटी रुपये झाला आहे.
  • नवीन वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) मधून अपेक्षेपेक्षा कमी गोळा होत असलेला महसूल आणि एकंदरीत उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ यामुळे वित्तीय तूट यंदा फुगत चालली आहे.
  • वित्तीय तूट हे सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्चातील तफावत असते. महसुली उत्पन्नाची गणना करताना त्यात कर्जे समाविष्ट नसते. त्यामुळे वित्तीय तुटीमुळे कर्जाची आवश्यकता लक्षात येते.

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

  • देशात आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ सुरू केले आहेत.
  • आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार दरवर्षी ३ पात्र संस्था आणि व्यक्तींना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ देण्यात येईल.
  • प्रमाणपत्र आणि ५ लाख ते ५१ लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी फक्त भारतीय नागरिक आणि भारतीय संस्था पात्र असतील.
  • एखाद्या पुरस्कार विजेत्या व्यक्तीसाठी पुरस्काराशी रक्कम ५ लाख रुपये असेल, तर संस्थेसाठी पुरस्काराशी रक्कम ५१ लाख रुपये असेल.
  • संस्थांसाठी ही पुरस्काराची रक्कम केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी वापरली जाऊ शकते.
  • २०१९साठीच्या प्रथम सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांची घोषणा २३ जानेवारी २०१९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी केली जाईल.

ट्रेन-१८: भारतातील अधिकृत सर्वात वेगवान ट्रेन

  • ट्रेन-१८ ही अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन ठरली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली.
  • या ट्रेनने २ डिसेंबर रोजी झालेल्या चाचणीत प्रतितास १८० किमी वेग गाठला. ही चाचणी कोटा-सवाई माधवपूर विभागात ही चाचणी घेण्यात आली.
  • ही ट्रेन जानेवारी २०१९मध्ये व्यावसायिक कार्यास प्रारंभ करू शकते. २०१९-२० अशा प्रकारच्या आणखी ५ ट्रेन निर्माण केल्या जाणार आहेत.
ट्रेन-१८बद्दल
  • यापूर्वी ट्रेन-१८ची चाचणी २९ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. ही भारतातील पहिलीच विनाइंजिन ट्रेन आहे.
  • ट्रेन-१८ असे या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. ती संपूर्णपणे संगणकीकृत असून, बुलेट ट्रेनच्या धर्तीवर ही ट्रेन विकसित करण्यात आली आहे.
  • ही ट्रेन १९८८मध्ये सुरु झालेल्या शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेईल. सध्या शताब्दी एक्स्प्रेस २० मार्गांवर धावते. ती मेट्रो शहरांना इतर प्रमुख शहरांशी जोडते.
  • या ट्रेनची बांधणी चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. या ट्रेनचे ८० टक्के सुटे भाग भारतामध्ये तयार करण्यात आले आहेत.
  • ही ट्रेन बनवण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला आहे. अशी ट्रेन परदेशातून आयात केली असती तर सुमारे १७० कोटी रुपये खर्च आला असता.
  • १६ डबे असलेल्या या ट्रेनमध्ये लोकोमोटिव्ह (इंजिन) नाही. शताब्दी रेल्वेच्या तुलनेत ही १५ टक्के कमी वेळ घेईल.
  • तिच्या बांधणीसाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या ट्रेनमध्ये १६ एसी आणि २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असतील.
  • प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारी स्वदेशी बांधणीची ही हायस्पीड ट्रेन ताशी १६० ते २०० किमी वेग गाठू शकते.
  • या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष असे दोन बाथरूम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आले आहे.
  • तसेच ट्रेनच्या कोचमध्ये खास स्पेनमधून मागवण्यात आलेल्या सीट बसवण्यात आल्या आहे. या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे या सीट पूर्ण ३६० अंशांमध्ये वळू शकतात.
  • आणीबाणीच्या परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरशी संवाद साधता यावा यासाठी टॉकबॅक सुविधाही देण्यात आली आहे.
  • चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे प्रोटोटाइप रिसर्च डिझाइन व स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांना देण्यात येईल.

चीनची बेईदोऊ उपग्रह दिशादर्शन प्रणाली

  • चीनच्या बेईदोऊ (BeiDou) उपग्रह दिशादर्शन (नेव्हिगेशन) प्रणालीने अलीकडेच जागतिक सेवा सुरू केल्या.
  • या नेव्हिगेशन प्रणालीकडे अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमची (जीपीएस) प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे.
  • चीनची नेव्हीगेशन प्रणाली वापरणारा पाकिस्तान हा पहिला विदेशी देश असेल. 
  • अमेरिकेची जीपीएस, रशियाची ग्लोनास आणि युरोपियन युनियनच्या गॅलिलीयो नंतर चीनची बेईदोऊ ही जगातील चौथी दिशादर्शन (नेव्हीगेशन) प्रणाली आहे.
  • बेईदोऊ उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली प्रकल्प औपचारिकरित्या १९९४मध्ये सुरु करण्यात आला होता.
  • २०१८पर्यंत ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाच्या आसपासच्या देशांमध्ये बेईदोऊ सेवेचा विस्तार करण्याची चीनची योजना आहे.
  • बेईदोऊ प्रणालीमध्ये ३० उपग्रह असतील, हा प्रकल्प २०२०पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
  • सध्या चीन बेईदोऊ प्रकल्पांतर्गत चीनमध्ये आणि शेजारील देशांमध्ये नेव्हिगेशन सेवा प्रदान करत आहे.
भारताची नेव्हिगेशन प्रणाली
  • IRNSS (Indian Regional Navigation System) NAVIC (नाविक) एक प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली आहे.
  • याद्वारे भारत आणि आसपासच्या १५०० किमी क्षेत्रात अचूक रिअल-टाइम स्थान आणि वेळ सेवा प्रदान केली जाते.
  • नाविक अंतर्गत स्टँडर्ड पोजिशनिंग सेवा आणि मर्यादित सेवा अशा २ स्तरीय सेवा प्रदान केली जाते.
  • स्टँडर्ड पोजिशनिंग सेवा नागरी वापरासाठी प्रदान केली जाते, तर मर्यादित सेवा लष्करासह काही विशिष्ट वापरकर्त्यांना प्रदान केली जाते.
  • नाविक प्रणालीअंतर्गत उपग्रहांची संख्या ७वरून ११पर्यंत वाढविण्याची योजना आहे.

रिकी पॉन्टिंगचा आईसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

  • आईसीसीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला ‘आईसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये सहभागी करत त्याचा सन्मान केला.
  • रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाकडून आईसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा २५वा खेळाडू ठरला.
  • आयसीसी हॉल ऑफ फेमचा मानकरी व माजी सहकारी ग्लेन मैकग्राच्या हस्ते रिकी पॉन्टिंगला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
  • जुलै २०१८मध्ये दुबईमध्ये झालेल्या आईसीसीच्या वार्षिक सभेत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड व इंग्लडची महिला यष्टीरक्षक क्लेयर टेलरसह पॉन्टिंगलाही हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • रिकी पॉन्टिंग एकूण ३ वेळा ऑस्ट्रेलियाच्या विश्वकप जिंकणाऱ्या संघात सहभागी होता. त्यापैकी २ विश्वकप (२००३ व २००७) ऑस्ट्रेलियाने रिकी पॉन्टिंगच्याच नेतृत्वाखाली जिंकले आहेत.
  • पॉन्टिंगला २००६ आणि २००७मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू या किताबाने सन्मानित केले होते. तसेच २००६मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा बहुमान पॉन्टिंगने मिळवला होता.
  • त्याने आपल्या कारकिर्दीत १६८ कसोटी सामन्यात ४१ शतकासह १३,३७८ धावा तसेच ३७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० शतकासह १३,७०४ धावा केल्या आहेत.
  • तसेच १७ टी-२० सामन्यात त्याने ४०१ धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्‍यास घेतला.

चालू घडामोडी : २८ डिसेंबर

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

  • तिहेरी तलाकची अनिष्ट प्रथा संपुष्टात आणणारे ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१८’ लोकसभेत मंजूर करण्यात आले.
  • कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सादर केले. यावेळी विधेयकातील सुधारणांवर मतदान घेण्यात आले.
  • लोकसभेत उपस्थित असलेल्या २५६ खासदारांपैकी २४५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ११ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
  • आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे.
  • यावेळी विधेयकावरील सुधारणांवर घेण्यात आलेल्या मतदानावर बहिष्कार टाकत काँग्रेस, समाजवादी पार्टी, अण्णाद्रमुकसह अनेक पक्षांनी सभात्याग केला.
  • ही एखाद्या विशिष्ट धर्माशी संबंधित संवैधानिक बाब असल्याने, या विधेयकांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी संयुक्त निवड समितीची मागणी विरोधकांनी केली होती.
कायद्यातील ठळक तरतुदी
  • हा कायदा तिहेरी तलाकला (मग तो लिखित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असला तरीही) घटनाबाह्य, बेकायदेशीर ठरवतो.
  • तिहेरी घटस्फोटासाठी आरोपीला ३ वर्षाच्या शिक्षेची व दंडाची तरतूद या कायद्यात आहे.
  • मूळ कायद्यानुसार हा गुन्हा अजामीनपात्र आहे. अजामिनपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत.
  • परंतु या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर करण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
  • परंतु पीडित महिलेचे म्हणणे ऐकल्यानंतरच आवश्यक वाटल्यास न्यायदंडाधिकारी आरोपीला जामीन मंजूर करु शकतात..
  • पीडित पत्नी, रक्ताचे नाते किंवा लग्नाच्या नात्यातील व्यक्तींनी तक्रार केल्यास पतीला अटक होऊ शकते. शेजारी किंवा अज्ञात व्यक्ती या प्रकरणात तक्रार दाखल करू शकत नाही.
  • अशा प्रकरणात फक्त पीडित पत्नीच्या संमतीनेच न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करुन तडजोड करू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.
  • याव्यतिरिक्त, पीडित पत्नी तिच्या अल्पवयीन मुलांचा ताबादेखील घेऊ शकते आणि यासाठी तिला निर्वाह भत्ता मिळविण्याचा पूर्ण हक्क असेल.
पार्श्वभूमी
  • ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायदा ठरवले होते. तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.
  • तिहेरी तलाक मुस्लिम धार्मिक परंपरेचा अविभाज्य घटक असल्याचा युक्तिवादही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
  • तिहेरी तलाक प्रथेमध्ये मुस्लिम समाजातील पती आपल्या पत्नीला केवळ तीन वेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून घटस्फोट देऊ शकतो.
  • पाकिस्तान, बांगलादेशसहित २२ मुस्लीम देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली असून तो गुन्हा समजला जातो.
  • तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक लोकसभेत डिसेंबर २०१७मध्ये मंजूर करण्यात आले होते. परंतु राज्यसभेत ते मंजूर करुन घेण्यात सरकारला अपयश आले होते.
  • त्यामुळे तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०१८मध्ये मंजुरी दिली होती.
  • अध्यादेश काढल्याने ६ महिन्यात सरकारला ते संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करून, मंजूर करून घ्यावे लागणार आहे.

मिशन गगनयानला केंद्र सरकारची मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्रोच्या मिशन गगनयानला मंजुरी देण्यात आली.
  • या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे.
  • या अभियानांतर्गत २०२२मध्ये ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात ५ ते ७ दिवस मुक्काम करणार आहेत.
  • ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
गगनयान अभियानाबद्दल
  • १५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही योजना आखण्यात येणार आहे.
  • येत्या काही काळात हे मिशन सुरू होणार आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
  • गगनयान उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्याशी इस्रो समन्वय साधेल.
  • २०२२पर्यंत गगनयान अंतराळात पाठविले जाणार आहे. त्याआधी २०२० आणि २०२१मध्ये २ मानवरहित यान इस्रो अवकाशात पाठविणार आहे.
  • गगनयान मोहीमेसाठी ३ अंतराळवीरांच्या चमूची निवड भारतीय वायुसेना व इस्रोद्वारे संयुक्तपणे केली जाईल व नंतर या चमूला २-३ वर्षे प्रशिक्षण दिले जाईल.
  • गगनयान मिशनसाठी जीएसएलव्ही मार्क-३ उपग्रह प्रक्षेपण यान वापरले जाणार आहे. हे अंतरीक्षयान आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. ते १६ मिनिटात अपेक्षित उंचीवर पोहचेल.
  • मिशन गगनयानच्या स्पेस क्राफ्टमध्ये एक क्रू मॉड्यूल आणि एक सर्व्हिस मॉड्यूल असेल. त्याचे वजन सुमारे ७ टन असेल.
  • हे अंतरिक्षयान पृथ्वी कनिष्ठ कक्षेत ३००-४०० किमीच्या उंचीवर स्थापित केले जाईल, जेथे अंतराळवीर विविध प्रयोग करतील.
  • यातील क्रू मॉड्यूलचा आकार ३.७ मीटर असेल आणि सर्व्हिस मॉड्यूलचा आकार ७ मीटर असेल. अंतराळवीरांना घेऊन जाणारे क्रू मॉड्यूल हे सर्व्हिस मॉड्यूलला जोडलेले असेल.
  • परतीसाठी मॉड्यूल्सचा वेग कमी करून त्यांना उलट दिशेने फिरवले जाईल. जेव्हा हे दोन्ही मॉड्यूल्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२० किमीपर्यंत पोहोचतील, तेव्हा सेवा मॉड्यूल विलग क्रू मॉड्यूलपासून केले जाईल. केवळ क्रू मॉड्यूल पृथ्वीवर पोहोचेल.
  • पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी यास सुमारे ३६ मिनिटे लागतील. इस्रो गुजरातमधील खाडीमध्ये किंवा गुजरातजवळ अरबी समुद्रात क्रू मॉड्यूल लँड करण्याची योजना आखत आहे.
  • हे मिशन भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सुमारे ६ महिने आधी कार्यान्वित केले जाईल. यासाठी एकूण १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
  • इस्रोच्या या मोहिमेचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.
  • या अभियानाची तयारी इस्रोने २००४मध्येच सुरु केली होती. मिशन गगनयानमुळे सुमारे १५००० रोजगारही निर्माण होणार आहेत.

भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले.
  • राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसची ही २६वी आवृत्ती आहे. २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान ओडिशामध्ये ही परिषद आयोजित केली जात आहे.
  • यंदा या काँग्रेसची मुख्य संकल्पना (थीम) ‘स्वच्छ, हरित आणि निरोगी राष्ट्रासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना’ अशी आहे.
  • ओडिशामध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन दुसऱ्यांदा केले जात आहे. या कार्यक्रमात भारत, ५ आखाती देश व आसियान देशांमधील मुले सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस
  • हा एक राष्ट्रव्यापी विज्ञान संप्रेषण कार्यक्रम आहे. याची सुरुवात १९९३पासून झाली.
  • हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विभागांतर्गत राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषदेचा (NCSTC) एक कार्यक्रम आहे.
  • १०-१७ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलता व नवकल्पना दर्शविण्याकरिता एक मंच प्रदान करणे, हा राष्ट्रीय बाल विज्ञान कॉंग्रेसचा उद्देश आहे.
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषद (NCSTC)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचविणे हे या परिषदेचे मुख्य कार्य आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ही परिषद विविध कार्यक्रमांना प्रोत्साहन देते.

सार्वजनिक उद्योग सर्वेक्षण २०१७-१८

  • अलीकडेच संसदेत सार्वजनिक उद्योग सर्वेक्षण २०१७-१८ सादर करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेतरतील कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले गेले.
  • हे सर्वेक्षण केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाद्वारे करण्यात आले.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओएनजीसी आणि एनटीपीसी हे २०१७-१८मधील सर्वात फायदेशीर सरकारी कंपन्या ठरल्या.
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण नफ्यामध्ये या तीन कंपन्यांचा वाटा अनुक्रमे १३.३७ टक्के, १२.४९ टक्के आणि ६.४८ टक्के होता.
  • कोल इंडिया आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन या कंपन्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या सर्वात फायदेशीर सरकारी कंपन्या ठरल्या.
  • सर्वात फायदेशीर टॉप १० कंपन्यांच्या यादीत यंदा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनीही सामील झाली.
  • २०१७-१८मध्ये १८४ फायदेशीर सरकारी कंपन्यांच्या एकूण नफ्यामध्ये टॉप १० कंपन्यांचे योगदान ६१.८३ टक्के होते.
  • २०१७-१८दरम्यान बीएसएनएल, एअर इंडिया व एमटीएनएल या कंपन्या सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक तोटा सहन करणाऱ्या कंपन्या ठरल्या. एकूण तोट्यामध्ये या ३ कंपन्यांचे योगदान ५२.१५ टक्के आहे.
  • एकूण ७१ तोट्यातील सरकारी कंपन्यांच्या एकूण तोट्यामध्ये टॉप १० तोटा सहन करणाऱ्या कंपन्यांचा वाटा ८४.७१ टक्के होता.
  • भारत कुकिंग कोल लिमिटेड देखील यावेळी तोट्यातील कंपन्यांच्या यादीत सामील झाली.
  • इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तसेच ईस्टर्न कोलफील्ड या कंपन्या २०१६-१७पर्यंत नफ्यामध्ये होत्या, परंतु यावेळी या कंपन्याही तोट्यातील टॉप १० कंपन्यांच्या यादीत सामील झाल्या.
  • २०१७-१८मध्ये एकूण सार्वजनिक क्षेत्रात एकूण ३३९ उद्योग होते. ज्यापैकी २५७ कार्यरत होते तर उर्वरित ८२ उपक्रम निर्माणाधीन होते.

नागपूरमध्ये होणार ९९वे मराठी नाट्य संमेलन

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमध्ये होणार आहे.
  • मुंबईत झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
  • १९८५नंतर विदर्भात आणि नागपूरमध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाट्य संमेलन होत आहे.
  • १९८५मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाले होते.

दिव्या पाटीदार जोशीला मिसेस इंडियाचा खिताब

  • मध्य प्रदेशातील रतलामच्या दिव्या पाटीदार जोशीने मिसेस इंडिया माय आयडेंटिटी सौंदर्य स्पर्धा २०१८ जिंकली.
  • या स्पर्धेत तिने २४ स्पर्धकांना पराभूत केले. आता ते मिसेस युनिव्हर्स २०१९ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
  • या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे ३००० युवतींनी भाग घेतला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते.
  • दिव्याने या स्पर्धेतील ब्युटी विथ ब्रेन आणि कॅट वॉक या स्पर्धांमध्येही विजेतेपद मिळविले.
  • सध्या दिव्या ‘ग्रोइंग इंडिया फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहेत. हा एनजीओ बालमजुरी, महिलांच्या समस्या, कुप्रथा दूर करण्यासाठी कार्य करतो.

खालिस्तान लिबरेशन फोर्सवर बंदी

  • केंद्र सरकारने खून, बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खालिस्तान लिबरेशन फोर्सवर बंदी घातली आहे.
  • खालिस्तान लिबरेशन फोर्स बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आलेली ४०वी संस्था आहे.
  • अलीकडेच विविध संघटनांनी खालिस्तान लिबरेशन फोर्सचे मॉड्यूल्स पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली होती. या पार्शवभूमीवर सरकारने बंदींचा निर्णय घेतला आहे.
खालिस्तान लिबरेशन फोर्स (केएलएफ)
  • हिंसक कृत्यांद्वारे पंजाबला भारतापासून वेगळे करून स्वतंत्र खालिस्तानची स्थापना करण्याच्या उद्देशाने खालिस्तान लिबरेशन फोर्स १९८६मध्ये अस्तित्वात आली.
  • खालील घटनांमुळे केएलएफ पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या माहितीला पुष्टी मिळते:
  • पंजाब पोलिसांनी पकडलेल्या ५ सदस्यीय केएलएफ मॉड्यूलने पंजाबमधील नभ या स्थळी स्फोटके लावल्याच्या २ प्रकरणांची माहिती दिली होती.
  • गुरदासपूर जिल्ह्यात एक मॉड्यूल आढळून आले, ज्याच्या ४ दहशतवाद्यांना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह पकडण्यात आले होते. जे पठाणकोटमधील एका राजकीय पक्षाच्या नेत्याला लक्ष्य करणार होते.
  • अमृतसर पोलिसांनी तीन अतिरेक्यांचे एक मॉड्यूल पकडले होते, जे पंजाबमध्ये सांप्रदायिक सौहार्द विस्कळीत करण्यासाठी विशिष्ट समुदायाच्या प्रमुख सदस्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत होते.
  • जालंधर पोलिसांनी खालिस्तान जिंदाबाद फोर्सचा ४ दहशतवाद्यांचा एक विभाग पकडला होता. तसेच केएलएफच्या प्रमुखाला बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह अटक केली होती.
  • गृह मंत्रालयाच्या मते, केएलएफच्या भारतातील सदस्यांना परदेशातील त्यांच्या हस्तकांकडून आर्थिक मदत मिळत आहे. तसेच केएलएफ दहशतवादी कार्यात सहभागी आहे.
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा
  • हा कायदा भारतात बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संस्थांना प्रतिबंधित करतो.
  • तसेच भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना हा कायदा अनियंत्रित शक्ती प्रदान करते.
  • भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेत एकत्र येण्याचे स्वातंत्र्य आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी संघटना तयार करण्याचे स्वातंत्र्य अशा मुलभूत हक्कांवर हा कायदा वाजवी निर्बंध लागू करतो.

आसाममध्ये द्विजिंग महोत्सव सुरू

  • २७ डिसेंबर रोजी आसाममधील चिरांग जिल्ह्यामध्ये आई नदीच्या काठावर द्विजिंग महोत्सव सुरू झाला. या उत्सवाची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • या महोत्सवाचे उद्घाटन आसामच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री रिहोन दैमारी यांनी केले. या महोत्सवात १५ लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे.
  • द्विजिंग महोत्सव आसामचा वार्षिक नदी उत्सव आहे. यामध्ये व्यापार, अन्न, प्रदर्शन, क्रीडा, नदी मोहिमा आणि साहसी खेळ यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • या दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्ताने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.
  • या महोत्सवातून या प्रांताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तसेच याद्वारे पुरामुळे पिडीत लोकांनाही मदत केली जाईल.
आई नदी
  • आई नदीचा उगम भुटानमधील हिमालय पर्वतात होतो. आसामच्या चिरांग आणि बोंगाईगाव जिल्ह्यातून वाहत जाऊन ही नदी ब्रह्मपुत्रा नदीला मिळते.
  • ही नदी या क्षेत्रातील अंदाजे ३०,००० कुटुंबांची जीवनरेखा आहे. या नदीतून मिळणारी पिके, मासे, दगड आणि वाळू इत्यादींवर ही कुटुंबे अवलंबून आहे.
  • या नदीवर प्रसिद्ध हग्रमा पूल स्थित आहे. ही नदी सहली आणि तत्सम कार्यांसाठीही खूप लोकप्रिय आहे.

चालू घडामोडी : २७ डिसेंबर

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत द्वितीय डेल्टा क्रमवारी जाहीर

  • आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत (Aspirational Districts Program) नीती आयोगाने द्वितीय डेल्टा क्रमवारी जाहीर केली आहे.
  • १ जून ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ११ आकांक्षित जिल्ह्यांनी शिक्षण, पोषण, आरोग्य, आर्थिक समावेशन, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास या ६ क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या आधारे ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे.
  • यापूर्वी एप्रिल आणि मे २०१८तील प्रगतीच्या आधारे जून २०१८मध्ये पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर करण्यात आली होती.
क्रमवारीचे निष्कर्ष
  • सर्वाधिक सुधारणा दर्शविणारे पहिले ५ जिल्हे: विरुद्धनगर (तामिळनाडु), नुआपाडा (ओडिशा), सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश), औरंगाबाद (बिहार), कोरापुट (ओडिशा).
  • शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक सुधारणा दर्शविणारे जिल्हे: विरुद्धनगर (तामिळनाडु), नुआपाडा (ओडिशा), गुमला (झारखंड)
  • शिक्षण क्षेत्रात सर्वात कमी सुधारणा दर्शविणारे जिल्हे: पाकुर (झारखंड), यादगीर (कर्नाटक) आणि मलकनगिरी (ओडिशा)
  • आरोग्य आणि पोषण क्षेत्रात सर्वाधिक सुधारणा दर्शविणारे जिल्हे: चित्रकूट (उत्तर प्रदेश), बारवानी (मध्य प्रदेश) आणि विदिशा (मध्य प्रदेश)
  • आरोग्य आणि पोषण क्षेत्रात सर्वात कमी सुधारणा दर्शविणारे जिल्हे: चत्रा (झारखंड), पाकूर (झारखंड) आणि हजारीबाग (झारखंड)
  • कृषी व जलस्रोत क्षेत्रामध्ये सर्वाधिक सुधारणा दर्शविणारे जिल्हे: सितामारही (बिहार), गजपती (ओडिशा) आणि धलाई (त्रिपुरा)
  • कृषी व जलस्रोता क्षेत्रामध्ये सर्वात कमी सुधारणा दर्शविणारे जिल्हे: गिरिडीह (झारखंड), हैलाकंडी (आसाम) आणि बेगुसराई (बिहार)
  • मागील (जूनमधील) डेल्टा क्रमवारीपासून सुधारणांच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ केलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘फास्ट मुव्हर्स’ (जलद प्रवर्तक) श्रेणीमध्ये करण्यात आला आहे.
  • फास्ट मुव्हर्स श्रेणीतील आघाडीचे जिल्हे खालीलप्रमाणे: कुपवाडा (जम्मू-काश्मीर) (१०८वरून ७व्या स्थानी), रांची (झारखंड) (१०६वरून १०व्या स्थानी), सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) (१०१वरून ३ऱ्या स्थानी), जामुई (बिहार) (९९वरून ९व्या स्थानी), फतेहपुर (उत्तर प्रदेश) (८२वरून २५व्या स्थानी).
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम
  • ५ जानेवारी २०१८ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. देशातील सर्वात मागास जिल्हे विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • यासाठी या जिल्ह्यांमध्ये पुढील ५ प्रमुख घटकांवर कार्य केले जाणार आहे: आरोग्य व पोषण, शिक्षण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास, शेती, जलसंसाधन आणि पायाभूत सुविधा.
  • या योजनेच्या मदतीने मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या या संकेतकांना राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
डेल्टा क्रमवारी
  • आकांक्षित जिल्ह्यांमधील गतिशील संघांमधील स्पर्धात्मकतेच्या वृत्तीला उत्तेजन देण्यासाठी डेल्टा क्रमवारी जाहीर केली जाते.
  • ही क्रमवारी विकास करण्यास वाव असलेले क्षेत्रे ओळखण्यासाठी प्रमाणित साधने आणि त्यासंबंधी विशिष्ट आव्हाने सूचित करते.
  • त्यामुळे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे संचालन करणारी टीम इंडिया त्यावर सुधारात्मक उपाय तातडीने लागू करू शकते.
  • डेल्टा रँकिंग आणखी एक पायरी पुढे जात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पैलूंचेही आकलन करते आणि आकांक्षित जिल्ह्यांनी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याचे विश्लेषण करते.
  • या क्रमवारीचे निष्कर्ष जिल्हाधिकाऱ्यांना विकासाभिमुख क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास व भविष्यात त्यांचे क्रमावारीतीन स्थान सुधारण्यास मदत करतात.

अंदमान-निकोबारमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव

  • अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील ३ बेटांची नावे बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे.
  • त्यामुळे अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील हॅवलॉक बेटाचे स्वराज द्वीप, नील बेटाचे शहीद द्वीप आणि रॉस बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे नामांतर केले जाणार आहे.
  • नेताजींनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे तिरंगा फडकावल्याच्या घटनेस ७५ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत घोषणा करतील.
  • दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने या बेटांवर कब्जा केल्यावर सुभाषचंद्र बोस यांनी तेथे तिरंगा फडकवत अंदमान-निकोबार बेटसमूहाचे नाव बदलून शहीद आणि स्वराज बेट करण्याची सूचना केली होती.
  • नेताजींनी आझाद हिंद सेनेचे जनरल एडी लोगनाथन यांना या बेटांचे गव्हर्नर घोषित केले होते. त्यांच्या मते पोर्ट ब्लेयर ब्रिटीशांच्या शासनातून स्वतंत्र झालेले पहिले क्षेत्र होते.
  • टीप: हॅवलॉक बेटाचे नाव ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून देण्यात आले होते. हे अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे.

एसबीआयमधून होणार निवडणूक रोख्यांची विक्री

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २९ अधिकृत शाखांद्वारे १ ते १० जानेवारी २०१९ दरम्यान निवडणूक रोख्यांची विक्री केली जाणार आहे.
  • २०१७च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडण्यात आली कोटी, तर २०१८मध्ये निवडणूक रोखे योजना सुरू झाली.
निवडणूक रोखे योजना
  • निवडणूक रोखे प्रॉमिसरी नोटप्रमाणे असतात. अशा रोख्यांची खरेदी फक्त भारतीय नागरिक वा भारतात स्थापन झालेल्या कंपन्या/संस्थाच करू शकतील.
  • राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता यावी आणि हा निधी कराच्या चौकटीत यावा यासाठी निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडण्यात आली.
  • निवडणूक रोखे योजनेनुसार राजकीय पक्षांना द्यावयाच्या देणग्या रोख्यांच्या रूपात असतील.
  • रोख स्वरूपात राजकीय पक्षांना देणगी देण्याची कमाल मर्यादा २००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम देणगी म्हणून देण्यासाठी निवडणूक रोखे बंधनकारक असतील.
  • निवडणूक रोख्यांचे दर्शनी मूल्य हजारच्या पटीमध्ये, १० हजार, १ लाख, १० लाख व १ कोटी रुपयांचे असेल.
  • रोखे एकदा खरेदी केल्यावर १० दिवसांच्या आत राजकीय पक्षांना देणगी म्हणून द्यावे लागतील. या रोख्यावर कोणतेही व्याज असणार नाही.
  • निवडणूक रोख्यावर खरेदी करणार्‍या नागरिकांचे, व्यक्तीचे, संस्थेचे नाव असणार नाही.
  • निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला रोखे खरेदी करताना स्टेट बँकेला स्वतःचा पॅन नंबर द्यावा लागेल.
  • ज्या व्यक्तीने पॅन नंबर देऊन रोखे खरेदी केले आहेत, त्या व्यक्तीवर हे रोखे त्याने कोणत्या पक्षाला दिले हे सांगण्याचे बंधन नाही.
  • अशा रोख्यांचा वापर ज्या राजकीय पक्षांची नोंदणी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट (कलम २९-क) या कायद्याखाली झाली असेल, त्यांनाच करता येईल.
  • हे रोखे फक्त त्याच राजकीय पक्षांना देता येतील ज्यांना गेल्या निवडणुकीत किमान १ टक्का किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाली असतील.
  • रोखे मिळाल्यानंतर राजकीय पक्ष हे रोखे त्याच बँकेत जमा करू शकतील, ज्याची माहिती निवडणूक आयोगाकडे आहे.
  • रोख्याचा धारण कालखंड फक्त १५ दिवसांचा असल्यामुळे व्यक्ती, कायदेशीर संस्था, किंवा राजकीय पक्ष अशा निवडणूक रोख्यांचा वापर पर्यायी चलन किंवा मालमत्तेचा एक नमुना म्हणून करू शकणार नाहीत.

मंजू मेहता यांना तानसेन पुरस्कार २०१८

  • मध्य प्रदेश सरकारने संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिध्द सितारवादक मंजू मेहता यांना ‘तानसेन पुरस्कार २०१८’ने सन्मानित केले.
  • मंजु मेहता यांना ग्वाल्हेर येथील तानसेन संगीत महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • मंजु मेहता संगीतकार शशिमोहन भट्ट आणि पंडित विश्वमोहन भट्ट यांच्याशी संबंधित जयपूरच्या भट्ट घराण्यातील आहेत.
  • त्या ऑल इंडिया रेडिओमधील आघाडीच्या कलाकार आहेत आणि त्यांनी गुजरातमध्ये सप्तक स्कूल ऑफ म्युझिकही सुरू केले आहे.
  • मजू मेहता यांनी पंडित रविशंकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आहेत. संगीत क्षेत्रात त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • संगीत वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी राजा मानसिंग तोमर पुरस्कार २०१७साठी वाराणसीच्या संकट मोचन प्रतिष्ठानला तर २०१८साठी नटरंग प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला.
तानसेन पुरस्कार
  • भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार सुरू केला.
  • २ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • प्रथम तानसेन पुरस्कार २०००मध्ये सितारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना प्रदान करण्यात आला होता.
तानसेन
  • तानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते.
  • तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना ‘मियां तानसेन’ म्हणूनही ओळखले जात होते.
  • त्यांचे प्रारंभिक संगीत प्रशिक्षण ग्वाल्हेरच्या राजा मानसिंह तोम यांच्या संगीत शाळेत झाले. ते स्वामी हरिदासांचे शिष्य होते. तानसेनने सुमारे १० वर्षे त्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते.
तानसेन संगीत महोत्सव
  • मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये ग्वाल्हेरमधील तानसेनच्या थडग्याजवळ वार्षिक ४ दिवसीय तानसेन संगीत महोत्सवाचे  आयोजन केले जाते.
  • संपूर्ण भारतातील गायन व वाद्य कलाकार या महोत्सवात सहभागी होऊन, आपली काला येथे सादर करतात.

स्वदेशी बनावटीचे पहिले इलेक्ट्रिक डम्पर

  • कोल इंडिया लिमिटेडने प्रथमच स्वदेशी बनावटीच्या २०५ टन वजनाच्या इलेक्ट्रिक डम्परचा वापर सुरु केला आहे. खाणकामासाठी हे अत्यंत उपयुक्त उपकरण आहे.
  • हे डम्पर सरकारी मालकीच्या बीईएमएल कंपनीने विकसित केले आहे. उत्तरेकडील कोळसा क्षेत्रातील अम्लोहरी कोळसा खाणीत कोल इंडिया या डम्परचे परीक्षण करीत आहे.
  • उत्तरेकडील कोळसा क्षेत्रातील वापरला जाणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्वदेशी डम्पर आहे.
  • या स्वदेशी डम्परमुळे पुरवठादारांमधील स्पर्धा वाढण्याची आणि परिणामी डम्परच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
स्वदेशी डम्परचे फायदे
  • या स्वदेशी डम्परच्या यशस्वी परीक्षणामुळे भारताला अनेक संधी निर्माण होतील.
  • या डम्परच्या यशस्वी चाचणीनंतर कोल इंडियाच्या अधिक क्षमतेच्या डम्परच्या निविदासाठी बीईएमएल अर्ज करू शकेल.
  • नॉदर्न कोलफिल्ड लिमिटेडने यापूर्वीच अशा प्रकारच्या निविदा काढल्या आहेत तर इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड लवकरच १० डम्परसाठी निविदा जारी करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
  • रशियन बेलाज, टाटा हिताची आणि कॅटरपिलर या कंपन्यांचे सध्या भारतीय डम्पर बाजारात प्रभुत्व आहे. परंतु या डम्पर्सची किंमत १५ कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
  • बीईएमएलला ई-डम्पर मार्केटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाल्यास ही कंपनी बाजारातील मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊ शकेल.
  • यामुळे बीईएमएलसाठी अनेक संधी निर्माण होतील तसेच यामुळे ‘मेक इन इंडिया’लाही चालना मिळेल आणि त्यामुळे कोल इंडियाला कमी किंमतीत डम्पर उपलब्ध होतील.
मेक इन इंडिया
  • भारतात केवळ उत्पादन क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातही उदयोजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेला मेक इन इंडिया हा उपक्रम नवी कार्यपद्धती, नव्या पायाभूत सुविधा, नवी क्षेत्रे, नवी विचारसरणी या ४ स्तंभावर आधारित आहे.
  • गुंतवणूक वाढ, नावीन्यपूर्ण उपक्रम, कौशल्य विकास, बौद्धिक संपदांचे रक्षण, उत्पादनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा हे मेक इन इंडिया मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
  • भारताला जागतिक उत्पादन हबमध्ये रुपांतरित करण्यासाठी हा उपक्रम आहे. २५ सेक्टरमध्ये रोजगार निर्माण करणे, हादेखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

कुनो वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा

  • मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच कुनो वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे. यात ४०४ चौकिमी क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे.
  • कुनोला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केल्यामुळे आता गुजरातच्या गिरमधील आशियाई सिंहांना येथे हलविले जाऊ शकते.
  • राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले जाण्यापूर्वी कुनो वन्यजीव अभयारण्य होते. याला पालपुर-कुनो वन्यजीव अभयारण्य देखील म्हटले जाते.
  • हे मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात स्थित आहे आणि सुमारे ९०० चौकिमी क्षेत्रात पसरलेले आहे.
  • १९८१मध्ये या वन्यजीव अभयारण्यासाठी ३४४.६८ चौकिमी क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. नंतर या क्षेत्रामध्ये वृद्धी करण्यात आली होती.
  • या वन्यजीव अभयारण्यात भारतीय कोल्हा, माकड, भारतीय बिबट्या आणि नीलगाय हे प्राणी आढळतात.

निधन: सुलागिट्टी नरसम्मा उर्फ जननी अम्मा

  • कर्नाटकातील मागास भागात ‘जननी अम्मा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे २५ डिसेंबर रोजी वयाच्या ९८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात सुलागिट्टी नरसम्मा यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सुमारे १५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती.
  • कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय त्या हे काम करायच्या, त्यामुळे कर्नाटकच्या मागास आणि दुर्गम भागात त्यांना जननी अम्मा या नावाने ओळखले जायचे.
  • त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सामाजिक सेवेबद्दल तुमकूर विद्यापीठाने २०१४ साली त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी दिली होती.
  • सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सरकारने २०१८मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • २०१३मध्ये त्यांना नॅशनल सिटीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच २०१३मध्ये त्यांना कर्नाटक राजोत्सव पुरस्कारही देण्यात आला.

निधन: प्रसिद्ध उर्दू साहित्यिक व लेखक हमीदी कश्मीरी

  • प्रसिद्ध उर्दू साहित्यिक व लेखक हमीदी कश्मीरी यांचे २७ डिसेंबर रोजी निधन झाले. ते एक प्रसिद्ध कवी आणि शिक्षणतज्ञ होते. तसेच ते काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरूही होते.
  • हमीदी कश्मीरी यांचा जन्म १९३२ साली जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्यांनी आजपर्यंत ५०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
  • त्यांना २०१०मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. २००५मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांना गालिब पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
  • त्यांच्या काही प्रमुख साहित्यकृती: इक्तिशफी तंकीद इबराक, महासीर तंकीद, रियासती जम्मू और कश्मीर उर्दू अदब, जदीद कशीर शायरी तथा शेख-उल-आलम और शायरी इत्यादी.

जयंत नारळीकर यांना फुले पुरस्कार

  • मराठीतील उत्कृष्ट वाङ्मयीन निर्मितीस देण्यात येणारे राज्य शासनाचे ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७’ २० डिसेंबर रोजी जाहीर झाले.
  • या पुरस्कार विजेत्यांमध्ये जयंत नारळीकर, रामदास भटकळ, इरावती कर्णिक, कृष्णात खोत, मृदुला बेळे आदी ३२ साहित्यिकांचा समावेश आहे.
पुरस्कार विजेते
  • महात्मा जोतिराव फुले पुरस्कार: डॉ. जयंत नारळीकर यांच्या ‘गणित आणि विज्ञान-युगायुगांची जुगलबंदी’ पुस्तकाला.
  • प्रौढ वाङ्मय-काव्यासाठी देण्यात येणारा कवी केशवसुत पुरस्कार: शशिकांत हिंगोणेकर यांच्या ‘ऋतुपर्व’ पुस्तकाला.
  • बहिणाबाई चौधरी पुरस्कार: अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ पुस्तकाला.
  • नाटकासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार: आशुतोष पोतदार यांच्या ‘एफ १/१०५ आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकाला.
  • हरी नारायण आपटे पुरस्कार: कृष्णात खोत यांच्या ‘रिंगण’ कादंबरीला.
  • ललितगद्यसाठीचा अनंत काणेकर पुरस्कार: इरावती कर्णिक यांच्या ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ला.
  • प्रौढ वाङ्मय चरित्र साहित्यप्रकारासाठी न. चिं. केळकर पुरस्कार: डॉ. उमेश करंबेळकर.
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार: ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांना ‘इंडीयन होम रुल हिंद स्वराज’ या अनुवादित पुस्तकासाठी.
  • अर्थशास्त्रविषयक लेखनासाठी सी. डी. देशमुख पुरस्कार: डॉ. मृदुला बेळे.
  • पर्यावरणविषयक लेखनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार: अर्जुन व्हटकर.
  • लघुकथेसाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार: मधुकर धर्मापुरीकर.
  • सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार: डॉ. प्रकाश लोथे यांना धर्मधुरीण या साहित्यनिर्मितीसाठी.
  • लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार: वासुदेव मुलाटे यांना आत्मचरित्रासाठी.
  • श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: प्रा. यशपाल भिंगे यांना समीक्षेसाठी.

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे

  • महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह मंडळाच्या अन्य नव्या ३५ सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
  • डॉ. सदानंद मोरे हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.
  • यापूर्वी ते पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक होते. यापूर्वी त्यांनी राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.
  • मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सारथी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.
  • डॉ. सदानंद मोरे २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • त्यांनी अनेक संत साहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
  • तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत अशी त्यांची ओळख आहे.

ई-कॉमर्सबाबतचे नियम अधिक कठोर

  • केंद्र सरकारने ई-कॉमर्सबाबतचे नियम अधिक कठोर केले असून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने याविषयी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
  • ई-कॉमर्स कंपन्या विशेष विक्री योजना आखतात. या योजनांतून भरमसाट सवलत, अन्य सुविधा दिल्या जात असल्याने गेल्या काही वर्षांत हा ऑनलाइन व्यवसाय भरभराटीला आला आहे.
  • मात्र यामुळे व्यवसायावर कमालीचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार देशी किरकोळ व्यापाऱ्यांनी वेळोवेळी केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
  • या अधिसूचनेनुसार, ई-कॉमर्स मंचावरून होणाऱ्या व्यवसायावर विशिष्ट निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • एखाद्या कंपनीमध्ये ई-कॉमर्स कंपनीचा किंवा तिच्या समूह कंपन्यांचा भांडवली हिस्सा असल्यास किंवा एखाद्या कंपनीच्या साठ्यावर ई-कॉमर्स वा तिच्या समूह कंपनीच्या नियंत्रण असल्यास अशा कंपन्यांच्या उत्पादनांची ई-कॉमर्स कंपन्यांना एक फेब्रुवारीपासून विक्री करता येणार नाही.
  • ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणारी रोख सवलत (कॅशबॅक) वाजवी असावी, त्यात भेदभाव केला जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
  • ई-कॉमर्स कंपन्यांना यापुढे सर्व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
  • यानुसार आधीच्या आर्थिक वर्षात केलेल्या कायदेशीर पूर्ततेची माहिती अधिकृत लेखापालाच्या प्रमाणपत्रासह दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात जमा करणे ई-कॉमर्स कंपन्यांना अनिवार्य करण्यात आले आहे.
  • या अधिसूचनेनुसार केवळ ई-कॉमर्सवरून (एक्स्क्लुसिव्ह) विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.
  • फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आदी ई-कॉमर्स कंपन्या विशिष्ट स्मार्टफोन वा प्रचंड मागणी असलेल्या अन्य वस्तूच्या विक्रीबाबत संबंधित कंपनीशी करार करतात.
  • यामुळे ही वस्तू केवळ त्यांच्याकडूनच विकत घेता येते. मात्र यापुढे या कंपन्यांना या प्रकारे व्यवसाय करता येणार नाही.
  • फ्लिपकार्ट व अॅमेझॉनसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायावर यामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जपान ‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’मधून बाहेर

  • जपानने ‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’मधून (आयडब्ल्यूसी) बाहेर पडण्याचा आणि जानेवारी २०१९पासून पुन्हा देवमाशाची (व्हेलची) शिकार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जपान २०१७पासून ‘व्यावसायिक व्हेलिंग’ सुरू करण्यासाठी ‘आयडब्ल्यूसी’कडे मागणी करत होता. मात्र, या समितीकडून त्यांना परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे आयडब्ल्यूसीमधून बाहेर पडण्याचा निर्णय जपानने घेतला आहे.
  • जपान १९५१पासून आयडब्ल्यूसीचा सदस्य आहे. देवमाशाचे मांस खाणे जपानी परंपरेचा एक भाग आहे. 
  • देवमाशाची शिकार करणे हा आमच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांची शिकार केल्याशिवाय ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचू शकत नाही, असा युक्तिवाद आयडब्ल्यूसी सदस्यता सोडण्यासाठी जपानने केला.
  • काही महिन्यांपूर्वी जपानने दुर्मिळ अशा ‘सालाना’ या देवमाशाची शिकार केली होती. यामुळे जगभरातून जपानवर टीकाही करण्यात आली होती.
  • यापूर्वी आइसलँड व नॉर्वे या देशांनीही आयडब्ल्यूसीद्वारे देवमाशाच्या व्यावसायिक शिकारीवरील बंदीची अवहेलना केली होती.
इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन
  • दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांनी आपली प्रथिनांची गरज भागविण्यासाठी देवमाशांची शिकार करायला सुरुवात केली आणि यात जपान देश सर्वात अग्रेसर होता.
  • देवमाशांची शिकार रोखण्यासाठी ‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ (आयडब्ल्यूसी) या स्वतंत्र समितीची १९४६मध्ये स्थापना करण्यात आली. यामध्ये ८८ सदस्य देश आहेत.
  • आयडब्ल्यूसीचा मुख्य उद्देश: देवमाशांच्या सरंक्षणासाठी नियम तयार करणे.
  • देवमाशाच्या काही प्रजाती जवळपास नामशेष झाल्यानंतर १९८६मध्ये आयडब्लूसीने व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घातली. यामुळे आयडब्लूसीच्या सदस्य देशांमधील देवमाशांची अधिकृत शिकार बंद झाली.
  • आयडब्ल्यूसीने २००२मध्ये प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार संपूर्ण जगात केवळ ५ हजार ते १२ हजारच देवमासे उरले होते.
  • व्यावसायिक व्हेलिंग या व्यवसायात ऑस्ट्रेलियाही आधी अग्रेसर होता, मात्र देवमाशांच्या संवर्धनासाठी ऑस्ट्रेलियाने देशात व्हेलिंग व्यवसायावर बंदी घातली.