चालू घडामोडी : ५ एप्रिल

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य आणि सुवर्णपदक

  • ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या गुरुराजा आणि मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टींग प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली.
  • गुरू राजाने ५६ किलो वजनी गटात २४९ किलो वजन उचलत भारताला स्पर्धतील पहिले पदक (रौप्य) मिळवून दिले.
  • मीराबाई चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे.
  • चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी कामगिरीची नोंद केली.
  • याआधी ऑगस्टिना नवाओकोलोने २०१० मध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७७ किलो वजन उचलून विक्रम केला होता. हा विक्रम मीराबाई चानूने मोडीत काढला. 
  • आतापर्यंत पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, १ रौप्य, ० कांस्य मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर इंग्लंड ६ सुवर्ण, ३ रोप्य आणि ३ कांस्य पदकासह पहिल्या स्थानावर आहेत.

चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात व्याजदर जैसे थे

  • चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के असा कायम ठेवला आहे.
  • इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही.
  • यापूर्वी देखील सलग तीन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. रेपो दरात शेवटची पाव टक्क्यांची कपात ऑगस्ट २०१७मध्ये झाली होती.
  • महत्त्वाचे दर असे :
  • रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना कर्ज देण्यासाठी (रेपो रेट) : ६ टक्के
  • रिझर्व्ह बँकेला कर्ज घ्यायचे असल्यास (रिव्हर्स रेपो रेट) : ५.७५ टक्के
  • बँकांना आपत्कालीन कर्ज हवे असल्यास (मार्जिनल फॅसिलिटी) : ६.२५ टक्के
  • बँकांनी रिझर्व्ह बँकेत ठेवण्याची किमान रक्कम (सीआरआर) : ४ टक्के
  • बँकांची किमान रोख तरलता (एसएलआर) : १९.५ टक्के

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा

  • काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे.
  • या प्रकरणातील अन्य आरोपी तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आणि सैफ अली खान यांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले.
  • वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते.
  • सलमानने १ व २ ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री कांकाणी गावात २ काळवीटांची शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.
  • या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.
  • या शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे विना परवाना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
  • सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. त्या दोघांनी दिलेल्या साक्षीमुळे सलमान खानला शिक्षा होऊ शकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा