चालू घडामोडी - १४ व १५ डिसेंबर २०१४

·        १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
·        १५ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय चहा दिन
·        सुप्रसिद्ध विधीतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही.आर.कृष्णा अय्यर यांचे नुकतेच निधन झाले. ते १०० वर्षाचे होते.
·        गेल्या २४ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर कोची येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्याच महिन्यात त्यांनी आपला १००वा वाढदिवस साजरा केला होता.
·        जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या अणवस्त्रवाहू ‘अग्नि-४’ क्षेपणास्त्राची मंगळवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली.
·        चार हजार कि.मी. पर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनापर्यंतचे अणवस्त्र वाहून नेऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. याचे वजन १७ टन असून लांबी २० मीटर आहे.
·        'अग्नि-४क्षेपणास्त्राची आज ही चौथी यशस्वी चाचणी पार पडली. याआधी नोव्हेंबर २०११, सप्टेंबर २०१२ आणि जानेवारी २०१४ मध्ये यशस्वी चाचणी घेतल्यानंतर या क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश करण्यात आला होता.
·        पंजाबमधील घुमानमध्ये होणा-या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.
·        दिल्ली पाठोपाठ हैदराबादने उबेरच्या टॅक्सी सेवेवर बंदी घातली आहे.
·        राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हृदयावर लष्करी रुग्णालयात करण्यात आलेल्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
·        केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (इंटेलिजेंस ब्यूरो) प्रमुखपदी भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी दिनेश्‍वर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा हे १९७९ च्या केरळ केडरचे अधिकारी आहेत.
·        ते सय्यद असिफ इब्राहिम यांची जागा घेणार.
·        ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या नूतन अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
·        जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा ८५ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी १७५ भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानावर होता.
·        मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असून भारताने यावर्षी नऊ देशांना मागे टाकले आहे.
·        डेन्मार्कने ९२ गुण मिळवून या देशाने सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सर्वाधिक भ्रष्टाचार उत्तर कोरिया आणि सोमालिया मध्ये होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. या देशांना अवघे आठ गुण मिळाले.
·        भारताचा शेजारी राष्ट्र चीन गेल्यावर्षी ८०व्या स्थानावर होता. तो चीन यावर्षी १०० व्या क्रमांकावर पोहचला आहे.
·        विविध राज्य अर्थमंत्र्यांच्या बैठकीतील चर्चा  पुन्हा निष्फळ ठरल्याने केंद्र सरकारकडून एक एप्रिल २०१६ पासून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागला.
·        राज्य अर्थमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या (ईसीएसएफ) बैठकीत पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कार्यक्षेत्रात आणण्याच्या निर्णयाला राज्यांनी कडाडून विरोध दर्शवला.
·        घटनात्मक सुधारणा विधेयकामध्ये जीएसटी सुरू झाल्यानंतर पाच वर्षानी राज्यांना महसुली नुकसानभरपाईची तरतूद नसल्याबाबतही त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला.
·        देशात १३ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये १.२५ कोटी प्रलंबित खटले निकाली निघाले आहेत.
·        एकाच दिवसात कोटय़वधी खटले निकाली निघाल्याने याचिकादारांचे खटल्यावर होणारे तीन हजार कोटी रुपये वाचले आहेत.
·        २०१३ मध्ये पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ७१ लाख याचिका निकाली काढल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा