चालू घडामोडी - ७ मार्च २०१५

·        ७ मार्च १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
·        घुमान येथे पुढील महिन्यात होणारे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकारने राज्याचा उत्सव (स्टेट इव्हेंट) म्हणून जाहीर केला असून, संमेलनाचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.
·        संमेलनाच्या निमित्ताने घुमान विकास मंडळाची स्थापना करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली आहे.
·        नांदेडच्या धर्तीवर घुमानचा विकास करण्यात येणार असून, त्याची सुरवात म्हणून संत नामदेव महाराज यांच्या नावाने घुमान येथे दहा एकर जागेत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभ संमेलनाच्या उद्‌घाटनादिवशी तीन एप्रिलला होणार आहे.
·        अरबी समुद्रात पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी मरिन फोर्सकडून ४५ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.
·        ज्येष्ठ काँग्रेस नेते व केरळ विधानसभेचे अध्यक्ष जी. कार्तिकेयन (वय ६६) यांचे आज कर्करोगाने निधन झाले.
·        त्यांनी केरळ स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते या युनियनचे अध्यक्ष झाले. युवक काँग्रेसनंतर ते केरळ काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष झाले. ते सहा वेळा विधानसभेवर निवडून आले होते.
·        केरळात १९९५ मध्ये ए. के. अँटनी यांच्या नेतृत्वाखाली बनविण्यात आलेल्या सरकारमध्ये कार्तिकेयन ऊर्जा मंत्री होते.
·        केरळमध्ये २०११ साली काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर कार्तिकेयन यांना विधानसभा अध्यक्ष बनविण्यात आले होते.
·        पाश्‍चिमात्य चित्रपटसृष्टीमधील
प्रसिद्ध अभिनेते
हॅरिसन फोर्ड (वय ७२) हे आज एका अपघातातून सहीसलामत बचावले.
·        आपल्या थरारक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले फोर्ड हे चालवित असलेल्या विमानाच्या इंजिनामध्ये अचानक बिघाड झाला.
·        मात्र, फोर्ड यांनी प्रसंगावधान राखून हे विमान जवळील गोल्फच्या मैदानावर क्रॅश लॅंड केले. फोर्ड हे या अपघातामध्ये जखमी झाले असले, तरी त्यांच्या जखमा प्राणघातक नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
·        बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या सरकारने घेतलेले ३४ निर्णय रद्द केले. मांझी यांनी विधानसभेत विश्‍वास ठराव मिळविण्यापूर्वी या निर्णयांना मंजुरी दिली होती.
·        रद्द केलेले निर्णय
·        पोलिसांना १२ ऐवजी १३ महिन्यांचे वेतन
·        बेघरांना देण्यात येणाऱ्या जमिनीबाबतचा निर्णय
·        आमदारांवरील खर्च दोन कोटींहून तीन कोटी करणे
·        केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी “स्किल इंडिया” कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
·        केंद्राच्या या योजनेची मुहूर्तमेढ आदिवासी विभागातून रोवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी घेतला असून, पहिल्या वर्षात राज्यातील तब्बल पाच हजार आदिवासी युवकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
·        भारताने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथ्या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला, मात्र त्यासाठी त्यांना वेस्ट इंडीज संघावर विजय मिळविताना अडथळ्याची शर्यत करावी लागली.
·        त्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीची संयमी फलंदाजी निर्णायक ठरली. विंडीजला १८२ धावांत रोखल्यानंतरही भारताला विजयासाठी ३९.१ षटकांपर्यंत झगडावे लागले. भारताने ६ बाद १८५ धावा केल्या.
·        बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज एका बॉंबस्फोटातून बचावल्या, राजधानीचे शहर असणाऱ्या ढाक्‍याजवळ ही घटना घडली.
·        हसीना यांच्या गाड्यांचा ताफा उडवून देण्यासाठी अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्याखाली बॉंब पेरून ठेवले होते. सुदैवाने हसीना यांच्या गाड्यांचा ताफा गेल्यानंतर त्यांचा स्फोट झाला त्यामुळे त्यांचे प्राण बचावले.
·        श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मच्छीमारांनी प्रवेश केल्यास त्यांना गोळ्या घातल्या जातील, अशा अर्थाचे विधान करत श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी वाद निर्माण केला आहे.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे विधान झाले असून, त्यांच्या या विधानावर भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हा मुद्दा चर्चेत उपस्थित केला आहे.
·        इराक आणि सीरियामध्ये भीषण हिंसाचार घडवून आणणाऱ्या “इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया” (इसीस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी तीन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन निमरूड शहर बुलडोझर्सच्या साहाय्याने उद्‌ध्वस्त केल्याने जागतिक समुदाय हळहळला आहे.
·        प्राचीन मेसोपोटॅमियन संस्कृतीचे प्रतीक असणारे निमरूड शहर कल्हाहू या नावानेही ओळखले जात असे. या शहराचा कालावधी हा ख्रिस्तपूर्व नववे शतक मानले जाते.
·        असिरीया साम्राज्याची राजधानी असणारे निमरूड शहर इराक आणि लेव्हंटचा भाग आहे.
·        तैग्रीस नदीच्या तीरावर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये हे शहर वसले होते. आजही या ठिकाणी मंदिरे, राजमहाल आणि पिरॅमिड यांचे अवशेष आढळून येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा