चालू घडामोडी - १८ व १९ जून २०१५


‘कृषी विमा’ आणि ‘नाऊ कास्ट’ या दोन वेबपोर्टलचे उद्घाटन
  • केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी १९ जून २०१५ रोजी ‘कृषी विमा’ आणि ‘नाऊ कास्ट’ या दोन वेबपोर्टलचे उद्घाटन केले.
  • सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना (एनएआयएस), सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (एमएनएआयएस) आणि हवामानाधारित कृषी विमा योजना (डब्ल्यूबीसीआयएस) या प्रमुख तीन विमा योजनांतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक, प्रीमियम, अंतिम तारीख, विमा कंपन्यांशी संपर्क करणे याबाबतची माहिती ‘कृषी विमा’ वेबपोर्टलद्वारे घेता येईल.
  • त्याचप्रमाणे कृषी खात्याकडे ‘एसएमएस’ सेवेसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांना पीक विम्याबाबतची माहिती निःशुल्कपणे पाठविली जाईल. या वेबपोर्टलवर सर्व राज्यांची जिल्हावार, तालुकावार माहिती उपलब्ध आहे.
  • हवामानाची माहिती डॉप्लर रडारमार्फत हवामान खात्यातर्फे एकत्रित केली जाते. याअंतर्गत अतिवृष्टी, गारपीट, मुसळधार पाऊस यासारख्या परिस्थितीचा अंदाजवजा इशारा शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचविण्यासाठी देशभरातील १४६ हवामान केंद्रांचा उपयोग केला जाणार आहे. 
  • हवामान खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याची तत्काळ माहिती ‘नाऊ कास्ट’ या वेबपोर्टलमार्फत तसेच ‘एसएमएस’द्वारे शेतकऱ्यांना मिळेल.
  • या केंद्रांच्या ५० किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना किमान तीन तास आधी "एसएमएस‘द्वारे हवामानाबाबतचे इशारे कळविले जातील.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ
    MGNREGA
  • दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता ‘मनरेगा’चे काम शंभर ऐवजी दीडशे दिवस चालेल. 
  • दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अधिक रोजगार हवा असेल, तर त्यांना ‘मनरेगा’वर दीडशे दिवस काम उपलब्ध होऊ शकेल. दुष्काळाची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. 
  • देशातील बहुसंख्य भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ‘मनरेगा’च्या कामाचे दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सध्या देशातील ६५२ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याचा सर्वाधिक लाभ शेतमजूर आणि महिला कामगारांना होतो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पाचवे कुटुंब ‘मनरेगा’शी जोडलेले आहे.
  • ‘मनरेगा’च्या वाढलेल्या अवधीचा सर्वाधिक फायदा झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील लोकांना होणार आहे.

भारत आणि स्पेन दरम्यान राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या
  • भारत आणि स्पेन दरम्यान, राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ जून २०१५ रोजी मंजूरी देण्यात आली.  
  • यामुळे भारत आणि स्पेनच्या राजनैतिक पारपत्रधारकाला एकमेकांच्या देशात प्रवेश करताना, प्रवास करताना तसेच ९० दिवसांचा मुक्काम करताना आवश्यक पूर्ततेसह व्हिसाशिवाय प्रवास करता येईल.
  • भारताने व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याचा असा करार आतापर्यंत ४० देशांबरोबर केला आहे.

ऍमेनेस्टी इंटरनॅशनलचे आकार पटेल भारतातले अध्यक्ष
    Aakar Patel
  • जागतिक पातळीवर मानवी हक्‍क आणि मानवाधिकारासाठी (ह्युमन राईटस) काम करणाऱ्या ऍमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍमेनेस्टी भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत. 
  • पटेल यांनी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. डेक्कन क्रोनिकल या दैनिकात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते. तसेच मिड-डेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
ऍमेनेस्टी इंटरनॅशल
    Amnesty International
  • स्थापना : जुलै १९६१
  • संस्थापक : बॅरिस्टर पिटर बेनेसन
  • मुख्यालय : लंडन 
  • महासचिव : सलील शेट्टी (भारत)
  • ऍमेनेस्टी इंटरनॅशल ही संस्था मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी जगभर कार्य करते. स्वतंत्र्यासाठी पोर्तुगालमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. या घटनेनंतर ही संस्था स्थापन करण्यात आली. 
  • शोषणाविरुध्द राबविलेल्या अभियानाबद्दल १९७७ साली या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या संचालकपदी  अर्चना रामसुंदरम 
  • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागातून (सीबीआय) उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे (एनसीआरबी) संचालक करण्यात आले आहे.
  • त्या १९८०च्या तामिळनाडू तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 
  • गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची ‘सीबीआय’च्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवर वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 
  • त्यांची नियुक्ती बेकायदा आणि नियमाविरुद्ध असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदावर काम करण्यास मनाई केली होती.

सुब्रतो रॉय यांना जामीन मंजूर
    Subrata Roy
  • गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या ‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने अटींवर जामीन मंजूर केला. 
  • रोख स्वरुपात पाच हजार कोटी रुपये आणि तितक्याच रकमेची बॅंक हमी दिल्यानंतर त्यांना जामीनावर तुरुंगातून सोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. 
  • त्याचबरोबर पुढील १८ महिन्यांमध्ये टप्प्याटप्याने सहारा समुहाने ३६ हजार कोटी रुपये सेबीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे पालन केले नाही, तर सुब्रतो रॉय यांना पुन्हा पोलीसांपुढे शरण यावे लागणार आहे.
  • सुब्रतो रॉय यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, याचबरोबर देशात कुठे जाणार आहात, त्याची सर्व माहिती सुब्रतो रॉय यांनी दिल्ली पोलीसांना देण्याचे बंधनही न्यायालयाने त्यांच्यावर घातले आहे.
  •  दर पंधरा दिवसांनी त्यांना नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. 

चिनी भाषेतील भगवतगीता प्रकाशित
  • आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवतगीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
  • शांघायमधील झेजियांग विद्यापीठातील प्रा. झू चेंग आणि लिंग हाई यांनी भगवतगीतेचे चिनी भाषेत भाषांतर केले असून, सिचुआन पीपल्स पब्लिकेशनच्यावतीने ती प्रकाशित करण्यात आली आहे. भारतातील प्रसिद्ध योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत भगवतगीतेचे प्रकाशन करण्यात आले.
  • चीनमधील भारताचे राजदूत अशोक के. कांत यांनी या भगवतगीतेचे प्रकाशन केले.

श्रीनिवासन सलग १४व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी
  • बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी १२ जून २०१५ रोजी सलग १४व्यांदा निर्वाचित झाले. श्रीनिवासन यांना पुढील एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले आहे.
  • श्रीनिवासन हे २००२-०३ पासून टीएनसीएचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.
  • आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. मार्चमध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते. श्रीनिवासन २०१६ पर्यंत मात्र आयसीसी चेअरमनपदावर कायम राहणार आहेत.

नथुला खिंड पुन्हा खुली करण्यात आली
  • भारतातून कैलास पर्वत व मानसरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ५३ वर्षानंतर नथुला खिंड (सिक्कीम) १६ जून २०१५ रोजी पुन्हा खुली करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पर्यटकांच्या पहिल्या तुकडीला दिल्ली येथून रवाना केले.
  • मानसरोवर तिबेटमध्ये नैऋत्य भागात आहे. हा संपूर्ण प्रदेश चीन प्रजासत्ताकच्या अंतर्गत एक स्वायत्त भाग आहे.
  • १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर नथुला खिंड चीनने बंद केली होती. सप्टेंबर २०१४मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या चीनच्या राष्ट्रपती  शी जिनपिंग यांनी हा मार्ग खुला करण्यास सहमती दर्शवली होती. व्यापारासाठी हा मार्ग २००६मध्ये खुला करण्यात आला होता.

अमेरिकेची व्हिसा प्रदान प्रक्रिया बाधित
    USA Visa System
  • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयामधील संगणक प्रणालीमध्ये उद्भवलेल्या समस्येमुळे या देशाचा व्हिसा प्रदान करण्यासंदर्भातील जगभरातील प्रक्रियेस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
  • वॉशिंग्टन येथील संगणक प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अमेरिकेचा व्हिसा प्रदान करण्यासंदर्भातील प्रक्रिया बाधित झाली आहे.
  • या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे व्हिसा देण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षाविषयक माहिती मिळविण्यामध्ये अडचणी येत आहेत. 
  • सार्वजनिक व खासगी क्षेत्रामधील शंभरपेक्षाही जास्त संगणक तज्ज्ञ यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. व्हिसा प्रदान व्यवस्था पुढील आठवड्यामध्ये सुरळित होण्याची शक्यता आहे.

मध्यम पल्ल्याचे धावपटू रॉन क्लार्क यांचे निधन
  • ऑस्ट्रेलियाचे मध्यम पल्ल्याचे अव्वल धावपटू रॉन क्लार्क यांचे १७ जून २०१५ रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 
  • क्लार्क यांनी १९६०च्या दशकांत मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत १७ विश्वविक्रमांची नोंद केली होती. हादेखील एक विक्रम ठरला होता. मात्र, त्यांना एकदाही ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकता आले नाही.
  • १९६४च्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी १० हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले होते. त्यानंतर १९६८च्या मेक्सिको ऑलिंपिक स्पर्धेत ते ५ हजार मीटर शर्यतीत पाचव्या आणि १० हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर राहिले होते.
  • क्लार्क यांनी १९६५ चे वर्ष मात्र आपल्या एकामागून एक विक्रमांनी गाजवले होते. त्यांनी दोन मैलाची स्पर्धा तासाभरात जिंकली होती. १० हजार मीटर शर्यत २८ मिनिटांत जिंकणारे ते पहिले धावपटू होते. 
  • त्यांच्या यशस्वी १९६५ व्या वर्षाच्या कामगिरीने त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून गौरविण्यात आले.
  • कारकिर्दीत १७ विश्‍वविक्रम करणाऱ्या रॉन क्लार्क यांना ऑलिपिंक सुवर्णपदक कधीही जिंकता आले नाही. त्यामुळे प्रसिद्ध ॲथलेटिक्स इतिहासकार रॉबर्तो क्विर्सेतानी यांनी आपल्या ‘ए वर्ल्ड हिस्ट्री ऑफ लाँग डिस्टंस रनिंग’ या पुस्तकात त्यांच्यावर एक विशेष प्रकरण लिहले आहे. या प्रकरणाचे शिर्षक त्यांनी ‘Ron Clarke--magnanimous King Without A Crown’ असे दिले आहे.

‘दि राइट ब्रदर्स’
  • पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी ‘दि राइट ब्रदर्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून  त्यामध्ये विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे.
  • प्रत्यक्षात राइट बंधूंना विमानाची कल्पना कधी सुचली. कसलेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना त्यांनी कशा पद्धतीने विमानाची चाचणी घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाट्यमयता या नव्या पुस्तकातून लोकांसमोर येणार आहे.
  • ‘सिमन अँड शुश्टर’ या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. या ग्रंथाच्या लेखनासाठी मॅककुलाघ यांनी राइट बंधूंच्या खासगी डायऱ्या, वह्या, स्क्रॅपबुक आणि त्यांनी परस्परांना लिहिलेली शेकडो पत्रे चाळली. त्यातून एक नवे भावविश्व त्यांच्या हाती लागले. आता हीच संशोधनगाथा पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती येईल.

एनएल बेनो जेफिन - देशातील पहिली अंध आयएफएस अधिकारी
  • तामिळनाडूची एनएल बेनो जेफिन देशाची पहिली दृष्टिहीन आयएफएस अधिकारी बनली आहे. बेनोने देशातील सगळ्यात कठिण यूपीएससी परिक्षेत ३५३ रँक मिळविला आहे.
  • सध्या बेनो स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी अधिकारीच्या पदावर काम करत आहे. गेल्या काही वर्ष बेनो या परीक्षेची तयारी करत होती. २०१३च्या परिक्षेच्या निकालाचे परिणाम आल्यावर बेनोने नवीन इतिहास रचला आहे.
  • बेनो तामिळनाडू भारतियार यूनिवर्सिटीतून इंग्रजीमध्ये पीएचडी करत आहे. पीएचडी चालू असताना बेनोने सिविल सर्विसची तयारी सुद्धा केली.

१,००० बाहूंच्या बुद्ध मूर्तीचा जीर्णोद्धार
  • चीनच्या तज्ञांनी गौतम बुद्ध यांच्या सहस्त्र बाहूंच्या दुर्मिळ व ८०० वर्षे जुन्या मूर्तीला मूळ रूप प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण केले आहे. 
  • सिचुआन प्रांतातील दाजू परगण्यात असलेल्या या मूर्तीच्या जीर्णोद्धाराचे काम २००८ साली सुरू झाले होते. सुमारे ९८ लाख डॉलर खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले. 
  • आता लोक एक हजार हातांची ही बुद्धमूर्ती नव्या रूपात पाहू शकतात. एखाद्या मूर्तीच्या जिर्णोद्धाराचा हा सर्वात मोठा प्रकल्प होता. या कामासाठी कामगारांनी मूर्तीची ८३० हात पुन्हा तयार केले व या कामासाठी २२७ उपकरणांचा वापर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा