चालू घडामोडी - २२ ऑगस्ट २०१५


बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

    Babasaheb-Purandare-honoured-with-Maharashtra-Bhushan-award
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, कार्य, कर्तुत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  • बाबासाहेब पुरंदरे यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती, तो दिवस बाबासाहेबांचा तिथीने ९३वा वाढदिवस होता.
  • राजभवनातील दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
  • दहा लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बाबासाहेबांनी शिवचरित्रातून शिवराय महाराष्ट्रातच नव्हे तर, देश-विदेशात पोहोचवले.
  • सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती भवनात दिले जातात. त्या परंपरेला अनुसरुनच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा राजभवनात आयोजित करण्यात आला.
 बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपरिचय 
    Babasaheb Purandare
  • जन्म नाव : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
  • टोपणनाव : बाबासाहेब पुरंदरे
  • जन्म : जुलै २९, इ.स. १९२२ (सासवड, पुणे)
  • कार्यक्षेत्र : इतिहास संशोधन, साहित्य
  • विषय : शिवकालीन इतिहास
  • प्रसिद्ध साहित्यकृती : राजा शिवछत्रपती
  • कार्य : बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व नाटकाचे दिग्दर्शन केले.
  • शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
  • बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.
प्रकाशित साहित्य
आग्रासिंहगडपुरंदऱ्यांची नौबत
पुरंदरमहाराजपुरंदऱ्यांचा सरकारवाडा
प्रतापगडफुलवंतीपुरंदरच्या बुरुजावरून
राजगडलालमहालमुजऱ्याचे मानकरी
सावित्रीशेलारखिंडपन्हाळगड
  • टीप : शेलारखिंड ही शिवाजीच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला ‘सर्जा’ हा मराठी चित्रपटही निघाला होता.
  • याचबरोबर त्यांनी फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली व दिग्दर्शित केली.

केरळ देशातील पहिले डिजिटल राज्य

    kerala declared the first digital state of india
  • गॉडस ओन कंट्री अशी ओळख असलेले निसर्गसुंदर केरळ राज्य देशातील पहिले डिजिटल राज्य बनल्याची घोषणा मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी केली आहे.
  • राज्य सरकारने डिजिटल कारभारासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्यात ई-साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे. 
  • पंचायत स्तरावर डिजिटलायझेशन झाले असून डिजिटल बॅँकिंगमध्ये राज्य अव्वल आहे. ‘ई-डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाअंतर्गत सर्व जिल्हे बॅँक खात्याला जोडले आहेत. पुढील काळात सर्व स्थानिक स्वराज संस्थांमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट तयार केले जातील. तसेच मोबाईल गव्हर्नन्सही राबवली जाईल.
  • १०० टक्के साक्षरता, १०० टक्के मोबाईल व १०० टक्के इंटरनेट वापर साध्य करणारे केरळ पहिले राज्य आहे.
  • राज्याची लोकसंख्या ३.३ कोटी आहे तर मोबाईल्सची संख्या आहे ३.१ कोटी.राज्यातील २० टक्के कुटुंबे ब्रॉडबँडचा वापर करत आहेत तर १५ टक्के मोबाईल नेट वापरत आहेत.
  • देशात प्रथमच केरळ राज्यात २३०० सामान्यसेवा केंद्रे लाँच केली असून राज्यात आधार नोंदणी ९९ टक्के पूर्ण झाली आहे. ई डिस्ट्रीक्टने १.५ कोटी प्रमाणपत्रे वितरित केली आहेत आणि ३३ लाख जणांनी ई एज्युकेशन घेतले आहे.
  • आयटी शाळांना प्रोत्साहन दिले जात आहे आणि प्रत्येक पातळीवर तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जात आहे. १२६०० शाळांत ३९ लाख मुले संगणक साक्षर आहेत आणि शाळांची पाठ्यपुस्तके लवकरच डिजिटल होणार आहेत. राज्यात सर्व शिक्षण ऑनलाईनच दिले जाणार आहे.
  • दहा वर्षांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे उभारण्याची मंजुरी देण्यात आली होती. या दूरदर्शी निर्णयामध्येच केरळच्या आजच्या यशाचे गमक आहे.

‘जलयुक्त शिवार’ला आमीर खानची ११ लाखांची मदत

  • राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त असलेल्या राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला बॉलिवूड अभिनेता आमीर खानने ११ लाखांचे अर्थसहाय्य केले आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून माहिती देताना आमीर खानने जलयुक्त शिवार अभियानाला मदत केल्याचे जाहीर केले आहे. 
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणाऱ्या या पैशातून जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.

मोदी आणि ओबामा यांच्यात ‘हॉटलाइन’

  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संपर्कासाठी संरक्षित दूरध्वनी यंत्रणा (हॉटलाइन) नुकतीच सुरू करण्यात आल्याचे अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही अशी हॉटलाइन सुरू करण्यात आली आहे. 
  • हॉटलाइन सुरू होऊन काही दिवस झाले असले तरी अद्याप त्याचा वापर करण्यात आलेला नाही. अत्यंत जवळच्या दोन भागीदारांना सर्वोच्च पातळीवरून विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी ही हॉटलाइन सुरू केली आहे.
  • देशाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चेसाठी असलेली भारताची ही पहिलीच हॉटलाइन असून, अमेरिकेबरोबर हॉटलाइन असलेला भारत हा फक्त चौथाच देश आहे. चीन, रशिया आणि ब्रिटनबरोबरही अमेरिकेचा हॉटलाइनद्वारे संपर्क आहे.
  • परराष्ट्र सचिव पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हॉटलाइन सुरू करण्याचा निर्णय २००४ मध्ये होऊन ती अमेरिकी लष्कराच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
  • तसेच, चीनबरोबरही परराष्ट्रमंत्री पातळीवरील हॉटलाइन सुरू करण्याचे २०१० मध्ये ठरले आहे. परंतु चीनबरोबरील हॉटलाइन अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

ग्रीकचे पंतप्रधान ऍलेक्सिस यांचा राजीनामा

    Alexis Tsipras
  • ग्रीसचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रीसवर सध्या आर्थिक संकट ओढवले असताना अश्यावेळी ग्रीसच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.
  • सिप्रास यांच्या राजीनाम्यामुळे आता ठरवलेल्या कालावधीच्या आधीच निवडणुका घेण्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ग्रीसमध्ये येत्या २० सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत.
  • एलेक्सिस सिप्रास यांनी याच वर्षी निवडणुका जिंकून पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. सिप्रास यांना ग्रीसच्या जनतेने मोठ्या बहुमताने विजयी केले होते.
  • परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडून बेलआउट करार मान्य केल्यानंतर सिप्रास यांनी त्यांचाच पक्ष असलेल्या सिरिजा पार्टीचे समर्थन गमावले होते. कारण पक्षातील इतर मंडळी कराराच्या विरोधात होती. पक्षातील वाढत्या विरोधानंतर सिप्रास यांनी लवकरच निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा