चालू घडामोडी : १९ मार्च

कॅप इंडिया २०१६

  • रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने मुंबईत येत्या २० ते २२ मार्च दरम्यान ‘कॅप इंडिया २०१६’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • जागतिक बाजारात रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. मेक इन इंडियाच्या धर्तीवर या वस्तूंच्या उत्पादनवाढीवर भर दिला जाणार आहे.
  • या उद्योगाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने मुंबईत कॅप इंडिया या औद्योगिक मेळाव्याचे आयोजन केले आले. या प्रदर्शनात विविध देशातील २५० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
  • प्लेक्सकोन्सिल, केमिक्सिल, कॅपेक्सिल आणि शेफेक्सिल या चार निर्यात प्रोत्साहक संस्था यासाठी (ईपीसी) सह-आयोजक आहेत.
  • रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादने यांच्या जागतिक व्यापारात भारत हा महत्त्वाचा स्पर्धक आहे. जागतिक व्यापारात आपल्या हिस्सेदारीत वाढीला मोठा वाव आहे.
  • सरकारने २०२० सालापर्यंत ९०० अब्ज अमेरिकी डॉलरचे निर्यात लक्ष्य गाठण्याचे आणि जागतिक व्यापारात आपला हिस्सा २ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर नेण्याचा दृष्टिकोन राखला आहे.
  • भारतीय रसायन उद्योग जगातील तिसरा मोठा उत्पादक आणि एकूण उलाढालीच्या मानाने जगात १२व्या स्थानावर आहे. 
  • CAP India 2016 : Chemicals & Plastics Exhibition 2016 

योगेश्वर दत्तचा रिओ ऑलिंपिकमध्ये प्रवेश निश्चित

  • भारताचा प्रमुख कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने यावर्षी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.
  • आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत योगेश्वरने ६५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवीत आपले ऑलिंपिकमधील स्थान निश्चित केले.
  • ऑलिंपिकसाठी पात्र होणारा योगेश्वर हा दुसरा कुस्तीपटू आहे. यापूर्वी नरसिंग यादवने ऑलिंपिकमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे. 

उर्दू लेखकांची कोंडी

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उर्दू लेखकांना यापुढे त्यांच्या पुस्तकात देशद्रोही किंवा सरकारच्या विरोधात मजकूर नसेल, अशी ग्वाही देण्याची सक्ती केली आहे.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन समितीने हा आदेश काढला आहे. 
  • या समितीकडून अनेक उर्दू लेखक आणि प्रकाशकांना अर्ज धाडण्यात आले आहेत. त्या अर्जांत लेखकांची कोंडी करणाऱ्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत.
  • उर्दू भाषा प्रोत्साहन समितीकडून आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत विविध लेखकांकडून पुस्तकांची खरेदी केली जाते. त्यासाठी आधी अर्ज भरून द्यावा लागतो.
  • या अर्जात बदल करण्यात आला असून, पुस्तकातील मजकूर सरकारविरोधी नसेल, त्यात देशविरोधी वा विविध समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होईल असे लिखाण नसेल, अशी हमी देण्याचे बंधन आता घालण्यात आले आहे.
  • हा एकप्रकारचा करारनामाच असून लेखी हमीचा भंग केल्यास लेखकावर कारवाई करून दिलेले अर्थसहाय्य परत घेण्यात येईल, असेही या अर्जात बजावण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा