चालू घडामोडी : ४ मार्च


मनोजकुमार यांना ४७वा दादासाहेब फाळके पुरस्कार

    Manoj Kumar
  • ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांना २०१५ वर्षासाठीच्या ४७व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यांत येणार आहे.
  • मनोजकुमार यांचे हरियाली और रास्ता, वह कौन थी, हिमालय की गोद में, उपकार, दो बदन, पत्थर के सनम, पुरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान आणि क्रांती हे चित्रपट विशेष गाजले. देशभक्तीपर आधारीत चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.
  • उपकार या चित्रपटासाठी मनोजकुमार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यांत आले.
  • यापूर्वी दिलीपकुमार, शशीकपूर, गुलजार, अदूर गोपाळकृष्णन, सौमित्र चटर्जी, सत्यजीत रे, मृणाल सेन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री : अरुण जेटली
 पारितोषिके आणि सन्मान 
  • १९६८ : ‘उपकार’ चित्रपटासाठी दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार 
  • १९६८ : ‘उपकार’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा आणि संवाद यांच्यासाठी फिल्म फेअर पारितोषिक 
  • १९७२ : ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्म फेअर पारितोषिक 
  • १९७५ : ‘रोटी कपडा और मकान’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे फिल्म फेअर पारितोषिक 
  • १९९२ : पद्मश्री 
  • १९९९ : फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कार 
  • २००८ : मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार, स्टार स्क्रिन जीवनगौरव पुरस्कार 
  • २००९ : दादासाहेब फाळके अकादमीतर्फे फाळके रत्न पारितोषिक 
  • २०१० : बाराव्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव सन्मान, महाराष्ट्र सरकारचा राष्ट्रीय राज कपूर पुरस्कार 
  • २०१२ : नाशिकमधील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव, तसेच न्यू जर्सी (अमेरिका) येथील संस्थेतर्फे भारत गौरव पारितोषिक 
  • इतर सन्मान : मनोजकुमार यांच्या सन्मानार्थ एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला. 
  • २०११ : शिर्डी येथील साईबाबा संस्थानने पिंपळवाडी रस्त्याचे ‘मनोजकुमार गोस्वामी मार्ग’ असे नामकरण केले.
 दादासाहेब फाळके पुरस्कार 
  • भारतीय चित्रपटाच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये महत्वपूर्ण योगदानासाठी भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 
  • सुवर्णकमळ, १० लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • सरकारने स्थापन केलेल्या मान्यवर व्यक्तींच्या समितिच्या शिफारशिंच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो.
  • यावर्षी लता मंगेशकर, आशा भोसले, सलिम खान, नितिन मुकेश आणि अनुप जलोटा या पाच सदस्य समितीने एकमताने मनोजकुमार यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली.

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन

    P.A. Sangma
  • लोकसभेचे माजी अध्यक्ष, ईशान्य भारतातील प्रभावी नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सह-संस्थापक पूर्नो अगितोक संगमा उर्फ पी. ए. संगमा यांचे ४ मार्च रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
  • तुरा या मतदारसंघातून संगमा ९वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसमधील दीर्घ प्रवासात १९८४मध्ये ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनले. त्यानंतर नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कामगारमंत्रीपद मिळाले.
  • शरद पवार यांच्यासोबत संगमा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. १९९६ ते १९९८ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते.
  • १९८८ ते १९९० या कालावधीत त्यांनी मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली, तर १९९० ते १९९१ दरम्यान त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. लोकसभेचे अध्यक्षपद भूषवणारे ते ईशान्य भारतातील पहिले नेते होते.
  • २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
  • या निवडणुकीवेळीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परंतु तिथेही न जमल्याने बाहेर पडून २०१३मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली.
  • संगमा यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोरोदिनी; कॉनराड आणि जेम्स ही दोन मुले आणि मुलगी अगाथा असा परिवार आहे. कॉनराड हे मेघालयचे माजी अर्थमंत्री असून, जेम्स हे विद्यमान आमदार आहेत. अगाथा या २००९मध्ये मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण मंत्री ठरल्या होत्या.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू रायला सुवर्णपदक

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या जितू रायने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
  • डाव्या हाताच्या तळव्याला झालेल्या दुखापतीने त्रस्त जितूने ऑलिम्पिक पदकविजेत्या चीनच्या वेईला नमवत सुवर्णपदकावर कब्जा केला.
  • गेल्या दोन वर्षांत जितूने नेमबाजी विश्वचषकात सलग पाच वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. यादरम्यान त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकावर कब्जा केला आहे.
  • जितूने १९१.३ तर वेईने १८६.५ गुण मिळवले. चीनच्याच वांग झिवेईने १६५.८ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले. भारताच्या प्रकाश नानजप्पाने पात्रता फेरीत ५४९ गुणांसह १७वे स्थान मिळवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा