चालू घडामोडी : ११ व १२ एप्रिल

भारत आणि मालदीव यांच्यामध्ये सहा करार

  • मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात भारत आणि मालदीव यांच्यामध्ये विविध सहा करार करण्यात आले. 
  • संरक्षण सहकार्यासह करांची पुनरुक्ती टाळणे, करांबाबत माहिती देणे, अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले.
  • पंतप्रधान मोदी आणि गयूम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्रथम प्राधान्य असल्याचे गयूम यांनी मोदींना सांगितले.
 करारांमधील ठळक मुद्दे 
  • संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरून सहकार्य वाढविणार 
  • भारतातर्फे मालदीवमध्ये पोलिस अकादमी आणि संरक्षण मंत्रालयासाठी इमारत बांधली जाणार 
  • आरोग्य आणि पर्यटन सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न 
  • आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एकाच वस्तूवर दोन वेळा बसणारा कर टाळणार 
  • मालदीवमधील प्राचीन मशिदी आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे जतन 
  • दक्षिण आशियाई उपग्रहासाठी एकमेकांना सहकार्य

जगातील वाघांच्या संख्येत वाढ

  • वन्यजीन संवर्धन गटाच्या जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे. 
  • रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या ३८९० वर पोहोचली आहे. २०१०मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या ३२०० होती.
  • संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आली आहे.
  •  महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठे योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण २२२६ वाघ आहेत. 
  • २०१०मध्ये वाघांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व देशांनी संवर्धन गटाशी हातमिळवणी करुन २०२२पर्यंत वाघांची संख्या वाढवण्याची शपथ घेतली होती.
  • या पाहणीमध्ये भारत, रशिया, भुतान, नेपाळमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. २०१४मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या आधारावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

विश्वनाथन आनंदला हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार

  • हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे. 
  • राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते विश्वनाथन आनंदला १२ एप्रिल २०१६ रोजी सांयकाळी ७ वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (प), मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
  • भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन व ए आर रेहमान यांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

कॅमेरॉन यांच्या प्राप्तिकराची माहिती सार्वजनिक

  • ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी आपल्या प्राप्तिकराची माहिती सार्वजनिक केली. असे करणारे ते ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
  • ‘पनामा पेपर्स’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचलले असून, या करचुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी त्यांनी कृती समितीचीही स्थापना केली आहे. 
  • ‘पनामा पेपर्स’ प्रकरण उघडकीस येताच, काही विरोधकांनी कॅमेरॉन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कॅमेरॉन यांनी गेल्या सहा वर्षांतील प्राप्तिकराची माहिती जाहीर केली आहे.
  • २०१४-१५ या काळात त्यांचे उत्पन्न दोन लाख पौंडापेक्षा अधिक होते आणि यावर त्यांनी ७६ हजार पौंड कर भरला आहे.

अश्विन मन्ना फुड्सचा ‘ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर’

  • आरोग्य क्षेत्रातील अत्पादनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या मन्ना फुड्सने ‘ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर’ म्हणून अश्विनची निवड केली आहे. 
  • गोलंदाजीत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याने आर. अश्विनने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे. अश्विन हा मुन्ना फूड्स ब्रँडचा पहिलाच बँड अँबॅसेडर आहे. 
  • मुन्ना फूड्सने पुदुचेरीसह दक्षिण भारतात सक्षमपणे आपले पाय रोवले आहेत. मागील वर्षी त्यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही विस्तार केला.
  • तसेच, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, सौदी अरेबियासह संपूर्ण मध्य-पूर्वेत ‘मन्ना’ची उत्पादने निर्यात केली जातात. 
  • सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे अशा देशांमध्ये ‘मन्ना’चा चांगला व्यवसाय आहे. 
  • मूळचा चेन्नईचा असलेला आर. अश्विन सर्वांत वेगाने बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचे दीड शतक पूर्ण केले आहे.
  • अजंता मेंडिसनंतर ‘कॅरम बॉल’ टाकणारा अश्विन हा एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय, २ शतके आणि ५ अर्धशतके नावावर असणारा अश्विन अष्टपैलू गोलंदाज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा