चालू घडामोडी : २७ नोव्हेंबर

सिंधूला हाँगकाँग सुपर सीरिजचे उपविजेतेपद

  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिला हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 
  • चीनची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली खेळाडू ताई त्झू यिंग हिने सिंधूचा १५-२१ व १७-२१ असा पराभव केला.
  • सिंधूने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या चेऊंग नगान हीचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला होता.
  • यिंग हिचे हाँगकाँग ओपनचे दुसरे विजेतेपद असून तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित आणि रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन हिला पराभवाचा धक्का देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • चायना ओपनमध्ये बाजी मारून कारकिर्दीतले पहिले सुपर सीरिज जेतेपद नावावर करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने बीडब्लूएफच्या जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.

कमर जावेद बाजवा पाकिस्तानचे १६वे लष्करप्रमुख

  • पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पाकिस्तानचे १६वे लष्करप्रमुख आहेत.
  • जावेद बाजवा मावळेत लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. २९ नोव्हेंबरला शरीफ यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आहे.
  • बलुचिस्तान रेजिमेंटमधून येणाऱ्या व काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा चांगला अनुभव असलेल्या बाजवा यांनी पाकिस्तानी लष्करामध्ये विविध पदे भूषवली आहेत.
  • पाक लष्कराच्या सर्वांत मोठ्या आणि प्रतिथयश ‘१० कोअर’चे नेतृत्व त्यांनी केले आहे. ही कोअर भारताबरोबरच्या ताबारेषेवरील सुरक्षेला जबाबदार असते.
  • मेजर जनरल पदावर असताना त्यांनी ‘फोर्स कमांड नदर्न एरिआज’चे नेतृत्व केले. क्वेट्टामध्ये असणाऱ्या पायदळाच्या प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
  • ते रावळपिंडी तुकडीचेही कमांडर होते. सध्या ते ट्रेनिंग आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
  • बाजवा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत आफ्रिकेतील देशात भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंह यांच्या नेतृत्वात काम केले आहे.
  • पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारपेक्षा लष्करप्रमुखाची भूमिका महत्वाची असते. पंतप्रधानांपेक्षा तेथील लष्करप्रमुखाचे देशावर जास्त नियंत्रण असते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमांत सुधारणा

  • नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवाराला तो निवडून आला असला तरी अपात्र घोषित करण्यात येईल, असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
  • राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या वर्षीपासून नियमांचे काटेकोर पालन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • नवीन नियमांनुसार राजकीय पक्षांना ६० दिवसांच्या आत खर्चाचे विवरणपत्र सादर करावे लागणार आहे.
  • मतदारसंघात उमेदवार असलेल्या प्रत्येकाला त्याचा स्वत:चा, पक्षाचा आणि त्याच्या मित्रमंडळाने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा आयोगाला सादर करावा लागणार आहे.
  • यापूर्वीही ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक होते. मात्र, कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश या वेळी प्रथमच देण्यात आले आहेत.
  • नगरपालिका या लोकशाहीच्या प्राथमिक शाळा असल्याने सुधारणांचा कार्यक्रम तेथून राबवणे आवश्यक असल्याचे आयोगाने ठरवले आहे. 
  • महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे अडीच लाख लोकप्रतिनिधी निवडून पाठवले जातात.
  • नगर परिषद आणि नगरपालिकेच्या सध्याच्या टप्प्यात १५० ठिकाणी मतदान होणार आहे.
  • यावर्षी महाराष्ट्राच्या गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकांत प्रथमच संगणकाचा पूर्ण वापर करण्यात आला आहे.
  • नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारी अर्ज या वेळी पूर्णत: संगणकाद्वारे स्वीकारण्यात आले.

कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीवरील स्थगिती उठवली

  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीवरील स्थगिती दोन वर्षांसाठी उठवली आहे.
  • पण, आयसीआरने घालून दिलेल्या अटींचे पालन कृषी विद्यापीठांना पूर्ण करावे लागणार आहे.
  • कृषी विद्यापीठांनी मनुष्यबळाची पूर्तता करावी, तसेच खासगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात वेळ खर्च घालू नका आदी अटी आयसीएआरने घातल्या आहेत.
  • आयसीएआरकडून शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यक्रमासाठी देशातील कृषी विद्यापीठांना तीन ते साडेतीन टक्के निधी उपलब्ध केला जातो.
  • या संदर्भात दर पाच वर्षांनी आयसीएआरच्या मूल्यांकन समितीकडून आढावा घेतला जातो.
  • जानेवारीमध्ये या समितीने विद्यापीठातील शैक्षणिक सुविधा, गुणवत्ता व कर्मचारी वर्गाची पाहणी केली असता, त्यांना राज्यातील चारही कृषी विद्यापीठात ६० टक्के मनुष्यबळ कमी असल्याचे आढळून आले.
  • त्यामुळे चारही कृषी विद्यापीठांच्या गुणवत्ता मानांकनावर आयसीएआरने प्रश्नचिन्ह निर्माण करू न कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा