चालू घडामोडी : २२ जानेवारी

डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार

  • मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे.
  • कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी मानिनी सदरातून ललित लेखनाला सुरवात केली.
  • राजाध्यक्ष यांनी मुंबईत एल्फिस्टन महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून तर एसएनडीटी विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहे.
  • १९६५मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे विदेही, अनोळखी, अकल्पित, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे १९ कथासंग्रह प्रकाशित झाले.
  • बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा), कवीतारती, जिव्हार स्वानंदाचे, आदिमाया, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध ही त्यांची समिक्षात्मक पुस्तके आहेत.
  • ‘मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ’ या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
  • २०००मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष: मधु मंगेश कर्णिक
 जनस्थान पुरस्कार 
  • कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांनी १९९१मध्ये या पुरस्काराची सुरूवात केली.
  • आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी दिला जातो.
  • या पुरस्काराचे हे १४वे वर्ष आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • मराठी साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो.
जनस्थान पुरस्काराचे आजवरचे मानकरी
साहित्यिक वर्ष
विजय तेंडुलकर १९९१
विंदा करंदीकर १९९३
इंदिरा संत १९९५
गंगाधर गाडगीळ १९९७
व्यंकटेश माडगुळकर १९९९
ना. पेंडसे २००१
मंगेश पाडगावकर २००३
नारायण सुर्वे २००५
बाबुराव बागुल २००७
ना. धो. महानोर २००९
महेश एलकुंचवार २०११
भालचंद्र नेमाडे २०१३
अरुण साधू २०१५
डॉ. विजया राजाध्यक्ष २०१७

सायना नेहवालला मलेशिया मास्टर्सचे विजेतेपद

  • मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालने थायलंडच्या पोर्नपावे चोचुवाँगचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
  • दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर हे सायनाचे पहिलेच जेतेपद आहे. सायनाने पोर्नपावे चोचुवाँग हिचा २२-२०, २२-२० असा पराभव केला.
  • मलेशियन मास्टर्स स्पर्धेच्या विजयासह सायनाला १ लाख २० हजार अमेरिकन डॉलर्सचे परीतोशिखी मिळाले आहे.

जनधन खातेधारकांना विनामूल्य विमा 

  • केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान जनधन खातेधारकांना तीन वर्षांसाठी २ लाखांचा विमा विनामूल्य देण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारकडून लवकरच ही योजना लागू करण्यात येणार असून, गरीब आणि मागास वर्गाला सामाजिक सुरक्षा देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
  • देशात जनधन योजनेंतर्गत आतापर्यंत २७ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी १६ कोटी खाती आधार कार्डाशी संलग्न आहेत.
  • या नव्या योजनेनुसार अपघात आणि जीवन विमा दिल्यास केंद्र सरकारला ९००० कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे.
  • केंद्र सरकारने २०१४साली पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजना अशा सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना सुरू केल्या होत्या.

सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक

  • प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनची ६५व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत परीक्षकांच्या पॅनलवर निवड करण्यात आली आहे.
  • १९९४मध्ये सुश्मिता सेनने वयाच्या १६व्या वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
  • 'मिस युनिव्हर्स'चा फिनाले मनिला, फिलिपिन्समध्ये ३० जानेवारी रोजी होणार आहे. १९९४सालची मिस युनिव्हर्स स्पर्धादेखील मनिला येथेच झाली होती.
  • या मिस युनिव्हर्स स्पर्धेत रोश्मीता हरिमुर्ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रोश्मीता हिने गेल्या वर्षी पार पडलेली मिस दिवा ही स्पर्धा जिंकली होती.

चार आरोपींची फाशीची शिक्षा राष्ट्रपतींकडून रद्द

  • बिहारमधील गया जिल्ह्यातल्या बारा गाव येथे झालेल्या सामूहिक हत्याकांडात दोषी ठरलेल्या चौघांची फाशीची शिक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माफ केली आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची शिफारस केली असूनही राष्ट्रपतींनी फाशी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • नन्हेलाल मोची, कृष्णा मोची, वीर पासवान आणि धर्मेंद्रसिंह ही आरोपींची नवे असून त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले आहे.
  • यांना फाशीची शिक्षा ठोठावली तर बिहारमध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रपतींनी फाशी माफ करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
  • १२ फेब्रुवारी १९९२ रोजी बारा गाव येथे माओवाद्यांनी भूमिहार समाजाच्या ३४ जणांची हत्या केली होती.
  • या प्रकरणी न्यायालयाने नन्हेलाल मोची, कृष्णा मोची, वीर पासवान आणि धर्मेंद्रसिंह यांना फाशीची शिक्षा दिली होती.
  • फेब्रुवारी २०१६मध्ये बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी राज्य सरकारच्या शिफारशीनंतर या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा