चालू घडामोडी : २० मार्च

आनंदी देशांच्या यादीत भारत १२२व्या क्रमांकावर

  • द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१७ने जगातील सर्वाधिक आनंदी १५५ देशांची यादी तयार केली असून, या यादीत नॉर्वे देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • नॉर्वेने मागील वर्षापेक्षा तीन अंक जास्त मिळवत डेन्मार्कला मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षांपैकी तीन वर्षे डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता.
  • दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचाराबाबतचा दृष्टिकोन आदी निकषांवरून आनंदाचे मोजमाप करण्यात आले आहे.
  • या यादीत भारताची गेल्या वर्षीच्या तुलनेत चार अंकांनी घसरण झाली असून सध्या भारत १२२व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे.
  • भारताचा २०१३-१४मध्ये ११८वा क्रमांक होता तो आता १२२व्या क्रमांकावर गेला आहे. चीन (७९), पाकिस्तान (८०), नेपाळ (९९), बांगलादेश (११०) आणि श्रीलंका (१२०) हे शेजारील देश या यादीत भारताच्या पुढे आहेत.
  • नॉर्वेपाठोपाठ डेन्मार्क, आइसलॅण्ड, स्वित्झर्लंड, फिनलॅण्ड, नेदरलॅण्डस, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन यांचा क्रमांक आहे.

मणिपूर विधानसभेतही भाजपचे बहुमत सिद्ध

  • भाजप सरकारने गोव्यापाठोपाठ ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतही बहुमत सिद्ध केले आहे. बहुमत चाचणीत भाजप सरकारच्या बाजूने ३२ मते पडली.
  • राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू असलेले एन बिरेन सिंह हे मणिपुरमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
  • ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपला २१ तर काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या.
  • दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. 
  • भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाच्या ४, नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे ४, लोकजनशक्ती पक्षाचे १ आणि २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. 
  • पाच वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता. पण यावेळी पक्षाने २१ आमदारांसह थेट सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे मणिपूरमधील यश हे भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय गटात सौम्या स्वामिनाथन यांची नियुक्ती

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली आहे.
  • त्या जीवाणू प्रतिरोध तज्ज्ञ म्हणून या गटात सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे उप-सरचिटणीस अमीन महंमद या गटाचे सहअध्यक्ष असतील.
  • जीवाणू प्रतिबंध उपाययोजना गटात संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे प्रतिनधी, आरोग्य तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
  • यात जीवाणू प्रतिरोधकता वाढवण्यासाठी जागतिक कृती योजना तयार केली जाणार आहे.
  • गटाची बठक येत्या काही आठवड्यात होत असून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस : अँटोनियो गुट्रेस
 सौम्या स्वामिनाथन 
  • स्वामिनाथन या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी क्षय रोगावर संशोधन केले असून १९९२मध्ये त्या चेन्नईतील क्षयरोग संशोधन केंद्रात काम करू लागल्या.
  • सध्या त्या भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. गेली २३ वर्षे त्या आरोग्य संशोधनात काम करीत आहेत.
  • निओनॅटोलॉजी अँड पेडिअट्रिक पलमॉनॉलॉजी या विषयात त्यांना दक्षिण कॅलिफोíनयातील लॉस एंजल्स रूग्णालयाची शिष्यवृत्ती मिळाली होती.
  • इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसिजेस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एचआयव्ही विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत.
  • पुण्याच्या एएफएमसी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालवैद्यकीत एमडी पदवी प्राप्त केली..

व्होडाफोन आयडिया विलिनीकरणावर शिक्कामोर्तब

  • भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • व्होडाफोन इंडिया आणि याअंतर्गत येणारे व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड आता आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया सेल्यूलरमध्ये विलीन होणार आहे.
  • हचिसनकडून मोबाईल व्यवसाय खरेदी करत मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनने २००७मध्ये भारतीय दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले होते.
  • या संदर्भातील व्यवहारापोटी सरकारने व्होडाफोनवर २ अब्ज डॉलरचा कर लावला होता. यामुळे त्रस्त झालेल्या व्होडाफोनने आपला भारतातील व्यवसाय आयडियाला विकण्याचा निर्णय घेतला होता.
  • यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जानेवारीपासून चर्चाही सुरु होती. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर आता विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
  • व्होडाफोनचे विलिनीकरण झाल्यानंतर आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी असेल.
  • नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल.
  • नव्या कंपनीचे नेतृत्व चेअरमन या नात्याने कुमार मंगलम बिर्ला हे करतील. तर एकिकृत कंपनीचा मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) व्होडाफोन ठरवेल.

रॉजर फेडररला इंडियन वेल्स स्पर्धेचे पाचवे जेतेपद

  • स्वित्झर्लंडच्या प्रसिध्द टेनिसपटू रॉजर फेडररने स्टेन वॉवरिन्कावर ६-४, ७-५ अशी मात मात करून एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले.
  • या स्पर्धेचे हे फेडररचे पाचवे जेतेपद ठरले. याआधी फेडररने २००४, २००५, २००६ आणि २०१२ साली ही स्पर्धा जिंकली होती.
  • इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावून फेडररने आता नोव्हाक जोकोव्हीच याच्या पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
  • फेडररने जानेवारी महिन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावून १८वे ग्रॅंडस्लॅम जिंकले होते.

नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी डेरेक वॉलकॉट कालवश

  • साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळविणारे ज्येष्ठ कवी, नाटककार, चित्रकार डेरेक वॉलकॉट यांचे १७ मार्च रोजी निधन झाले.
  • २३ जानेवारी १९३० रोजी सेंट ल्युसियाची राजधानी कॅस्ट्रिज येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी स्वत:च त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला.
  • १९९०मध्ये त्यांची गाजलेली साहित्यरचना ‘ओमेरॉस’ यासाठी त्यांना १९९२मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • ग्रीक मिथककथेला केंद्रस्थानी ठेवून आणि त्या कथेची आजच्या काळाशी असलेली संगती जुळवत वॉलकॉट यांनी ‘ओमेरॉस’ हा काव्यखंड रचला.
  • तीन-तीन ओळींचा एक गुच्छ, सात पुस्तके व त्यात ६४ प्रकरणे अशी ‘ओमेरॉस’ची मांडणी आहे.
  • ‘वेस्ट इंडियन संस्कृतीला लाभलेला एक थोर कवी’, असे कौतुक वॉलकॉट यांना नोबेल देणाऱ्या स्वीडिश अकादमीने केले होते.
  • ‘ओमेरॉस’मधून वॉलकॉट यांनी वेस्ट इंडियन माणसाच्या जगण्याचे, त्याच्या सुखदु:खाचे दर्शन घडवले.
  • कॅरेबियन जगण्याचे समृद्ध आणि तेवढेच गुंतागुंतीचे पैलू हे वॉलकॉट यांच्या लिखाणाचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या निधनाने इंग्रजी साहित्यातील एक थोर कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

बीसीसीआयमध्ये एमसीएने मतदानाचा हक्क गमवला

  • भारतीय क्रिकेट नियामक लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) बीसीसीआयमधील कायमस्वरूपी मतदानाचा हक्क गमवावा लागला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या प्रशासकांच्या समितीने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
 या नवीन नियमांनुसार 
  • एका राज्याला एकच मत देण्याचा अधिकार असेल. त्यानुसार मुंबईला कायमस्वरूपी मतदान करण्याचा हक्क यापुढे मिळणार नाही.
  • मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या ईशान्येकडील लहान राज्यांना पूर्ण मतदानाचा हक्क मिळाला आहे.
  • बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी ३० सप्टेंबरला होईल आणि ३ वर्षांनी निवडणुका घेतल्या जातील.
  • बीसीसीआयच्या कार्यकारिणीमध्ये ९ जणांचा समावेश असेल. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणुका घेतल्या जातील.
  • अन्य चार कार्यकारिणी सदस्यांमध्ये एक बीसीसीआयचा पूर्ण सदस्य, पुरुष व महिला खेळाडूंचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि एक ‘कॅग’मधील अधिकाऱ्याचा समावेश असेल.
  • बीसीसीआयचे दैनंदिन कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी सांभाळेल, त्यांच्या मदतीला सहा व्यवस्थापक असतील.
  • निवड समितीबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

झाकीर नाईकच्या १८ कोटींच्या संपत्तीवर ईडीची जप्ती

  • झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) व इतर संबंधितांची १८.३७ कोटी संपत्ती मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आली आहे.
  • ईडीने आपल्या तपासात झाकीर नाईक आणि त्याच्या एनजीओने सुमारे २०० कोटी रूपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सिद्ध केले आहे.
  • यापूर्वी ईडीने झाकीर नाईक आणि आयआरएफशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या या प्रकरणात त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती.
  • ईडीकडून वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक झाकीर नाईकचा शोधही सुरू आहे. सध्या झाकीर नाईक हा सौदी अरबमध्ये आहे.
  • दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) नाईकविरोधात नोटीस जारी केली असून दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ३० मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
  • नाईक हा अवैध कामात गुंतला असल्याचे व दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याचा मुंबई पोलिसांनी यापूर्वीच महाराष्ट्र सरकारला अहवाल दिला आहे.
  • गतवर्षी ढाका येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नाईकमुळे आपण प्रेरित झाल्याचे या दहशतवाद्यांनी म्हटले होते.
  • नोव्हेंबर २०१६मध्ये एनआयएने नाईक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नाईकवर धर्माच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा