चालू घडामोडी : १८ मे

केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन

  • केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय ६०) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी त्यांची ओळख होती.
  • दररोज दोन वेळा न चुकता योगसाधना करणारे दवे प्रकृतीबाबत अत्यंत दक्ष मानले जायचे. दवे यांना जानेवारीमध्ये न्यूमोनिया झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती विलक्षणरीत्या ढासळली होती.
  • ६ जुल १९५६ मध्ये उज्जनजवळील बारनगर येथे जन्मलेल्या दवेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी नेते होते, नंतर संघप्रचारक बनले.
  • नर्मदा अभियानात ते सहभागी झाले होते. ‘चरैवेती चरैवेती’ आणि ‘जन अभियान परिषद’ अशा दोन नियतकालिकांचे ते संपादन करायचे.
  • शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते वैमानिक झाले होते. २००३मधील उमा भारतींच्या मध्यप्रदेशातील विजयात त्यांचा मोठा वाटा होता.
  • २००९मध्ये ते प्रथम राज्यसभा खासदार झाले. २०१५मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. मागील वर्षीच ते वने व पर्यावरण मंत्री झाले.
  • छत्रपती शिवराय, विवेकानंद आणि भगतसिंह ही दवेंची आराध्य दैवते होती. शिवरायांबद्दलची त्यांची ओजस्वी भाषणे खूप गाजली.
  • शिवरायांच्या रणनीतीवर, प्रशासन कौशल्यावर लिहिलेले ’शिवाजी आणि सुराज्य’ हे त्यांचे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण मानले जाते.
  • दवे यांच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा विशेष ठरावही संमत केला.
  • त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

श्रीनिवास कुलकर्णी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कार

  • भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • वैज्ञानिक श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
  • पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीची स्थापना आणि संचालनाच्या कामासाठी श्रीनिवास कुलकर्णी ओळखले जातात.
  • अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशाने त्यांनी केलेले सर्वेक्षण जगभरात वाखाणले गेले आहे.
  • ‘रेडिओ पल्सर’ (खगोल प्रकाशस्त्रोत) या ताऱ्यासंदर्भात त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी भरीव संशोधन केलेले आहे.
 डॅन डेव्हिड पुरस्कार 
  • तेल अवीव विश्वविद्यालयातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनतर्फे हा मानाचा पुरस्कार दिला जातो. १० लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • हा पुरस्कार विज्ञान, मानवता आणि नागरी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
  • दरवर्षी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन विभागांमध्ये डॅन डेव्हिड पुरस्कार देण्यात येतो.
  • दिवंगत उद्योजक डॅन डेव्हिड यांनी या पुरस्कारांना प्रारंभ केला होता. यंदा या पुरस्कारांचे १६वे वर्ष आहे.
  • यापूर्वी लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव या भारतीयांना हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.

दहा नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंत्रिमंडळाची मंजुरी

  • देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या १० नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे.
  • एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.
  • जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत. तर २००५ आणि २००६मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे.
  • नव्या अणुभट्ट्यांची क्षमता जुन्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत जास्त म्हणजेच सुमारे ७०० मेगावॉट इतकी असणार आहे. 
  • त्यांची उभारणी राजस्थानातील माही बंसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा आणि मध्य प्रदेशातील चुटकामध्ये करण्यात येणार आहे.
  • ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
  • २०२१-२२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार आहेत. त्यामुळे उर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ होणार असून वीजेचे दरदेखील कमी होणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन

  • मराठी नाटक, तसेच मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (वय ५९ वर्ष) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • रीमा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव नयन भडभडे होते. रंगभूमीचा वारसा त्यांना आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून लाभला.
  • हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा चित्रपटांतून बेबी नयन या नावाने बालकलाकार म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.
  • कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांचे हे सर्व रोल्स चांगलेच गाजले.
  • कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर बरोबरची तूतू-मेंमें, श्रीमान-श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या. 
  • पुरुष, सविता दामोदर परांजपे, घर तिघांचं हवं, झाले मोकळे आकाश, के दिल अभी भरा नही या नाटकांतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
  • आई शपथ, सातच्या आत घरात, मुक्ता अशा काही मराठी चित्रपटांतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
  • कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आप के हैं कौन, वास्तव आदी हिंदी चित्रपटांतील कसदार अभिनयातून ‘आई’च्या भूमिकेलाही त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले.
  • मैने प्यार किया (१९९०), आशिकी (१९९१), हम आपके हैं कौन (१९९५), वास्तव (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी रीमा लागू यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • नाटके : घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण,  पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे कार्ट चालू आहे, छापाकाटा.
  • मालिका : खांदान, श्रीमान-श्रीमती, तूतू-मेंमें, दो और दो पाच, धडकन, कडवी खट्टी मिठ्ठी, दो हंसो का जोडा, तुझ माझ जमेना, नामकरण इत्यादी
  • हिंदी चित्रपट : मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी इत्यादी

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती

  • कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
  • न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
  • जाधव हे हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून जाधव हे ‘रॉ’चे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 
  • व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना राजनैतिक तसेच कायदेशीर मदत मिळाली पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.
  • भारताने पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
  • कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती.
 आंतरराष्ट्रीय न्यायालय 
  • आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख शाखांपैकी एक शाखा आहे. नेदरलँड्समधील हेग ह्या शहरात हे न्यायालय स्थित आहे.
  • राष्ट्राराष्ट्रांतील वाद शांततेने आणि कायदेशीर पद्धतीने सोडविले जावेत यासाठी १९४५साली संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना केली.
  • न्यायालयापुढे आलेल्या दाव्यांचे निकाल करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही शाखांनी एखाद्या मुद्दयावर किंवा कायद्याबाबतचा सल्ला मागितल्यास तो देणे, ही या न्यायालयाची मुख्य कामे आहेत.
  • संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद (१९३ देश) या न्यायालयाचे सदस्य आहेत. सुरक्षा-समितीने अनुमती दिल्यास संयुक्त राष्ट्रांचा सभासद नसलेल्या राष्ट्रासही या न्यायालयाचे सदस्य होता येते.
  • २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली. 
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश झालेले ते चौथे भारतीय आहेत. त्यांच्या कार्काळ पाच वर्षाचा असून २०१८पर्यंत ते या पदावर राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा