चालू घडामोडी : २३ जून

इस्रोद्वारे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण

  • इस्रोने २३ जून रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही-सी३८ या प्रक्षेपकाद्वारे ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • एकाचवेळी ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्त्रोने पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
  • यापूर्वी इस्त्रोने जून २०१५मध्ये २३ उपग्रह तर फेब्रुवारी २०१७मध्ये महिन्यात १०४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
  • इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४०वे उड्डाण होते. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांमध्ये भारताचे २ आणि इतर १४ देशांचे २९ नॅनो उपग्रह आहेत.
  • या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसेट-२ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे.
  • याशिवाय कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल.
  • कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे वजन ७१२ किलो, तर प्रक्षेपित करण्यात आलेल्या इतर ३० उपग्रहांचे वजन २४३ किलो आहे.
  • या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले:- ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका
  • इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार
 ‘कार्टोसेट-२’बद्दल 
  • प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांपैकी कार्टोसेट-२ हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे.
  • कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांना भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करताना या उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. 
  • कार्टोसेट-२ या मालिकेतील हा सहावा उपग्रह आहे. भारताकडे याआधीच अशा प्रकारचे पाच उपग्रह आहेत.
  • कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, तो पृथ्वीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • कार्टोसेट-२चे फायदे
    • भारताला सीमावर्ती भागात आणि शेजारी देशांवर नजर ठेवता येणार.
    • स्मार्ट सिटी योजनेतील विविध उपक्रमांसाठीदेखील मोठी मदत होणार.
    • ५०० किलोमीटर अंतरावरुनही सीमावर्ती भागातील दहशतवाद्यांचे तळ, बंकर याची माहिती मिळू शकेल.
    • उच्च क्षमतेची छायाचित्र, डाटा मिळवण्यासाठी उपयुक्त. 

न्या. दलवीर भंडारी

  • नेदरलॅण्ड्समधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे.
  • तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी भंडारी यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी १५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते.
  • दलवीर बंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ रोजी राजस्थानमध्ये झाला. जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली.
  • अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांनी शिकागो येथेही काही काळ वकिली केली.
  • अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली.
  • १९७७ साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. नंतर १९९१साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली.
  • त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
  • तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची १९ जून २०१२ रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली.
  • २००७साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.
  • दलवीर भंडारी यांच्या अनेक महत्वाच्या निर्णयांमुळे देशाच्या अनेक क्षेत्रांत बदल घडून आला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत २०१४साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
  • कर्नाटकामधील टुमकूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज, तर कोटा येथील वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी बहाल केली आहे.

पुणे महानगरपालिका कर्जरोखे सूचीबद्ध

  • पुणे महानगरपालिका कर्जरोख्यांची २२ जून रोजी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली आहे.
  • या माध्यमातून पुणे शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी महानगर पालिकेने २०० कोटी रुपये उभारणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
  • वार्षिक ७.५९ टक्के दराने १० वर्षांचे रोखे याद्वारे उभारले गेले आहेत. याकरिता रोख्यांना सहापट प्रतिसाद मिळाला. 
  • भारतीय कर्जरोखे आणि नियामक मंडळ अर्थात सेबीने महानगरपालिका अधिनियम २०१५द्वारे चालू केलेल्या कर्जरोख्यांची सूची संदर्भातील ही पहिली प्रक्रिया आहे.
  • केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वर्षभरात १० शहरांनी ही प्रक्रिया राबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
  • या व्यतिरिक्त केंद्र सरकारने एकूण कर्ज रोख्यांच्या आकारावर आधारित २ टक्के व्याज अनुदान देण्याचे सुचविले होते.
  • पुणे महानगरपालिकेने आगामी कालावधीतही याच माध्यमातून २,२६४ कोटी रुपये उभारण्याचा संकल्प केला आहे.

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वा क्रमांक

  • मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते.
  • यावर्षीच्या सर्वेक्षणात जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वे स्थान मिळाले आहे. २०१६साली मुंबईचा याबाबत ८२वा क्रमांक होता.
  • अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे.
  • ल्युएण्डा या शहरानंतर अनुक्रमे हाँगकाँग, टोकियो, झ्युरिच, सिंगापूर ही  जगभरातील महागडी शहरे आहेत.
  • याशिवाय सेऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या १०मध्ये समावेश आहे.
  • तर टय़ुनिस (२०९वे स्थान), बिशकेक (२०८वे स्थान) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
  • भारताचा विचार केल्यास नवी दिल्ली ९९व्या, चेन्नई १३५व्या, बेंगळूरु १६६व्या आणि कोलकाता १८४व्या स्थानावर आहे.

कोलकात्यात भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो

  • कोलकत्यातील हुगळी नदीखाली सुरु असलेल्या अंडरवॉटर बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे.
  • देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून, या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोद्वारे जोडण्यात येणार आहे.
  • कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बांधकाम केले आहे. १९८४मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे.
  • हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी ८० किमी असेल.
  • या मार्गावर मेट्रो १०.६ किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी ५२० मीटर इतकी आहे. 
  • नदीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्यासाठी ६० कोटी खर्च करण्यात आले आहेत.

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

  • आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व आणि कसोटी संघांचा दर्जा देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.
  • त्यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता १२ होणार आहे. यापूर्वी २०००साली बांगलादेश कसोटी संघाचा दर्जा प्राप्त करणारा १०वा देश ठरला होता.
  • अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश  आहे. तर आयर्लंड कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा