चालू घडामोडी : २ ऑक्टोबर

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

  • वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार २०१७, जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे.
  • ‘Molecular mechanisms controlling the circadian rhythm’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
  • १०८व्या नोबेल पुरस्काराची स्टॉकहोम, स्वीडन येथील कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून घोषणा करण्यात आली.
  • या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
  • ‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले आहे.
  • या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.
  • सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर होणारा परिणामही त्यांनी सिद्ध केला आहे.
  • या तिन्ही शास्त्रज्ञांच्या टीमने सजीवांमधील या अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुके आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.
  • हॉल हे सध्या निवृत्त झाले असले तरी ते अजूनही आपला बराच वेळ वालथम येथील ब्रँडिज विद्यापीठातील संशोधनासाठी देतात.
  • रोसबाश हे देखील ब्रँडिज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, यंग हे न्युयॉर्क येथील रॉकेफेलर विद्यापीठात संशोधनाचे काम करीत आहेत.
 ‘जैविक घड्याळ’चे कार्य नेमके चालते कसे? 
  • पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या जीवनचक्राची गती पृथ्वीच्या परिवलन गतीशी समरूप असते व सजीवांच्या शरीरातील जैविक क्रिया या दिनमानानुसार होत असतात.
  • मानवासह सर्वच सजीवांच्या शरिरात एक ‘जैविक घड्याळ’ असते त्यामुळे ते दिवसाच्या कलांनुसार आपल्या शारीरिक क्रियांमध्ये अनुरूप बदल करीत असतात.
  • शरिरातील या ‘जैविक घड्याळ’चे कार्य नेमके चालते कसे? याचे उत्तर या तिघांनी शोधले आणि ठरावीक प्रकारच्या प्रोटिन्सच्या चढउतारामुळे हे शक्य होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला.
  • शरीरातील ‘जैविक घड्याळा’च्या या गतीला ‘सिरकॅडिन ऱ्हीदम’ असे म्हटले जाते. ‘सिरकॅडियन’ हा शब्द ‘सिरका’ व ‘डिएस’ या दोन लॅटिन शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. ‘सिरका’ म्हणजे ‘सभोवताल’ आणि ‘डिएस’ म्हणजे दिवस.

प्रसिद्ध लेखक ह मो मराठे यांचे निधन

  • प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे १ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७७व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • हनुमंत मोरेश्वर मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपण नावाने ते ओळखले जात होते. 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'  ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले.
  • सुरुवातीला त्यांनी कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी केली. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले.
  • त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका.
  • त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
  • वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येतो.
  • चिपळूणला भरणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
  • ह. मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते. नंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक, नवशक्ती या अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
  • अखेरच्या काळात मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर बेतलेले जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक यांच्या भूमिका असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक रंगभूमीवर गाजले.
 ह मो मराठे यांची साहित्यसंपदा 
  • कथा : पक्षिणी, घोडा, हद्दपार, दावं, वीज, युद्ध, सापेक्ष, ज्वालामुख, आजची नायिका, अण्णांची टोपी, चुनाव रामायण, मुंबईचे उंदीर, माधुरीच्या दारातील घोडा.
  • आत्मकथा : बालकांड (आत्मकथा भाग १), पोहरा (आत्मकथा भाग २)
  • कादंबरी : निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी, बालकांड, देवाची घंटा, नो सेंटिमेन्ट्स प्लीज, इतिवृत्त, प्रास्ताविक, कुरुक्षेत्र, सॉफ्टवेअर, मार्केट, कलियुग, नरिमन पॉईंटचा समुद्र.
  • वैचारिक : न लिहिलेले विषय
  • लेखसंग्रह : मधलं पान
  • विनोदी : श्रीमंत श्यामची आई, स्वर्गसुखाचे पॅकेज
  • व्यक्तिचित्रण : एक माणूस एक दिवस : भाग १, भाग २ आणि भाग ३
  • वृत्तपत्रीय : दिनमान (‘लोकप्रभा’ आणि ‘घरदार’मधील संपादकीय लेख), द बिग बॉस, उलटा आरसा (राजकीय व्यंगकथा), वंशविद्वेशाच्या वणव्यात श्रीलंका (श्रीलंकेच्या प्रश्नावरील मराठीतील पहिले पुस्तक), पहिला चहा.
  • अनुवाद : लावा या मराठे यांच्या निवडक कथांच्या हिंदूी अनुवादाचे पुस्तक (अनुवादक – प्रकाश भातंब्रेकर), डार्क वॉटर्स या काळेशार पाणी कादंबरीचा इंग्रजी अनुवाद (अनुवादक – लीला बावडेकर)
  • अन्य लेखन : आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी, गंध-शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ, ब्राह्मण चळवळ कशासाठी?, ब्राह्मणिनदेची नवी लाट, ब्राह्मणमानस, ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?, विद्रोही ब्राह्मण, शिवधर्म, संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?

आसामी पत्रकार व लेखक भगवती यांचे निधन

  • आसाममधील नावाजलेले पत्रकार व लेखक राधिका मोहन भगवती यांचे ३० सप्टेंबर रोजी निधन झाले.
  • भगवती यांचा जन्म सोनितपूर जिल्ह्यात जामगुरीहाट येथे १९ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती.
  • त्यांनी १९५८ मध्ये ‘नातून आसामिया’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कारकीर्द सुरू केली. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी तिंदिनिया बाटोरी, अजिर आसाम व सेंटीनेल (हिंदी) या वृत्तपत्रांत काम केले.
  • नंतर ते ‘दैनिक आसाम’मध्ये रुजू झाले. आसामातले हे सर्वात जुने वृत्तपत्र मानले जाते. १९८७ ते २००४ या काळात त्यांनी ‘दी सेंटीनेल’ ग्रुपमध्ये काम केले. २०१०मध्ये ते ‘दैनिक आसाम’चे संपादक झाले. 
  • १९६०च्या दशकात ते ‘रामधेनू’ या आसाममधील साहित्य नियतकालिकाचे संपादक होते, त्यातून त्यांनी आसामी लेखकांची एक नवी पिढी घडवली.
  • रक्तजबा, एजन राजा असिल, बनारिया फूल अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. आसाममधील पत्रकारिता समृद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
  • ‘द स्टोरी ऑफ अवर न्यूजपेपर्स’ या चंचल सरकार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी त्यांना १९९१मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • शिवप्रसाद बारुआ नॅशनल मीडिया अ‍ॅवॉर्ड, बिरेंद्र कुमार भट्टाचार्य अ‍ॅवॉर्ड, सादिन पत्रकारिता पुरस्कार, आर एन बारुआ व प्रतिभा बारुआ जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
  • गेली पन्नास वर्षे त्यांनी त्यांच्या लेखणीतून आसाममधील लोकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न करतानाच त्यांच्या जाणिवा जागत्या ठेवल्या.
  • आसामच्या पत्रकारितेला दीडशे वर्षे पूर्ण होत असताना नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. आधुनिक आसामी साहित्याचे शिल्पकार म्हणून त्यांची गणना केली जाते.
  • त्यांच्या साहित्यात नवीन सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब उमटत होते, त्याचबरोबर त्यांचे लेखन वाचून एक पिढी त्यातून समृद्ध झाली.
  • पत्रकार म्हणून त्यांनी आसामच्या समाजजीवनाशी निगडित अनेक प्रश्नांना वाचा फोडली व सामान्य लोकांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
  • भगवती यांचे लेखन हे आसामचा वाङ्मयीन वारसा अधिक समृद्ध करणारे आहे. त्यांचे लेखन आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा