चालू घडामोडी : १८ फेब्रुवारी

जगातील श्रीमंत शहराच्या यादीत मुंबई १२वी

  • ‘न्यू वर्ल्ड हेल्थ’तर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार भारताची आर्थिक राजधानी मुंबईने जगातील श्रीमंत शहराच्या यादीत १२वे स्थान मिळविले आहे.
  • मुंबईची एकूण संपत्ती ९५० बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे ६१,१२,७७५ कोटी रुपये आहे.
  • या यादीत एकूण १५ श्रीमंत शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 
  • यामध्ये न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला असून या शहराची संपत्ती ३ ट्रिलियन डॉलर म्हणजे अंदाजे १९३ लाख कोटी रुपये आहे.
  • तर दुसऱ्या स्थानावर लंडनने आणि तिसऱ्या स्थानावर जपानने बाजी मारली आहे.
  • याशिवाय यामध्ये कॅलिफोर्नियातील शहरे, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस या देशातील शहरांचाही समावेश आहे.
  • शहराच्या संपत्तीमध्ये त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक संपत्ती ग्राह्य धरण्यात आली आहे.
  • यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. सरकारी निधीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
  • सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई पहिल्या १०मध्ये आहे. १ बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले एकूण २८ अब्जाधीश मुंबईत आहेत.
  • त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.
जगातील १५ श्रीमंत शहरांची यादी
क्र. शहर संपत्ती
१. न्यूयॉर्क (अमेरिका) ३ ट्रिलियन डॉलर
२. लंडन (यूके) २.७ ट्रिलियन डॉलर
३. टोकियो (जपान) २.५ ट्रिलियन डॉलर
४. सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) २.३ ट्रिलियन डॉलर
५. बीजिंग (चीन) २.२ ट्रिलियन डॉलर
६. शांघाय (चीन) २ ट्रिलियन डॉलर
७. लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) १.४ ट्रिलियन डॉलर
८. हाँग काँग १.३ ट्रिलियन डॉलर
९. सिडनी (ऑस्ट्रेलिया) १ ट्रिलियन डॉलर
१०. सिंगापूर (मलेशिया) १ ट्रिलियन डॉलर
११. शिकागो (अमेरिका) ९८८ बिलियन डॉलर
१२. मुंबई (भारत) ९५० बिलियन डॉलर
१३. टोरंटो (कॅनडा) ९४४ बिलियन डॉलर
१४. फ्रँकफर्ट (जर्मनी) ९१२ बिलियन डॉलर
१५. पॅरिस (फ्रान्स) ८६० बिलियन डॉलर

रोटोमॅक कर्ज घोटाळा

  • रोटोमॅक पेन्सचे उत्पादन करणाऱ्या रोटोमॅक ग्लोबल प्रा लि या कंपनीचे प्रमुख विक्रम कोठारी यांनी ७ सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले आहे.
  • बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांकडून विक्रम कोठारीने कर्ज घेतले होते. मात्र ते परत करण्यात आले नाही.
  • केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) यासंदर्भात विक्रम कोठारी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.
  • सीबीआयने विक्रम कोठारींच्या तीन ठिकाणांवर छापे मारून या घोटाळ्याशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत ज्यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले आहे.
  • कोठारी यांच्या कंपनीकडील थकित कर्जांचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या घरात असावा, असा ‘सीबीआय’चा प्राथमिक अंदाज होता.
  • मात्र कागदपत्रांची पाहणी केली असता ही थकित कर्जे सुमारे ३,७०० कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • यात मूळ कर्जांची रक्कम २,९१९ कोटी रुपये आहे. व्याज व दंडासह ती ३,६९५ कोटी रुपये होते.
  • कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी कर्जे घेतली. परंतु प्रत्यक्षात ते पैसे अन्यत्र वळवून त्यांनी बँकांची फसवणूक केली, असा सीबीआयचा दावा आहे.
  • सीबीआयच्या एफआयआर पाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
  • या कंपनीने करचोरी केल्याचेही समोर आले असून, याप्रकरणी आयकर खात्याकडून १४ बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
  • याप्रकरणी विक्रम कोठारी यांनी घोटाळा केल्याचे अमान्य केले असून, लवकरच कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • विक्रम कोठारी हे ‘पान पराग’ या पान मसाला कंपनीचे संस्थापक एम एम कोठारी यांचे चिरंजीव आहेत.
  • वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी यांनी स्टेशनरीचा व्यवसाय सुरु केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते विक्रम कोठारींना गौरवण्यात आले होते.

भारतात बालमृत्यूंमध्ये घट : युनिसेफ अहवाल

  • दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या २८ दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या ६ लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
  • गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • जगातील एकूण १८४ देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारताचा ३१वा क्रमांक आहे.
  • भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण २५.४ (प्रति १००० जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे.
  • बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले २८ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते. 
  • जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक १००० बाळांमागे १९ बालके दगावतात. संपूर्ण जगाचा विचार केल्यास २०१६ साली जन्मल्यावर पहिल्याच आठवड्यात २६ लाख अर्भकांचा मृत्यू झाला.
  • त्यातील १० लाख बालके जन्माच्या पहिल्याच दिवशी दगावली तर जवळपास १० लाख बालके जन्मल्यावर एका आठवड्याच्या कालावधीत दगावली.
  • या बालकांचा मृत्यू विविध आजारांमुळे, अकाली जन्म, बाळंतपणाच्या वेळेस निर्माण होणार प्रश्न, संसर्ग अशा विविध कारणांमुळे झाला.
  • ० ते ५ वर्षे या कालावधीत होणाऱ्या मृत्यूमध्ये १९९० ते २०१५ या कालावधीत ६६ टक्के घट झाली आहे.
  • गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेल्या आरोग्य सेवा आणि राहणीमान यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा