चालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१४

·        नॉर्वेचा अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन बुध्दिबळाचा जगज्जेता ठरला. त्याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंदचा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.

·        कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.

·        आनंदने आतापर्यंत पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे तर कार्लसनने सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवले.

·        इंचिऑन आशियाई स्पर्धेतील आक्षेपार्ह वर्तनाबद्दल भारतीय महिला बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आशियाई ऑलिम्पिक समितीने (ओसीए) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरिता देवीने आपल्या वर्तनाबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतर तिला केवळ कठोर सूचना देऊन सोडण्याचा निर्णय ओसीएने जाहीर केला.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील ७०० रेल्वेस्थानकांचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.

·        फादर कुरियाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळच्या दोन कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरुंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी संतपद बहाल केले.

·        केरळच्या शंभरवर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलिक चर्चमधील आतापर्यंत तिघांना संतपद देण्यात आले आहे.

·        यापूर्वी २००८ मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना संतपद मिळाले होते.

·        थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्याच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहेत.

·        कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.

·        विख्यात कथ्थक गुरू पंडित बिर्जू महाराज यांना यंदाचा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत समारंभपूर्वक देण्यात आला.

·        संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.

·        बोफोर्स तोफांच्या खरेदीनंतर ३० वर्षानंतर भारतीय लष्करासाठी ८१४ तोफा खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी १५,७५० कोटी रुपये खर्च होणार आहे.

·        या ८१४ तोफा १५५ एमएम/५२ च्या असणार आहेत. या तोफांचे उत्पादन भारतात करण्याची अट घालण्यात आली आहे.

 

महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.

                                

·        बालपण आणि शिक्षण

जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

 

·        सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

 

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या राईटस् ऑफ मॅनया ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहेअसे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकर्याच ा आसूडया पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहेहा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यक्तीमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

 

·        साहित्य आणि लेखन

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

नाव

साहित्यप्रकार

लेखनकाळ

तृतीय रत्न

नाटक

इ.स. १८५५

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

इ.स. १८६९

ब्राह्मणांचे कसब

लेखसंग्रह

इ.स. १८६९

गुलामगिरी

लेखसंग्रह

इ.स. १८७३

शेतकऱ्यांचा असूड

लेखसंग्रह

इ.स. १८८३

सत्सार

नियतकालिक

इ.स. १८८५

इशारा

लेखसंग्रह

इ.स. १८८५

सार्वजनिक सत्यधर्म

लेखसंग्रह

इ.स. १८८९

 

·        जीवनपट

इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.